काय सांगू दादा, कोरोनाने घात केला ! 'म्या' पाच एकर पपईचा बाग मोडला !

umarga news photo.jpg
umarga news photo.jpg

उमरगा (उस्मानाबाद) : काय सांगू दादा, कोरोनाने घात केला. त्यात निसर्गाचा प्रकोप झाला. होत्याचे नव्हते झाले. म्या पाच एकरातला पपईचा बाग मोडीत काढला. कारण, लागवडीसाठी लावलेला खर्च देखील निघत नाही, ही आपबिती आहे, उमरगा तालुक्यातील प्रगतशीर शेतकरी परमेश्वर जाधव यांची. कोरोनाने अख्ख्या जगाचे कंबरडे मोडले आहे. त्यात बळीराजावर तर कायम संकट असते. यंदा  कोरोना आणि त्यात नैसर्गिक प्रकोपाने पुरते नुकसान झाले आहे. 

लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतीत पिकविलेल्या पपईला बाजारपेठ उपलब्ध होऊ शकली नाही. पडेल भावाने मालाची मागणी झाली. त्यात शेतकरी आर्थिक बाजूने भरडला गेला. लॉकडाउनमुळे मालाचा उठाव झाला नाही. त्यात पुन्हा मंध्यतरी वातावरणाच्या बदलामुळे पानगळ मोठ्या प्रमाणात झाल्याने हाती आलेल्या फळाच्या नासाडीची शक्यता दिसू लागल्याने कोराळ येथील प्रगतशीर शेतकरी परमेश्वर जाधव यांनी मोठ्या मेहनतीने पिकविलेल्या पाच एकर पपईची बाग मोडीत काढण्याचे काम सुरू केले आहे.

श्री. जाधव यांनी तीन लाख खर्च करुन पाच एकर क्षेत्रात पपईची बाग फुलवली आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या पपईच्या झाडाला दृष्ट लागण्यासारखी फळे लगडली. जून महिन्यात विक्रीची तयारी सुरू केली. मात्र पपईला सर्वाधिक मागणी असलेली दिल्लीची बाजारपेठ बंद होती. मुंबई व पूणे येथील बाजारपेठेत व्यापाऱ्याची मागणी होती. पण वाहातुकीने स्वतः तेथे माल पोहचवण्याची अट होती. कोरोनाच्या व्यापक संसर्गामुळे श्री. जाधव यांनी तेथंपर्यंत जाण्याची तयारी केली नाही. पाच रुपये किलो दराने लातूरसह स्थानिक बाजारपेठेत पपईची विक्री केली.  

अपेक्षित उत्पन्न होते वीस लाखाचे ; मिळाले पाच लाख रुपये !
श्री. जाधव यांनी २०१८ मध्ये पपईचे उत्पन्न घेतले होते. त्यावेळी प्रति किलो वीस ते बावीस रुपये दराने पपईची विक्री केली होती. मात्र यंदाचा सिझन डबघाईत निघाला. किमान दहा रुपये किलो दर मिळेल असे अपेक्षित होते. तो दरही मिळू शकला नाही. जवळपास १७० टन उत्पन्नातून सतरा ते वीस लाख रुपये मिळतील असे गृहित धरण्यात आले. मात्र लॉकडाउनमुळे परिस्थिती बदलल्याने निच्चांकी दर मिळाला. त्यात मंध्यतरी पंधरा दिवसापूर्वी दहा दिवस पावसाची रिपरिप आणि रोगराईच्या तडाक्याने झाडाची पानगळ सुरू झाली. त्यामुळे लगडलेल्या फळासाठीचे सूरक्षा कवचच निघू गेल्याने फळाच्या नासाडीची चिन्ह दिसू लागली. कच्ची पपईला पाच ते सहा हजार रुपये टनाचा दर मिळतो. पण अडीच हजाराचा दर मिळाला, सध्या त्याची काढणी सुरू आहे. दरम्यान किमान आणखी दोन महिने उत्पन्न सुरू राहिले. मात्र लॉकडाउननंतर पुन्हा आलेल्या नैसर्गिक संकटामुळे बाग मोडीत काढावी लागत आहे. असे श्री. जाधव यांनी सांगितले.

(संपादन-प्रताप अवचार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com