पंतप्रधानांना वेळ मिळेना, दिव्यांग बांधव साहित्यापासून वंचितच!

divyang.jpg
divyang.jpg

अहमदपूर (लातूर) : दिव्यांगाच्या मोफत कृत्रीम साहित्य वाटपासाठी देशाच्या पंतप्रधानांना वेळ मिळत नसल्याने देशभरातील लाखो दिव्यांग बांधव वंचित असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री विभागाच्या माध्यमातून पात्रताधारक दिव्यांगांना मोफत साहित्य मिळत असते. यासाठी देशभरात शिबिर देखील पार पडतात. त्यातून लाभार्थ्यांना साहित्य दिले जाते. मात्र, कोरोना सावटापुर्वी घेण्यात आलेल्या शिबिरातील गरजूंना अद्यापही साहित्याची प्रतीक्षा आहे. विशेष म्हणजे दिव्यांगांसाठी देण्यात येणारे साहित्य प्रत्येक तालूकास्तरावर येऊन पडलेले आहे. मात्र, जोपर्यंत पंतप्रधान प्रातिनिधीक स्वरुपात या साहित्याचे वाटप करण्याचा मुहुर्त लागत नाही. तोपर्यंत देशभरातील दिव्यांगांसाठी असलेले कृत्रीम साहित्य धूळखात पडणार आहे, यात तीळमात्र शंका नाही. 

याबाबत लातूर जिल्ह्याचे उदाहरण समोर आले आहे. प्राप्त माहितीनुसार, भारतीय कृत्रीम अंग निर्माण निगम लिमिटेड, जिल्हा प्रशासन, समाज कल्याण विभाग, लातूर जिल्हा परिषद व लातूर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्यामार्फत दिव्यांगाकरिता तीन चाकी सायकल, कृत्रीम अवयव हात पाय, चाक खुर्ची, सर्व प्रकारच्या काठ्या, श्रवणयंत्र, मोटाराईज्ड सायकल, ब्रेललिपी कीट, स्मार्ट फोन इत्यादी साहित्य मोफत दिव्यांगाना मिळावे यासाठी तालुकास्तरावर शिबीर घेण्यात आले. 

या शिबिरात मतिमंद, अस्थिव्यंग, अंध, मूकबधीर या वर्गातील दिव्यांगाची पुर्वतपासणी झाली. यामध्ये अहमदपूर (1114) , चाकूर (426), रेणापूर (708), लातूर  (3079), औसा (1037), उदगीर, देवणी, जळकोट ( 3017), निलंगा, शिरूर आनंतपाळ ( 2507) असे एकूण 11 हजार 888 लाभार्थ्यांची नोंद झाली. सदर शिबीरात पात्र असणाऱ्या आठ हजार 797 दिव्यांगाना कृत्रीम साहित्य उपलब्ध झाले आहे.

मात्र, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जोपर्यंत या साहित्य वाटपाचा प्रातिनिधीक स्वरुपाचा कार्यक्रम घेत नाही. तो पर्यंत या साहित्याचे वाटप कोठेही करण्यात येऊ नये, असे आदेश सर्व शासकीय यंत्रणेला देण्यात आले आहेत. त्यामुळे साहित्य येऊन पडलेले आहे. त्यामुळे दिव्यांगाना मोफत साहित्य वाटप कधी होणार हा प्रश्न पडला आहे.  

 
दिव्यांगांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम नजीकच्या काळात सर्वात मोठा आहे. या वाटपाच्या शुभारंभासाठी पंतप्रधान व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांच्या एकत्र वेळेची अडचण दूर होत नाही. त्यामुळे दिव्यांगांचे साहित्य तसेच पडून असून दिवसेंदिवस ते खराब होत आहे. कोरोना पार्श्वभूमीवर शारिरीक अंतर पाळाले जावं म्हणून असा कार्यक्रम होत नाही. त्यामुळे दिव्यांग बांधवांना किती दिवस आणखी अडचणींचा सामना करावा लागत आहे. लवकरात लवकर साहित्य मिळावे, अशी मागणी आहे. -उस्ताद शफियोद्दीन अब्दुल रहमान, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र अपंग कामगार कल्याणकारी संघ.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com