धक्कादायक ! सरकारी कंपनीचेच बियाणे भेसळयुक्त, अधिकाऱ्यांचा अहवाल. 

mahabeej.jpg
mahabeej.jpg

उस्मानाबाद : बियाणे उत्पादन करणाऱ्या महाबीज या निमशासकीय कंपनीकडूनच भेसळयुक्त बियाण्याचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे जिल्हा कार्यालयाने पन्नास शेतकऱ्यांचे बियाणी नाकारले असून तसा अहवालही अकोला येथील महाबीज कंपनीच्या मुख्य कार्यालयाला कळविला आहे.

पायाभूत बियाणे चार ठिकाणी तपासणी करूनच शेतकऱ्यांना दिले जात असताना अशी भेसळ कशी झाली? असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना फरकाची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी वर्गातून होत आहे.

एखाद्या नवीन बियाण्याच्या जातीची पैदास झाल्यानंतर त्याचे प्रथम उत्पादन बियाणे कंपनी स्वतःच्या अंतर्गत असलेल्या कार्यक्षेत्रात घेते. बियाणे काढणे पूर्व आणि काढणीनंतर चार वेळा वरिष्ठ अधिकारी त्याची तपासणी करतात. त्याला पायाभूत बियाणे म्हटले जाते. ते बियाणे महाबीज कंपनीकडून विविध जिल्ह्यात ठराविक शेतकऱ्यांना दिले जाते. त्या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन जिल्ह्यातील गुणनियंत्रण पथक पायाभूत बियाणे कसे उगवले? त्यामध्ये काही दोष आहेत का? त्यासाठी लागणारी खताची, पाण्याची मात्रा तपासण्याचे काम करते. पुढे ते बियाणे कंपनीकडे जाऊन सर्टीफाइड बियाणे म्हणून राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना खुल्या बाजारात उपलब्ध करून दिले जाते.

उस्मानाबाद जिल्ह्यात ज्यावेळेला पायाभूत बियाणे अकोला येथील महाबीज कंपनीच्या कार्यालयातून प्राप्त झाले. तेव्हा जिल्ह्यातील काही ठराविक शेतकऱ्यांना ते देण्यात आले. मात्र या पायाभूत बियाणामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ असल्याचा प्रकार जिल्ह्यात उघडकीस आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५० शेतकऱ्यांचे बियाणे नाकारण्यात आले आहे. विशेष म्हणजे तशा प्रकारचा अहवालही जिल्ह्यातील अधिकारी यांनी तयार केला असून तो अहवाल आता वरिष्ठांकडे पाठवला आहे.

विश्वासार्हतेला तडा

महाबीज ही शासनासोबत काम करणारी एक कंपनी आहे. संपूर्ण राज्यामध्ये बियाणे पुरवण्याचे काम याच कंपनीकडून केलं जातं. मात्र आता कंपनीच्या वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी अशा भेसळ प्रकरणाला जबाबदार आहेत. त्यामुळे कंपनीच्या विश्वासार्हतेला तडा जात असल्याची चर्चा शेतकरी वर्गात होत आहे. चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तरावर तपासणी करून हे बियाणे पास केले जाते. त्याला पायाभूत बियाणे म्हणतात. महाबीज कंपनीच्या अकोला येथील मुख्य कार्यालयात याची तपासणी होते. असे असतानाही पास झालेल्या या बियाण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भेसळ कशी आली? याची चौकशी करावी, दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत. 

शिक्षा शेतकऱ्यांना कशासाठी?
पायाभूत बियाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ आली. तेच बियाणं शेतकऱ्यांसाठी बियाणे प्लॉट म्हणून देण्यात आले. यामध्ये कंपनीची पूर्णपणे चूक आहे. मोठ्या प्रमाणात भेसळ असल्याने भेसळ कमी करणार तरी कशी? असा शेतकऱ्यांसमोर प्रश्न होता. या प्रकरणाला अकोला येथील वरिष्ठ अधिकारी जबाबदार असताना त्याचा दोष जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देऊ नये. जरी या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले हे बियाणे खुल्या बाजारात पिक म्हणून विकले तरी त्यांना कंपनीने फरकाची रक्कम द्यावी, अशी मागणी केली जात आहे.


जिल्ह्यात एक हजार ९३४ बिजोत्पादकपैकी ९० बिजोत्पादक शेतकऱ्यांच्या सोयाबीनमध्ये भेसळ आढळून आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात भेसळ असणारे ९० शेतकरी असून त्याचे क्षेत्र २४०.८० हेक्टर आहे. असा अहवाल वरीष्ठांकडे पाठविला आहे.
- मनोज गोजमगुंडे, गुणनियंत्रण अधिकारी, उस्मानाबाद.
 

(संपादन-प्रताप अवचार)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com