लातूर : शहरात गुरूवारपासून (ता.१३) लॉकडाऊन शिथिल करण्यात येत असून दुकान उघडण्यासाठी कोरोना तपासणी करण्याचे बंधन घालण्यात आल्याने तपासणीसाठी व्यापाऱ्यांची गर्दी वाढली. यामुळे येत्या चार दिवसासाठी कोरोना तपासणीचे बंधन शिथिल करण्यात आले असून तपासणी न करता दुकान उघडल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार नाही. यामुळे तपासणीसाठी गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी बुधवारी (ता. १२) रात्री आपल्या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमातून केले.
लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश
कोरोनाचा तपासणीसाठी पूर्वी लोकांत भीती होती. मात्र, दुकान उघडण्यासाठी तपासणीचे बंधन घातल्यानंतर व्यापाऱ्यांची भीती कमी झाली असून त्यांनी तपासणीसाठी गर्दी केली आहे. गुरूवारपासून सुरू होणाऱ्या किराणा, फळे, भाजीपाला, अंडी, मांस विक्रीच्या व्यवसायातील लोकांनी सुरूवातीला कोरोना तपासणी करण्याची गरज आहे. अशा व्यापाऱ्यांना महापालिकेने निमंत्रित केले आहे. मात्र, सर्वच व्यापाऱ्यांनी तपासणीसाठी गर्दी केल्यामुळे अडचण झाली.
पीपीई कीट घालून तासन् तास तपासणीचे काम करणे कठीण आहे. एक पथक जास्तीत जास्त दोनशे व्यक्तींची तपासणी करू शकते. पथकाची ही कार्यक्षमता कायम ठेऊन तपासणीचे काम पुढे चालू ठेवायचे आहे. यामुळे दुकान सुरू करण्यासाठी कोरोना तपासणीचे बंधन चार दिवसासाठी शिथिल करण्यात येत असून तपासणी न करता दुकान सुरू केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार नाही.
तपासणीसाठी आधार कार्ड व दुकानदार असल्याचा पुरावा दिल्यासच तपासणी केली जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी स्पष्ट केले. यापुढील काळात दुकाने सुरूच राहणार असल्याने खरेदीसाठी लोकांनी गर्दी करू नये. घरी कोणाला लक्षणे दिसून येत असतील तर व्यवसाय सुरू करू नका, असे आवाहन श्रीकांत यांनी केले आहे. दरम्यान यंदा गणेशमुर्ती विक्रीच्या स्टॉलला परवानगी देण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आडत व्यापाऱ्यांची पुल टेस्टींग
आडत बाजारातील व्यापारी, हमाल, मापाडी व सर्व घटकांची कोरोना तपासणी केल्याशिवाय बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार नाही. पालकमंत्री अमित देशमुख व सभापती ललितभाई शहा यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार या तपासणीचे नियोजन केले असून औषध विक्रेत्याप्रमाणेच पुल टेस्टींग होणार आहे. पुल टेस्टींगमध्ये एकाच वेळी पाच व्यक्तींची तपासणी करता येते.
पाचपैकी एक पॉझिटिव्ह आला तर पुन्हा सर्वांची तपासणी करावे लागते. सर्वच निगेटिव्ह आले तर तपासणीची गरज नाही. यामुळे मोठ्या संख्येने तपासणी शक्य होते. सध्या पॉझिटिव्ह रूग्ण येण्याचे प्रमाण कमी झाले असून व्यापाऱ्यांत ते दोन टक्के आढळून येत आहे. लोकांनी टीका करण्यापेक्षा प्रशासनाला सहकार्य करावे आणि कोरोनाच्या लढ्यात योगदानही द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले.
Edit- Pratap Awachar
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.