यंदाही पावसानं दगा दिला, रानाकडं जाऊ वाटंना...

कोराळ (जि. उस्मानाबाद) : पाण्यात भिजलेले सोयाबीन काढताना मजूर.
कोराळ (जि. उस्मानाबाद) : पाण्यात भिजलेले सोयाबीन काढताना मजूर.

उमरगा : यंदाही पावसानं दगा दिला... परतीच्या पावसानं पार वाट लावली... रानाची दलदल झालीय नुसती... रानाकडं जाऊ वाटंना झालंय... पिकं तर जाग्यावर सडून गेल्यात... दिवाळीसारका येवढा मोठा सण कसा आला आन्‌ कसा गेला... एक घासही गोड लागला नाही...घरापुडं दिवाबी लावावं वाटलं नाही... आमची ही दिवाळी अंधारात गेलीय..., अशा शब्दांत कोराळ (ता. उमरगा) येथील शेतकरी प्रभाकर सुरवसे यांनी आपली व्यथा मांडली.


तालुक्‍यात यंदा खरीप हंगामातील पिकांचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. खरिपातील सोयाबीनचे क्षेत्र अधिक होते. त्याच्या उत्पन्नावरच शेतकऱ्यांची आशा होती. पण परतीच्या पावसाने चांगल्या उत्पन्नाच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले. अनेकांनी कसेबसे रान मोकळे करण्यासाठी सोयाबीनच्या काढणीला प्रारंभ केला होता; मात्र पावसाने चांगलाच धक्का दिला आणि सोयाबीन रानातच सडले. परिणामी अंकुर फुटल्याने पीक वाया गेले.

कोराळ शिवारातील प्रभाकर सुरवसे यांच्या अडीच एकर क्षेत्रातील सोयाबीनची स्थिती पाहून शेतकऱ्यांनी पिकवलेल्या धान्याचे शेवटच्या टप्प्यात मोठे नुकसान झाले. यासंदर्भात बोलताना श्री. सुरवसे म्हणाले, "शेतकऱ्याला पाऊस कमी आला तरीबी अडचण हाय अन्‌ पाऊस जास्त झाला तरीबी अडचण हाय. आता चांगलं हाताला आल्यालं सोयाबीन या पावसानं पार नासवून टाकलं... रानावरचं सोयाबीन आता पाण्यात हाय. अर्धं रानावरच जाग्यावरच चिखलात रुतून बसलंय. आता काढावं मनलं तर मजूर मिळंनात. मिळाले तर त्येंची मजुरी परवडंना. कसं करावं आता? गेल्या वर्षी तर काय पदरात पडल नाय. कसं तरी वर्ष निघून गेलं. आन्‌ हे खरीपबी वाया गेलं. शेती करावी तर कशी, काय कळंना झालंय. सरकार तर काय मदत करायला तयार नाही. कधी अस्मानी, कधी सुलतानी संकटं आमच्या शेतकऱ्यांच्या नशिबाला कायमचीच हायत. कोणी वाली नाही आम्हाला. नुकसानीचे पंचनामा करा मनले. पळापळ करून कागदं काडलो. पण रानाची दलदल झाल्याय, ही का दिसंना का सरकारला.... बापदादानं कमवून ठेवलेलं कसं तरी जपावं लागतंय अन्‌ दोन घास पोटासाठी मिळवावं लागतं,' अशी व्यथा सुरवसे यांनी मांडली असली तरी बहुतांश शेतकरी आज या परिस्थितीचा सामना करीत आहेत.

पाण्यात अडकलेल्या सोयाबीनच्या काढणीसाठी सोसावी लागणारी कळ शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागत आहे. मात्र प्रशासनाचे कागदी घोडे नाचविण्याचे काम सुरू आहे. एकीकडे सोयाबीन काढून राशीची लगबग, तर दुसरीकडे रब्बी पेरणीला होणाऱ्या विलंबाची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com