उस्मानाबाद : कोरोना मृत्यू तांडव रोखण्यासाठी लोकप्रतिनिधी पुढाकार घेतील का?

corona death.jpg
corona death.jpg

उस्मानाबाद : जिल्ह्यातील हायरिस्क रुग्णांना मुंबईतील आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी मागणी सामान्य वर्गातून होऊ लागली आहे. कोरोनाचा जिल्ह्यातील मृत्यूदर राज्याच्या तुलनेत जास्त असून तो कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आरोग्य प्रशासनातून व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ६०० पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली आहे. यामध्ये आतापर्यंत तब्बल ५९ जणांचा बळी गेला आहे. राज्याच्या तुलनेत हे मृत्युदराचे प्रमाण जास्त आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची संख्याही कमी आहे. तर अनेक डॉक्टर्स पॉझिटिव्ह झाले आहेत. तसेच उच्च दर्जाच्या सुविधा या ठिकाणी मिळत नसल्याने अनेक रुग्णांचे बळी जात असल्याची चर्चा आहे.त्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी त्यांच राजकीय वर्चस्व वापरून जिल्ह्यातल्या हायरिस्क रुग्णांना मुंबई येथील आरोग्य सुविधा मिळवून द्यावी अशी मागणी सामान्य वर्गातून होत आहे.

जिल्ह्यात सध्या शिवसेनेचे खासदार आणि तीन आमदार आहेत. मुंबईतील महापालिका सेनेच्या ताब्यात आहे. महापालिकेने मोठ्या प्रमाणावर रूग्णांसाठी बेड उपलब्ध केले आहेत. मात्र मुंबई येथील रुग्णांची संख्या स्थिर असून महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेले अनेक बेड शिल्लक आहेत. तसेच तज्ज्ञ डॉक्टरही उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी येथील हायरिस्क पेशंटला मुंबईत सुविधा उपलब्ध करून देऊ शकतात.

त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच परंडयाचे आमदार माजी मंत्री तानाजी सावंत पुण्यातील संस्थेच्या माध्यमातून आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देऊ शकतात. आमदार ज्ञानराज चौगुले यांनीही ही स्वतः पॉझिटिव्ह आल्यानंतर मुंबई येथे उपचार घेतले. त्याच पद्धतीचे उमरगा, लोहारा तालुक्यातील हायरिस्क रुग्णांना मुंबई येथे उपलब्ध सुविधा करून द्यावेत अशी मागणी केली जात आहे.

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यांच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेतील उपलब्ध बेड जिल्ह्यातील हायरिस्क रुग्णांना मिळू शकतात. ते मिळवावेत अशी मागणी सामान्य वर्गातून होत आहे. तसेच तुळजापूरचे आमदार माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांच्या संबंधित तेरणा ट्रस्टचे मोठे हॉस्पिटल मुंबईत आहे. तुळजापूर आणि परिसरातील अशा रुग्णांना सह्याद्री हॉस्पिटलमधील उच्च दर्जाची रुग्णसेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी स्थानिक स्तरावरून होऊ लागली आहे. सध्या जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्न करत आहेत. 

आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या वाटप करणे, त्यातून नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे. प्रशासनाकडून जागोजागी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे. अशी कामे केली जात आहेत. जिल्ह्यासाठी ही जमेची बाजू आहे. याशिवाय जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यूदर राज्यांच्या तुलनेत जास्त असल्याने हायरिस्क रुग्णांना मुंबई, पुणे अशा महानगरातील उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या तर मृत्यदर कमी होण्यास मदत मिळेल. अशी मागणी आता सामान्य वर्गातून होऊ लागली आहे. 

Edit By Pratap Awachar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com