BIG NEWS : अरे बाप रे..! २६ मे पासून या जिल्ह्याचे पालकमंत्रीच झाले गायब..!  

shri gadakh.jpg
shri gadakh.jpg

उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सूरु असून पालकमंत्री जिल्ह्याकडे फिरकायला तयार नाहीत. जिल्ह्याचे पालकत्व स्विकारले पण जिल्ह्याला मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या जिवावर सोडून पालकमंत्री गायब असल्याचे दुर्देवाने म्हणावे लागत आहे. एका बाजुला प्रशासन एक हाती कारभार हाकत आहे तर दुसरीकडे जिल्ह्याच्या अनेक गोष्टी मार्गी लागण्याऐवजी अडचणीत भर पडत असल्याचे चित्र आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याचा विचार करता मधुकरराव चव्हाण यांच्यानंतर आलेल्या सर्वच पालकमंत्र्यानी जिल्ह्याची घोर निराशा केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पालकमंत्री म्हणून शंकरराव गडाख यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र त्यांनी जिल्ह्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसुन येत आहे.

बैठकीपुरते जिल्ह्यात काही तासाचा दौरा आटपून मंत्रीसाहेब निघुन जातात. ही प्रथा जिल्ह्याला आता काही नवीन राहिलेली नाही या अगोदरही अशीच पध्दत मागच्या पालकमंत्र्यानी अवलंबिल्याचे दिसुन आले होते. दिपक सावंत, दिवाकर रावते व अर्जुन खोतकर यांच्यानंतर श्री. गडाख यानी या परंपरेला साजेशी कामगिरी केली आहे. या अगोदर दुष्काळी परिस्थिती असायची आता जिल्ह्यासमोर कोरोनाचे संकट उभे आहे. अशा परिस्थितीत पालक म्हणुन पालकमंत्र्याची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. असे असले तरी श्री. गडाख जिल्ह्याला तोंडही दाखवत नसल्याचे चित्र आहे. 

शेवटची बैठक 26 मे रोजी घेण्यात आली असुन त्या बैठकीपुरता त्याचा दौरा करुन ते निघुन गेले. त्यानंतर त्यानी जिल्ह्याकडे पाठच फिरविली. या काळात जिल्ह्याची सुत्र जिल्हा प्रशासनाच्या हातात गेली आहेत, यामध्ये मनाला वाटेल त्या पध्दतीने कारभार सूरु ठेवल्याने जिल्ह्यातील जनतेची कोरोनाच्या काळात फरफट सूरु आहे. 

अर्ध्या रात्री प्रशासन वेगवेगळे आदेश काढत असुन त्यामध्ये सामान्य जनता तर सोडाच पण लोकप्रतिनिधीनांही विश्वासात न घेतल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी कार्यालय भ्रष्टाचाराचा अड्डा झाल्याचा आरोप लोकप्रतिनिंधीकडून करण्यात आला आहे. ज्यांचे हात भ्रष्टाचारात ओले झाले आहेत, त्यांच्या विश्वासावर जिल्ह्यातील जनतेला सोडुन पालकमंत्री काय साध्य करणार हा मोठा प्रश्न आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढत असतानाही गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून कार्यान्वित होणारे कोरोना टेस्टिंग सेंटर अजूनही प्रतिक्षेतच आहे. अशावेळी जिल्ह्यात ठाण मांडून प्रशासकीय यंत्रणेला कामाला लावण्याची आवश्यकता असते. पण या काळातच दुर्लक्ष होत असल्याने जिल्हा प्रशासनाचा मनमानी कारभार जिल्ह्यातील जनतेच्या अंगलट येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालकमंत्री हाजीर हो म्हणण्याची वेळ जिल्ह्यातील जनतेवर आली आहे.

(संपादन : प्रताप अवचार) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com