उस्मानाबाद : पहिल्याच दिवशी शाळांमध्ये जेमतेम उपस्थिती, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

Osamanabad school.jpg
Osamanabad school.jpg

उस्मानाबाद : कोरोना विषाणू संसर्गच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. 23) जिल्ह्यातील शाळांचे वर्ग पुन्हा गजबजले आहेत. नववी ते बारावी या वर्गातील विद्यार्थी सोमवारी शाळेत जाताना पाहायला मिळाले. जेमतेम उपस्थिती असली तरी विद्यार्थ्यांमध्ये मात्र एक वेगळाच उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होता.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
कोरोना विषाणूंच्या संसर्गाने दुसरया टप्यात लॉकडाऊनचे संकेत मिळत असताना राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. गेल्या शैक्षणिक वर्षातील अंतिम परीक्षा झाल्या नाहीत. तर जून मध्ये सुरू होणाऱ्या शाळा पाच ते सहा महिन्यानंतर सुरू होत आहेत. कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला नव्हता. सोमवारी शाळा सुरू झाल्या तेव्हा विद्यार्थ्यांची उपस्थिती जेमतेमच होती. दुसरीकडे शिक्षकच कोरणा बाधित आढळून येत असल्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम होता.  अखेर जिल्हा प्रशासनाने नववी ते बारावी या वर्गांच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शालेय प्रशासन तयारीला लागले होते. दोन दिवसापासून प्रत्येक वर्गाचे निर्जंतुकीकरण केले जात होते. शहरातील अनेक शाळा सकाळी सात, आठ वाजता सुरू झाल्या. त्या वेळेला महाविद्यालयात जेमतेम उपस्थिती दिसत होती. प्रत्येकाची ऑक्सिमिटरने  तपासणी केली जात होती. त्यानंतरच वर्गात प्रवेश दिला जात होता. जर शरिराचे तापमान 95 च्या पुढे जात असेल तर संबंधित विद्यार्थ्यांची चाचणी घेण्याचे निर्देश दिले जात होते. प्रत्येक विद्यार्थ्याला सेपरेट बाकड्यावर बसवले जात होते. काही शाळेमध्ये 50 टक्के तर काही शाळेमध्ये केवळ 30 टक्केच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांमध्ये आनंदोत्सव 
गेल्या सहा महिन्यापासून विद्यार्थ्यांनाही लॉकडाउनचा फटका बसत होता. सातत्याने घरी राहून कंटाळा आला होता. त्यामुळे आता तब्बल पाच ते सहा महिन्याच्या  विश्रांतीनंतर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. लॉक डाऊन मुळे आणि पालकांच्या बंधनामुळे विद्यार्थी चांगलेच वैतागले असल्याचे सांगत होते. दरम्यान मित्र कंपनींना भेटल्यामुळे आणि शाळा सुरू झाल्यामुळे आता बरं वाटतंय, असा सूर विद्यार्थी बोलून  दाखवत होते.

उमरग्यात पहिल्याच दिवशी दहा टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती

कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे तब्बल आठ महिने बंद असलेल्या शाळा सोमवारी (ता.२३) सुरू झाल्या. नऊ शिक्षक व एक शिक्षकेतर कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने शाळा सुरू होण्याबाबतची सांशकता होती मात्र एकुण संख्येच्या दोन टक्के शिक्षक पॉझिटिव्ह असल्याने शाळेच्या पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद अत्यल्प असला तरी येणाऱ्या काळात विद्यार्थी संख्या वाढण्याची शक्यता आहे.


उमरगा शहर व तालुक्यात इयत्ता नववी ते बारावीपर्यंत वर्ग असलेल्या शाळा व उच्च माध्यमिक विद्यालयाची संख्या ६७ आहे त्यापैकी शाळेच्या पहिल्या दिवशी ६० शाळा सुरू झाल्या. शहरातील भारत विद्यालय व छत्रपती शिवाजी कॉलेज येथे दहावी, बारावीचे वर्ग सुरू असल्याने सोमवारी वर्ग घेता आले नाहीत. मुरुमच्या शासकिय वस्तीगृहात कोविड सेंटर आहे. दाळींबच्या ऊर्दु शाळेची पूर्वतयारी नसल्याने आणि स्वामी समर्थ आश्रमशाळा निवासी तर के.डी. शेंडगे इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी आले नसल्याने सात शाळा बंद होत्या. एकुण सोळा हजार ३८० विद्यार्थी संख्येपैकी पहिल्या दिवशी एक हजार ६७१ विद्यार्थी हजर होते. उमरगा शहरात सात हजार विद्यार्थी संख्येपैकी केवळ ६२५ तर मुरूमशहरातील दोन हजार ८२४ पैकी २३९ विद्यार्थी उपस्थित होते. शहरापेक्षा ग्रामीण भागातील शाळेत एकुण पटसंख्येच्या जवळपास पन्नास टक्के विद्यार्थी शाळेत आले.

दरम्यान एकुण ६२३ शिक्षकांपैकी ६१२ शिक्षकांची कोरोना चाचणी झाली त्यात नऊ शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले होते तर १३२ शिक्षकेतर कर्मचाऱ्यापैकी १२३ कर्मचाऱ्यांच्या चाचणीत एक जण पॉझिटिव्ह आला होता. निगेटिव्ह शिक्षकांची संख्या सर्वाधिक असल्याने शाळेच्या पहिल्या दिवशी मिळलेला प्रतिसाद दहा टक्के असला तरी येणाऱ्या कांही दिवसात तो वाढेल असे गट शिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार यांनी सांगितले.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com