सूक्ष्म नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यासामुळे लातूरच्या निलेशची युपीएससीत झेप

nilesh gaikwad.jpg
nilesh gaikwad.jpg

लातूर  : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) वतीने घेण्यात आलेल्या भारतीय प्रशासन सेवेच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता. चार) लागला असून येथील निलेश श्रीकांत गायकवाड याने घवघवीत यश मिळवले आहे. तो राष्ट्रीय पातळीवर ७५२ रँक घेत उत्तीर्ण झाला आहे.

येथील केशवराज विद्यालय व देशिकेंद्र विद्यालयात निलेश गायकवाड याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झालेले आहे. येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व समाजशास्त्र विभागाचे प्रमुख श्रीकांत गायकवाड यांचा निलेश हा मुलगा आहे. लहानपणापासूनच त्याला वडिलांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

 
मुंबईच्या आयआयटीमधून तो केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बी. टेक. आणि एम.टेक. झाला. गॅलॅक्सि सरफेक्टन्स लिमिटेडमध्ये इंटर्नशिप केली. त्यानंतर बेंगलोर येथे 'झीनोव्ह कंन्सलटन्सी कंपनीमध्ये सहयोगी कंन्सलटन्ट म्हणून सेवेत असताना त्यांना आपल्या कार्याच्या मर्यादा लक्षात आल्या आणि त्यानंतर तो युपीएससीकडे वळला. नेतृत्ववृत्ती हा त्यांचा गुण असून आयआयटी मध्ये शिक्षण घेताना तो जनरल सेक्रेटरीपदी निवडून आला होता.

विद्यार्थी जीवनात त्याने निबंध, कथाकथन, वादविवाद, वक्तृत्व, चित्रकला, रंगभरण, प्रश्न मंजुषा, एकपात्री अभिनय, एनसीसी, वैज्ञानिक प्रयोग यामध्ये हिरीहिरीने सहभाग घेतला. तसेच राष्ट्रीय व महाराष्ट्र पातळीवरील प्रज्ञा शोध परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, डॉ. होमी भाभा वैज्ञानिक परीक्षा, नवोदय विद्यालय परीक्षा, स्वयं अध्ययन परीक्षा, सामान्य ज्ञान परीक्षा, गणित या विषयातील पूर्वप्रथमा, प्रथमा, द्वितीया, प्रबोध, सुबोध परीक्षा, इंग्रजी विषयातील एन्टरन्स, प्रायमरी, इंटरमेडियट,  हिंदी विषयातील नागरी बोध परीक्षा, अखिल भारतीय संस्कृत ज्ञान परीक्षा यामध्ये विशेष प्राविण्यही त्याने मिळवत आपली चुणूक दाखवूण दिली होती.

आपली इच्छाशक्ती, आत्मविश्वास, चिकाटी यामधून आपल्यातील उर्मी वाढते. निश्चित संकल्प, योग्य मार्गदर्शन, झोकून देऊन मेहनत करण्याची तयारी, सूक्ष्म नियोजन, त्यानुसार सातत्यपूर्ण अभ्यास केल्याने यश हमखास मिळू शकते. त्यासाठी योग्य प्रकारची रणनीती आखावी लागते. एकदा का आपण यशस्वी झालो की आयुष्यभर मानसन्मान, प्रतिष्ठा मिळते. समाजाचे देणे देता येते, समाजासाठी काही करता येते, असे त्याने सांगितले.

प्रशासकीय सेवेत रूजू होण्याचा एक महत्वपुर्ण राजमार्ग यूपीएससी परीक्षा असली तरी त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात. या परीक्षेत चालू घडामोडींचे सूक्ष्म ज्ञान, सामान्य ज्ञान तपासले जाते. सामान्य ज्ञान हे चालू घडामोडींचे अपडेट्स ठेवल्याने वाढते. त्याअनुषंगाने परीक्षेशी संबंधित संदर्भ साहित्याचा आभ्यास करणे, प्रश्नसंच सोडविण्याचा सराव करणे गरजेचे आहे, असेही त्यांने सांगितले.

स्पर्धा परीक्षेची काठिण्य पातळी वाढत आहे. त्याचे कारण म्हणजे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये होणारी वाढ आहे. अशा स्थितीत केवळ शासकीय नोकरी, बंगला, गाडीचे नुसते आकर्षण असून चालत नाही तर त्यासाठी आपल्या महत्वकांक्षेला योग्य दिशेने गती देता आली पाहिजे. आपण अभ्यासात लक्ष केंद्रित करावयास हवे. सातत्यपूर्ण अभ्यास करूनही प्रसंगी अपेक्षित यश मिळाले नाही म्हणून खचून जाता कामा नये. आपल्यातील उणिवा शोधून त्यात सुधारणा करणे, उत्तर आपणच शोधणे, सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन नव्या जोमाने अभ्यासाला लागणे गरजेचे असते, असे निलेश गायकवाड म्हणाला.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com