चौसाळा (जि. बीड) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन असताना अडकलेल्या ऊसतोड मजुरांना गावी पाठविण्याचा निर्णय झाला असून त्यांचा प्रवासही सुरू झाला आहे; परंतु आता परराज्यातील अडकून पडलेल्या मजुरांसाठी वाली कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
येथील निवारागृहात असलेल्या परराज्यातील मजुरांना आता वीस दिवस उलटले आहेत. विशेष म्हणजे यातील एकाच्या आईचा, तर एकाच्या बहिणीचा मृत्यू झाला आहे. सोडून देण्यात यावे, यासाठी एक दिवस या लोकांनी अन्नत्याग आंदोलनही केले; परंतु त्यांना अद्याप सोडले नाही. प्रशासनाने सोडले तरी ते परराज्यात पोचणार कसे, असा प्रश्न आहे.
बीड-उस्मानाबाद जिल्ह्याची सीमा पार करून उत्तर प्रदेशकडे जाणारे मजुरांचे कंटेनर मांजरसुंबा येथे पकडण्यात आले. त्या कंटेनरमध्ये एकूण ३३ मजूर असून हे उत्तर प्रदेशच्या अलिगढ जिल्ह्यातील आहेत. त्यापैकी चारजण मध्य प्रदेश या राज्यातील आहेत; तसेच त्या सर्वांमध्ये एकच महिला व चार लहान मुलांचा समावेश आहे. प्रशासनाने सदरील मजुरांना चौसाळा येथील कला व विज्ञान महाविद्यालयात क्वारंटाइन करून ठेवले.
या काळात यातील एका मजुराच्या वडिलांचे निधन झाले आहे, तर एकाच्या बहिणीचे निधन झाले असून, एकाच्या मेहुण्याचा मृत्यू झाला आहे. तर एका मजुराची पत्नी प्रसूती झाली असून पंधरा दिवसांच्या लहान चिमुकल्या मुलीच्या डोक्यावर मोठी गाठ आली आहे. त्यांना दवाखान्यात घेऊन जाणारी प्रमुख व्यक्तीच येथे अडकली आहे. त्याचा भाऊ व तो स्वतः येथे आहे. तर गावाकडे वयोवृद्ध आई व पत्नी दोघीच आहेत.
३३ लोकांपैकी अनेकांच्या एक ना अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या सर्वांची प्राथमिक आरोग्य तपासणीही वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास खाकरे व डॉ. अंकुश मंचुके यांनी केलेली आहे; मात्र त्यांना जाऊ देण्याबाबत कुठलाही निर्णय झाला नाही. निर्णय झाला तरी त्यांनी मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशात जायचे कसे, असा प्रश्न आहे.
हेही वाचा - युकेचे पंतप्रधान रुग्णालयात, जनता घरात बसून...
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.