नवी मुंबई महापालिकेचा 10 हजार नागरिकांना दणका; नियम न पाळणार्!यांकडून 33 लाख रुपयांची वसुली

 नागरिकांकडून तोंडावर मास्क न लावण्याचे प्रमाण वाढले आहे.
नागरिकांकडून तोंडावर मास्क न लावण्याचे प्रमाण वाढले आहे.

नवी मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेतर्फे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असताना, बेशिस्तीने राहणाऱ्या नागरिकांचा पालिकेने चांगलाच समाचार घेतला आहे. सरकार नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक जागांमध्ये उपद्रव करणाऱ्या तब्बल 10 हजार नागरिकांना पालिकेने दंड ठोठावला आहे. पालिकेने कारवाई केलेल्यांमध्ये मास्क न लावणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. पालिकेच्या या कारवाईमुळे नियम न तोडणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 

शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आलेख वाढत चालल्याने घरोघरी सर्व्हे करणे, बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेणे, ऍन्टिजेन चाचण्या आणि आरटीपीसीआर चाचण्यांवर भर देणे आदी प्रकारचे प्रयत्न पालिकेतर्फे केले जात आहेत. मात्र, तरीदेखील काही नागरिकांकडून रोज बेशिस्तीचे दर्शन दिसत आहे. भाजीपाला व मासळी बाजार, वाणिज्य संकुले, चहाच्या टपऱ्या, बस डेपो, किरकोळ सामानांची दुकाने आदी सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वैयक्तिक अंतराचा फज्जा उडाला आहे. शिवाय, गर्दीत वावरताना नागरिकांकडून तोंडावर मास्क न लावणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. सध्या हॉटेल सुरू नसल्यामुळे घरोघरी पार्सल पोहोचवणाऱ्या पार्सल बॉयच्या तोंडावरील मास्क गायब झालेला दिसत आहे. 

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी शहरात भरारी पथकांची नेमणूक केली आहे. या भरारी पथकांमार्फत शहरात विविध ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये पालिकेने 10 हजार नागरिकांकडून तब्बल 33 लाख 30 हजार 450 रुपयांचा दंड वसूल केला आहे. दंड वसूल केलेल्यांमध्ये तोंडावर मास्क न लावणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्याखालोखाल सामाजिक अंतर न पाळणाऱ्या नागरिकांचा समावेश होत आहे. 

अवघ्या 15 दिवसांत 70 हजारांचा दंड 
एपीएमसी मार्केटमध्ये वारंवार नियमांचे उल्लंघन होत असल्याने आयुक्त बांगर यांनी 16 सप्टेंबरला भरारी पथकाची नेमणूक केली. तेव्हापासून 30 सप्टेंबरपर्यंतच्या अवघ्या 15 दिवसांत या भरारी पथकाने बेशिस्त नागरिकांवर कारवाई करून तब्बल 70 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. मास्क न लावणाऱ्या नागरिकांकडून 48 हजार 500 आणि अंतर न पाळणाऱ्या 21 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच, भविष्यातही या पथकामार्फत कारवाई सुरू राहणार असल्याचे बांगर यांनी स्पष्ट केले आहे. 

रुग्णसंख्येबरोबरच चाचण्यांत वाढ 
शहरात ज्या वेगाने रुग्णसंख्या वाढत आहे, त्याच वेगाने महापालिकेतर्फे चाचणी केली जात आहे. सध्या शहरात 74 हजार 687 आरटी-पीसीआर चाचण्या, तर एक लाख 19 हजार 240 ऍन्टिजेन चाचण्या केल्या आहेत. महापालिकेने सुरू केलेल्या लॅबमध्ये आत्तापर्यंत 30 हजार 913 चाचण्या झाल्या आहेत.  

(संपादन : उमा शिंदे)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com