मुंबईत रुग्णवाहिकांची मागणी घटली; पालिका करणार 650 रुग्णवाहिका परत...

BEST_ambulance
BEST_ambulance

मुंबई : कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने मुंबईत बेस्टच्या काही मिनी बस रुग्णवाहिकेत बदलण्यात आल्या होत्या. तसेच, रुग्णवाहिका म्हणून वापरण्यासाठी इतर वाहनेही ताब्यात घेण्यात आली होती. मात्र, आता रुग्णवाहिकेची मागणी कमी झाल्याचे कारण देत बेस्टच्या या मिनी बस परत करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. 

सुरुवातीला कोव्हिड रुग्ण वाढत असताना पालिकेकडील रुग्णवाहिका अपुऱ्या पडत होत्या. काही रुग्णांकडून खासगी रुग्णवाहिकाचालकांनी 15 ते 20 हजार रूपये आकारल्याच्याही तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. यासाठी पालिकेने परिवहन आयुक्तांच्या मदतीने विभागाकडून रुग्णवाहिका म्हणून इनोव्हा, महिंद्रा झायलो आणि इतर एमयूव्ही मिळवल्या. त्यासाठी पालिकेने काही ठराविक रक्कमही दिली आहे.  याशिवाय 60 बेस्ट मिनी बसही रुग्णवाहिका म्हणून ताब्यात घेण्यात आल्या होत्या. सध्या अशी 650 वाहने कोव्हिड रुग्णवाहिका म्हणून वापरल्या जात आहेत. आता मात्र काही विभागांकडून इतक्या रुग्णवाहिकांची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले आहे. 

पालिकेवर आर्थिक भार
मुंबईत 24 वॉर्ड असून प्रत्येक वॉर्डमध्ये 18 ते 20 रुग्णवाहिका आहेत. बहुतेक रुग्णवाहिका दिवसातून एक किंवा दोन फेऱ्या करतात. तरीही त्या रुग्णवाहिकांसाठी परिवहन आयुक्तांनी ठरविलेल्या दरांनुसार संपूर्ण दिवसाची रक्कम द्यावी लागते. त्यामुळे पालिकेला मोठा आर्थिक भार सोसावा लागत आहे.

रुग्णवाहिकांची आवश्यकता कमी 
शहरात दररोज 1300 ते 1400 रूग्ण सापडतात. त्यातील केवळ 600 ते 700 रुग्ण रूग्णांसाठी रुग्णवाहिका वापरतात. तर, काही कोव्हिड रुग्णांना होम क्वारंटाईन केले जात आहे. त्यामुळे आता पुर्वीप्रमाणे रुग्णवाहिकांची गरज नसल्याचे सांगितले जात आहे. गरज नसलेल्या रुग्णवाहिका परत करण्यात येणार आहेत. मात्र, गरज असलेल्या ठिकाणी सध्यच्या ताफ्यातील काही रुग्णवाहिका पाठविल्या जातील, असे आरोग्य विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले.

टंचाई निर्माण होऊ नये याची खबरदारी
1 ऑगस्टला लॉकडाऊनचे आणखी निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता अतिरिक्त रुग्णवाहिकांची गरज भासणार नाही. काही प्रभागांत इतक्या मोठ्या संख्येने रुग्णवाहिकांची गरज नसल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या आठवड्यात या विषयी  पालिका आयुक्तांसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहेत. परंतु टंचाई निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त पी. ​​वेलारसू यांनी सांगितले.
---
संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com