अकरावी प्रवेशासाठी चुरस; 'सीबीएसई'च्या गुणदान पद्धतीमुळे 'एसएससी' विद्यार्थी-पालक चिंताग्रस्त

admission
admission

मुंबई : राज्य मंडळाने मागील वर्षी दहावीचे अंतर्गत गुण रद्द केल्यामुळे अकरावीच्या प्रवेशावेळी विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे मंडळाने गुणदान पद्धत जाहीर केली आहे. त्यामुळे नामांकित महाविद्यालयांत अकरावीच्या प्रवेशासाठी राज्य मंडळ आणि सीबीएसई-आयसीएसई मंडळांच्या विद्यार्थ्यांमधील स्पर्धा आणखी वाढणार आहे. त्यामुळे राज्य मंडळाचे विद्यार्थी केंद्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत अकरावी प्रवेशात आणखी मागे पडतील, अशी भीती व्यक्त होत आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य मंडळाची भूगोल वगळता दहावीच्या इतर विषयांची परीक्षा आणि बारावीची परीक्षाही सुरळीत झाली. सीबीएसई, आयसीएसई मंडळांच्या दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू असतानाच लॉकडाऊन जारी झाला. कोरोना महामारीमुळे परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी पालकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. केंद्र सरकार आणि सीबीएसई मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. बारावीच्या विद्यार्थ्यांना कोरोना परिस्थिती निवळल्यानंतर ऐच्छिक परीक्षेचा पर्याय देणार असल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली. 

परीक्षा होणार नसलेल्या विषयांत विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचा फॉर्म्युला केंद्र सरकार व सीबीएसई मंडळाने जाहीर केला आहे. आयसीएसई मंडळाने मात्र अद्याप निर्णय घेतलेला नाही. सीबीएसई व आयसीएसई मंडळांनी दहावीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. सीबीएसईचा निकाल 'बेस्ट-थ्री' म्हणजे जास्तीत जास्त गुण मिळालेल्या तीन विषयांनुसार, तर एसएससीच्या विद्यार्थ्यांचा निकाल दरवर्षीप्रमाणे 'बेस्ट-फाईव्ह' तत्त्वानुसार जाहीर होणार आहे. त्यामुळे एसएससीच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत यंदा सीबीएसई व आयसीएसईचे विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशात अधिक सरस ठरतील. परिणामी एसएससीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल, अशी भीती विद्यार्थी-पालक व्यक्त करत आहेत. 

राज्य शिक्षण मंडळ आणि केंद्रीय मंडळांच्या निकाल जाहीर करण्याच्या पद्धतीत फरक आहे. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशासाठी समान धोरण असायला हवे. यापूर्वी 'बेस्ट 5’ निकष ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे यंदाही निर्णय होणे अपेक्षित आहे, असा सूर शिक्षण क्षेत्रातून उमटत आहे.

अशी आहे गुणदान पद्धती

  • राज्य मंडळ : सहा विषयांतील गुणांची सरासरी काढून भूगोल विषयाचे गुण.
  • सीबीएसई : तीनपेक्षा अधिक विषयांची परीक्षा झालेल्या विद्यार्थ्यांना 'बेस्ट-3’ सरासरीनुसार अन्य विषयांत गुण. तीन पेपर झालेल्या विद्यार्थ्यांना 'बेस्ट-2’ सरासरीने गुण. फक्त एक किंवा दोन पेपर दिलेल्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनानुसार गुणदान.
  • आयसीएसई : अद्याप सरासरी गुण देण्याबाबतचे सूत्र जाहीर नाही.

केंद्रीय आणि राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेतील गुणदान पद्धती वेगवेगळी आहे. सीबीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी त्यांच्या गुणदान पद्धतीचा लाभ होतो. यंदाही या निर्णयाची पुनरावृत्ती होऊ शकते. त्यामुळे राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांवर अकरावी प्रवेशावेळी होणारा अन्याय दूर करण्यासाठी महाविद्यालयात मंडळनिहाय आणि विद्यार्थी संख्येनुसार कोटा द्यावा.
- जालिंदर सरोदे, प्रमुख कार्यवाह, शिक्षक भारती

अकरावी प्रवेशावेळी कोणत्याही मंडळाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे. शिक्षण विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे.
- प्रसाद तुळसकर, पालक

competition for the eleventh admission in CBSE and SSC student-parents worried

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com