3 मे नंतर महाराष्ट्रात काय होणार? उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हमधून सांगितलं की...

uddhav thackeray.
uddhav thackeray.

मुंबई :  3 मे नंतर राज्यातील विविध भागातील परिस्थिती पाहूनच लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल. उद्या (सोमवारी) पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरंसमध्येही यादृष्टीने चर्चा होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सर्वधर्मियांनी देशाप्रति कर्तव्य आणि माणुसकीची भावना दाखवून जो संयम पाळला, तसाच तो पुढेही पाळला तर कोरोनाविरुद्धचा लढा आपण निश्चित जिंकू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ठाकरे यांनी आज दुपारी लाईव्ह प्रसारणाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी  राज्यातील जनतेला अक्षयतृतीयेच्या, मुस्लिम बांधवांना रमझानच्या शुभेच्छा दिल्या. तसेच महात्मा बसवेश्वर जयंती निमित्ताने त्यांनी अभिवादनही केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागात २० एप्रिलनंतर शासनाने काही व्यवहार सुरु करण्यास सशर्त परवानगी दिली. राज्यात शेतीची कामे, शेतमाल तसेच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरुच आहे.  कापूस खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. फळवाहतूक सुरु असून फळे घरपोच देण्याचा  प्रयत्न आपण करत आहोत. महाराष्ट्रात सध्या सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद आहेत, त्या उघडणार नाहीत पण  काही जिल्ह्यांमधील परिस्थितीचा अभ्यास करून तिथे ३ मे नंतर काही मोकळीक देता येईल का याचा निर्णय नंतर घेण्यात येईल.
 
हे वाचाआयडियाची कल्पना! लॉकडाऊनमध्येही त्याने केला मुंबई ते अलाहाबाद प्रवास

घरातच प्रार्थना करण्याचे आवाहन
राज्यात सर्वधर्मियांनी देशकर्तव्य आणि  माणुसकीच्या भावनेला प्राधान्य दिले असून सर्वच सण घरीच साधेपणाने साजरे केले आहेत, याबद्दल मुख्यमंत्र्यांनी धन्यवाद दिले. राज्यातील मुस्लिम बांधवांना रमझानच्या  काळात रस्त्यावर, मशिदीत एकत्र प्रार्थना (नमाज) न करता ती घरातल्या घरात करण्याचे आवाहन त्यांनी केले. आजच्या परिस्थितीत संयम हीच आपली शक्ती आहे, तर आपल्या स्वास्थ्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकून काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, पोलिस हेच आपले देव आहेत, त्यांचा आदर ठेवणे हीच  आपल्यासाठी देवभक्ती असल्याचेही मुख्यमंत्री  म्हणाले.

नितीन गडकरी यांना धन्यवाद
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोणतेही राजकारण न करता महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणयाचे आवाहन केले होते. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी गडकरी यांना धन्यवाद दिले.  इतर राज्यातील कामगार-मजूर  महाराष्ट्रात अडकले आहेत, लॉकडाऊनमुळे ट्रेन सुरु होणार नसल्या तरी केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानंतर  आणि मान्यतेनंतर त्यांना त्यांच्या घरी सुखरुप  पाठवण्याची व्यवस्था केली जाईल, याचा  पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी केला.  

मदत करणाऱ्यांचे आभार
मुख्यमंत्र्यानी टाटा, रिलायन्स, विप्रो, महेंद्र ॲण्ड महेंद्र, बिर्ला, या आणि यासारख्या मोठ्या उद्योजकांनी आपली प्रतिष्ठा बाजूला ठेऊन  राज्याला खुप मदत केल्याचा आवर्जुन उल्लेख केला व त्या सर्वांना धन्यवाद दिले. राज्यातील काही विद्यार्थी  राजस्थान येथे कोट्यात अडकले आहेत त्यांना ही आणण्याची व्यवस्था करण्यात  येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. केंद्राचे पथक आठवडाभरापासून राज्यात असून त्यांना त्रयस्थपणे निरिक्षण करण्याचे तसेच उणिवा असल्यास त्या सांगण्याचे आवाहन आपण केले आहे, त्यांच्या सूचनांचे पालन  करण्याच्या सूचनाही आपण प्रशासनाला दिल्या आहेत, असे ठाकरे म्हणाले.

मुंबई -पुण्यातील वर्दळ परवडणारी नाही
मुंबई आणि पुण्यात लोकांची वर्दळ परवडणारी नाही हे ही त्यांनी स्पष्ट केले. विषाणू घातक असून आपण गाफील राहून चालणार नाही. ८० टक्के लोकांमध्ये कोरोनाचे लक्षणे दिसून येत नाही. त्यामुळे एकमेकांपासून दूर राहणे गरजेचे आहे. २० टक्के लोकांमध्ये हायरिस्क रुग्णांची संख्या अधिक असल्याची  माहिती ठाकरे यांनी दिली.

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
 
विषाणूचा गुणाकार रोखण्यात यश
परिस्थिती कधी बदलणार, लॉकडाऊन कधी  संपणार अशी विचारणा होत आहे. लॉकडाऊनमुळे आपण विषाणूच्या गुणाकाराचा वेग रोखण्यात यशस्वी झालो आहोत. रुग्णांची वाढ आपण नियंत्रणात ठेवली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.  तज्ज्ञांचे मार्गदर्शन, जगभरातील घडामोडींवर आपण लक्ष ठेऊन आहोत. जगभरात आपल्या देशाचे कौतुक होत आहे. आपल्या देशाने धैर्य, संयम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर संकटाचा सामना केला आहे. सर्वांची खबरदारी, संयम, अतुलनीय असल्याचे ही मुख्यमंत्री म्हणाले.

मृत पोलिसांच्या कुटुंबाना मदत
एरवी एखादी घटना घडली तर पोलिस काय करतात, असा सवाल  केला जातो. परंतू आज हेच पोलिस दिवसरात्र सेवा देत आहेत, दुर्देवाने दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, शासन पोलिसांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहीलच, त्यांना सर्व  मदत ही देईल पण कोणावरही पटकन शंका घेऊ नका. कारण पोलिस असतील, डॉक्टर, नर्सेस असतील, आरोग्य कर्मचारी असतील, हे सर्वजण आपल्या स्वास्थ्यासाठी अत्यंत तणावाखाली  काम करत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आरोग्य सुविधांमध्ये वाढ
राज्यातील आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यात आल्याच्या, रुग्णांच्या अलगीकरण आणि विलगीकरणासाठी मोठ्या प्रमाणत व्यवस्था करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हॉटस्पॉट तसेच कंटेनमेंट झोन्सची संख्या  कमी होत असल्याची माहिती त्यांनी दिली.  केंद्रीय पथकाने वरळी कोळीवाड्याच्या कोरोनामुक्तीच्या प्रवासाचे कौतूक केले. महाराष्ट्रात आतापर्यंत १ लाख ८ हजार ९७२ चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी १ लाख १  हजार १६२ लोकांचे नमुने निगेटिव्ह  आले. ३२३ जणांचा दुर्देवाने मृत्यू झाला. राज्यात प्लाझमा थेरपीला परवानगी मिळाल्याचे ते म्हणाले. राज्यात दररोज एक लाखाहून अधिक शिवभोजन थाळीच्या माध्यमातून जेवण उपलब्ध करून दिले जात आहे. साडे पाच ते  सहा लाख स्थलांतरीत मजूर आणि कामगारांची व्यवस्था निवारा केंद्राच्या माध्यमातून केली गेली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com