डोंबिवली - डोंबिवली जुना आयरे रोड परिसरात धोकादायक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले. ही दुर्घटना घडून आठवडा उलटला आहे, मात्र आजही केडीएमसी क्षेत्रात कित्येक कुटूंब अशा धोकादायक इमारतीत धोकादायक वास्तव्य करीत आहेत. पालिका हद्दीत 168 इमारती या धोकादायक घोषित करण्यात आल्या असून या इमारतींना नोटीस पाठविल्या आहेत.
पालिकेची नोटीस येऊन देखील नागरिक आपले रहाते घर सोडण्यास तयार नाहीत. यातील बहुतांश इमारती या पागडी पद्धतीच्या असल्याने मालक भाडेकरु वादात नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. कोणत्याही क्षणी इमारत कोसळू शकते अशी परिस्थिती असतानाही नागरिक रहाते घर सोडण्यास तयार नाहीत.
डोंबिवली पूर्वेतील जुना आयरे रोड परिसरातील आदिनारायण भूवन ही धोकादायक इमारत कोसळून दोन जणांचा त्यात मृत्यु झाला. आठवड्या भरापूर्वी ही घटना घडली असून रहिवासी इमारत खाली करत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे. आदिनारायण भूवन सारख्या अनेक धोकादायक इमारती केडीएमसी क्षेत्रात आहेत.
दोन वर्षापूर्वी पालिका हद्दीतील धोकादायक इमारतींची संख्या ही 600 च्या घरात होती. यावर्षी पालिका हद्दीत 168 धोकादायक इमारत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. धोकादायक इमारतीतील रहिवाशांना घर खाली करण्यास सांगून ती इमारत नंतर जमिनदोस्त करण्याचे काम पालिका प्रशासन करत आहे. मात्र यातील बहुतांश इमारती या पागडी पद्धतीच्या असल्याने मालक भाडेकरु वाद कायम आहे. या वादामुळे नागरिक आपले घर सोडण्यास तयार नाहीत.
आदिनारायण दुर्घटनेनंतर पालिकेने धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची सूचना काढली आहे. दरवर्षी अशा सूचना निघतात परंतू त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी किती होते, त्यातून काय निष्कर्ष काढला जातो. याविषयी मात्र या इमारतीत वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना माहितीच नसल्याचे नागरिक सांगतात.
पालिके वाले येतात नोटीस चिटकवून जातात. परंत आम्ही जायचे कोठे. गेले 25 - 30 वर्षाहून अधिक काळ आम्ही रहात असलेले घर सोडून आम्ही कोठे रहायचे. घरांच्या किंमती पाहील्या तर दुसरे घर घेणे ही गोष्ट सामान्य लोकांच्या आवाक्या बाहेरच गेली आहे. मालकाला आम्ही काही रक्कम दिली आहे, भाडे देत आहोत. इमारत धोकादायक झाली तरी तो भाडे घेणे थांबवत नाही,
उलट त्या भाड्यात वर्षानुवर्षे वाढ होत आली आहे. येथे वास्तव्य करणारे नागरिक गरीब आहे. त्यांनी जायचे कोठे हा प्रश्न असल्याने जो व्हायचे ते रहात्या घरातच होईल याच विचाराने आज तो येथे रहात असल्याचे नागरिक सांगतात. आम्हाला जर ठोस असा काही पर्याय शासनाने दिला तर आम्ही बाहेर पडू. जिवाची भिती आम्हाला पण आहे, पण रस्त्यावर येण्यापेक्षा डोक्यावर गळकं का होईना हक्काचे छत तर आहे भावना नागरिक पोट तिडकीने मांडत आहेत.
पागडी इमारतीतील मालक भाडेकरु वादावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने रहिवाशांना भोगवटा प्रमाणपत्र देऊन त्यांना सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. रहिवाशांनी भोगवटा प्रमाणपत्र घेऊन घरे रिकामी करावित असे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे. परंतू अनेक नागरिकांना याविषयी माहिती नसल्याने ते आजही रहाते घर हातातून जाऊ नये म्हणून जीव मुठीत घेऊन रहात आहेत. यामुळे पालिकेने याविषयी जनजागृती करुन धोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांचे वास्तव्य सुरक्षित करण्यासाठी पावले उचलावित अशी मागणी नागरिक करत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.