खासगी रुग्णालयांनी टाळाटाळ केली अन् रुग्णाचा रिक्षातच तडफडून झाला मृत्यू...

dead body.
dead body.

ठाणे : ठाणे जिल्ह्यासह शहरी भागात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यांचा फटका इतर आजाराच्या रुग्णांना बसत आहे. कोरोनाशिवाय अन्य आजाराच्या रुग्णांकडे आधी कोरोनाचा अहवाल आणा; मगच दाखल करून घेवू, या खाजगी हॉस्पिटलच्या भूमिकेमुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. 

ठाण्यात मानपाडा परिसरात राहणाऱ्या  तरुणाची प्रकृती बिघडल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी धावपळ सुरु केली. शहरातील तीन ते चार खाजगी हॉस्पिटलमध्ये त्याला नेण्यात आले. परंतु व्यवस्थापनाने कोरोनाचा अहवाल आणा; मगच दाखल करु अशी भूमिका घेतली. अखेर जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या दारातच या रुग्णाचा रिक्षात शनिवारी मध्यरात्री एक वाजता तडफडून मृत्यू झाला.

ठाण्यातील घोडबंदर परिसरात मानपाडा येथे राहणाऱ्या एका तरुणाला गेल्या काही दिवसापासून  त्रास सुरु होता. त्यामुळे त्याने एक जुलैला कोरोनाची चाचणी केली होती. परंतु जोपर्यंत कोरोना चाचणी अहवाल येत नाही; तोपर्यंत उपचार करता येणार नाहीत, असे त्याला सांगण्यात आले होते. या कालावधीत शुक्रवारी रात्री त्यांची प्रकृती जास्त खालावली. त्यात त्यांच्या नातेवाईकानी आधी त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी वाहनाची शोधाशोध सुरु केली. 

अखेर एका रिक्षाचालकाला विनंती केल्यानंतर त्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी धडपड सुरु झाली. शहरातील तीन ते चार हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करुन घेण्यासाठी नातेवाईकांनी विनंती केली. आधी कोरोनाचा अहवाल आणा; मग दाखल करु असे त्यांना सांगण्यात आले. अखेर त्यांनी रुग्णाला जिल्हा सरकारी रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर तेथील डॉक्टरांनी तपासले असता, त्यांचा आधीच मृत्यू झाला होता.

नातेवाईकांनीच केला मृतदेह पॅक ? 
ठाण्यातील सिव्हील रुग्णालयात मृतदेह ठेवण्यात आला होता. परंतु, रुग्णांच्या नातेवाईकांना 600 रुपये खर्च करुन प्लास्टिकचे कापड विकत घ्यावे लागले. तेथील कर्मचाऱ्यांनी तुम्हालाच मृतेदह पॅक करावा लागेल असे सांगितले. त्यानुसार नातेवाईकांमधील दोघांनी त्यांचा मृतदेह प्लास्टिकमध्ये पॅक केला. यासंदर्भात, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांना विचारले असता, या घटनेची माहिती मिळताच कर्मचाऱ्याला बोलावून जाब विचारण्यात आला. पाऊस जास्त असल्यामुळे केवळ प्लास्टिक आणण्यास सांगितले. त्यामुळे असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक; काय झालं बैठकीत वाचा सविस्तर...

अंत्यविधीसाठी सहा तास ताटकळत
मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर जवाहरबाग स्मशानभूमीत नेण्यात आला. परंतु तेथे आधीच 10 जणांचे क्रमांक होते. त्यामुळे जवाहरबाग स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यासाठी सुमारे सहा तास ताटकळत राहावे लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com