#CORONA : नोकरी टिकवण्यासाठी धडपड; तर जीवाचीही भीती

File Photo
File Photo

ठाणे : कामावर हजर होण्याचे फर्मान आल्याने दररोज कामावर जात आहोत खरे, परंतु आता कानावर पडणाऱ्या दररोजच्या बातम्यांनी चिंता वाढली आहे. एकीकडे नोकरी जाण्याची भीती; तर दुसरीकडे कोरोनाची लागण होण्याची भीती मनात कायम आहे. दररोज सकाळी कामासाठी बाहेर पडताना एकच विचार येतो, की आपण सुरक्षित घरी येऊ ना? आपल्यामुळे घरच्यांना त्रास होणार नाही ना? आपण काळजी घेतोय पण ती पुरेसी आहे का? कामाच्याच ठिकाणी राहणे योग्य आहे का? पण आपल्यासाठी ती व्यवस्था कोण करणार, असे असंख्य प्रश्‍न मनात आहेत, ज्यांची उत्तरे तर सापडत नाहीत, पण सततच्या चिंतेने डोकेदुखी वाढली आहे.

लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू असून आता पालिका कार्यालय, काही खासगी कार्यालये काही प्रमाणात कर्मचाऱ्यांना पाचारण करून सुरू करण्यात आली आहेत. तसेच अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे, परंतु मुंबईतील रुग्णांचा वाढता आकडा आणि त्यामुळे कल्याण, डोंबिवलीकरांना होणारी लागण यामुळे मुंबईत कामानिमित्त जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मनात चिंतेचे काहूर माजले आहे. याविषयी "सकाळ'च्या प्रतिनिधींनी त्याची मते जाणून घेतली. यामध्ये काही नोकरी टिकवण्यासाठी, महिन्याचे वेतन मिळण्यासाठी; तर कोणी अत्यावश्‍यक सेवेत येत असल्याने व आता जाण्याशिवाय पर्याय नसल्याने कामावर जात आहेत; तर काहींनी आपले भ्रमणध्वनी बंद ठेवून विभाग सील केल्याचे कारण देऊन अद्यापही कामावर जाण्याचे टाळले आहे. 

मी एका खासगी कंपनीत काम करतो. गेल्या महिनाभरापासून कामावर जात आहे. दोन दिवस काम; तर दोन दिवस सुट्टी या पद्धतीने काम सुरू आहे. कामावर हजर न झाल्यास वेतन कपात करण्यात येईल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. घरासाठी कर्ज काढले आहे. घराचा हप्ता भरण्यापुरतेतरी वेतन आले पाहिजे, यासाठी कामावर जात आहे; अन्यथा सध्याची परिस्थिती पाहता न जाणेच पसंत केले असते. 
- आतिष जोशी,
कर्मचारी, खासगी कंपनी 

सरकारी कार्यालयात काम करते. काही दिवसांपूर्वीच कामावर हजर होण्याची सूचना देण्यात आली आहे, परंतु प्रभागच सील केलेला असल्याने बाहेर पडण्यास बंदी आहे. त्यात बसमधून गर्दीतून प्रवास करणे म्हणजे कोरोनाला आमंत्रण देण्यासारखे आहे. अजूनही कामावर हजर झालेले नाही. 
- अंजली चौरासिया,
सरकारी कर्मचारी 

कंपनीने कामावर हजर न झाल्यास पुढे विचार करण्यात येईल असे सांगितले आहे. नोकरी गेली तर पुढे काय करायचे. घराचा हप्ता, विमा कंपन्यांचे हप्ते आहेत. मुलांचे शिक्षण, घरखर्च सारेच कसे भागणार. पुढे दुसरीकडे नोकरी मिळण्याचेही काही खरे नाही. नोकरी टिकवून ठेवण्यासाठीच कामावर जातो. 
- स्वप्नील राजपूत,
कर्मचारी, खासगी कंपनी 

मुंबईत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मुंबईत व्यवस्था करा, असे पालिका आयुक्तांनी मध्यंतरी सांगितले होते. त्यामुळे आपल्यामुळे घरच्यांना त्रास नको, परंतु कंपन्यांनीही तशी व्यवस्था केली पाहिजे. त्यांना तशा सूचना दिल्यास दोन ते तीन दिवस काम करून नंतर एक दिवस घरी येणे पसंत करू, परंतु महिला कर्मचाऱ्यांना थोडा त्रास होईल. काहींची लहान मुले आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत. 
- प्रतीक टाकेकर,
कर्मचारी, खासगी कंपनी

Struggling to keep a job

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com