हे माहितीये का ? | महाराष्ट्रासह 'या' राज्यातही होतं बापलेकांचं सरकार

हे माहितीये का ? | महाराष्ट्रासह 'या' राज्यातही होतं बापलेकांचं सरकार

मुंबई : महाराष्ट्रात  गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्ष, मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटपाला घेऊन मोठ्याप्रमाणात चर्चा सुरू आहेत. त्यातच बापलेकांच्या ठाकरे सरकारला घेऊन देखील चर्चेला उधाण आलं आहे. सध्या मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे महाराष्ट्राची कमान सांभाळात आहेत,  तर त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे 'बापलेकांचे सरकार' म्हणून या सरकारकडे पाहण्यात येतंय. महाराष्ट्रात ही गोष्ट पहिल्यांदाच घडलीये, मात्र अशाप्रकारे बाप-लेकांचे सरकार अनेक राज्यांमध्ये होते.

महाराष्ट्र

महाराष्ट्रात पहिलीवेळ उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या रुपाने बाप-लेकांचं सरकार पाहायला मिळालं. 28 नोव्हेंबर रोजी उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांनी 30 डिसेंबर 2019 रोजी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

तामिळनाडू

तामिळनाडू 2006 ते 2011 मध्ये डीएमके (द्रविड मुनेत्र कझागम) यांचं सरकार होतं. त्यावेळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी होते, तर त्यांचा मुलगा स्टॅलीन यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायतराज अशा खात्यांची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यानंतर 2009 साली त्यांची तामिळनाडूचे पहिले उपमुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली होती. त्यामुळे तामिळनाडूच्या जनतेने 2006 ते 2011 च्या दरम्यान बापलेकांचं सरकार अनुभवलय, असं म्हणता येईल.

आंध्र प्रदेश

2014 साली आंध्र प्रदेशात टीडीपी (तेलगू देसम पार्टी) चे सरकार आले होते. त्यावेळी चंद्रबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या निवडणुकीत त्यांचा मुलगा नारा लोकेश यांनीही निवडणुक लढवली होती, मात्र त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2017 साली चंद्रबाबू नायडू यांनी आपल्या मुलाला विधान परिषदेत घेऊन कॅबिनेट मंत्रीपद दिलं, त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान, पंचायतराज आणि ग्रामविकास ही खाती त्यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यामुळे आंध्र प्रदेशातदेखील चंद्रबाबू नायडू आणि त्यांचा मुलगा नारालोकेश यांच्यामुळे बाप-लेकांचं सरकार पाहायला मिळालं होतं.

पंजाब

तब्बल चार वेळा पंजाब राज्याचे मुख्यमंत्री असेले प्रकाश सिंग बादल आणि त्यांचा मुलगा सुकदिर सिंग बादल यांच्या रुपाने पंजाबमध्ये बाप-लेकांचं सरकार पाहायला मिळालं होतं. शिरोमनी आकाली दल नेते म्हणून प्रकाश सिंग बादल ओळखले जातात. 2009 साली प्रकाश सिंग बादल हे पंजाब राज्याचे मुख्यंमंत्री असताना त्यांचे पुत्र सुकदिर सिंग बादल यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर हीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जोडी 2012 मध्ये देखील पाहायला मिळाली, त्यामुळे हे बाप-लेकांचं सरकार पंजाब राज्यामध्ये दोनवेळा आलं होतं.

तेलंगणा

तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी 2014 साली तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार हाती घेतला. त्याचवेळी त्यांचा मुलगा के. टी. रामाराव हे कॅबिनेट मंत्री होते, त्यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान आणि पंचायत राज ही खाती देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा 2018 साली टीआरएसचं सरकार आलं. त्यावेळी पुन्हा  के. चंद्रशेखर राव हे मुख्यमंत्री तर के. टी . रामाराव हे कॅबिनेट मंत्री होते.

हरियाणा

भारताचे माजी उपपंतप्रधान चौधरी देवीलाल हे दोन वेळा हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री होते. ते दुसऱ्यांदा म्हणजेच 1987 साली मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांचे पुत्र रणजीत सिंह हे देखील कॅबिनेट म्हणून सरकारमध्ये होते. त्यावेळी त्यांच्याकडे कृषीमंत्री पद देण्यात आलं होत.

एकंदरित महाराष्ट्रासोबत हरियाणा, पंजाब, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू या राज्यांनी बाप-लेकांचं सरकार पाहिलं आहे. त्यामुळे घराणेशाहीला घेऊन राज्यात आणि पक्षांतर्गत सुरू असलेल्या वादात शिवेसेनेचाही समावेश झाला आहे, हे नक्की.

WebTitle : these states also has government where father and son were working together

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com