
Uddhav Thackeray : 'दूध का दूध', नाही तुम्ही दुधात मिठाचा खडा टाकला; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पलटवार
Uddhav Thackeray : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल (शनिवार) पुण्यातून उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोमणा मारला होता. तसेच निवडणूक आयोगाच्या (ECI) निर्णयाचे कौतुक केले. निवडणूक आयोगाने 'दूध का दूध, पानी का पानी' केले. सत्यमेव जयतेचा फॉर्म्युला कालच अंमलात आणला आहे, असे अमित शहा यांनी जाहीरपणे म्हटले होते. दरम्यान उत्तर भारतीयांच्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी अमित शाहांवर पलटवार केला आहे.
निवडणूक आयोगाने शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून उद्धव गटात नाराजी आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची भाषा ठाकरे यांनी केली आहे.
अमित शाहांच्या टोमण्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, "अजून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बाकी आहे. दूध का दूध, पानी का पानी झाले नाही तर तुम्ही दुधात मिठ टाकले आहे. मात्र त्याला आम्हाला सुधारायचे आहे. त्या दुधात साखर टाकायला मला तुमची (उत्तर भारतीय) साथ पाहीजे."
आज काही लोक गळ्यात पट्टा बांधून त्यांच्यासोबत (भाजप) गेले, हे बाळासाहेबांनी कधी शिकवलं नाही. माझ्या वडिलांनी अन्यायाविरूद्ध लढायला शिकवले. भाजपला लोकशाही मान्य नाही. सर्व संस्था लांडग्यांसारख्या विरोधकांवर सोडल्या आहेत. मी त्यांना कुत्रा म्हणत नाही कारण कुत्रे प्रमाणिक असतात.
उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र आणि उत्तर भारतीयांचा संबंध जुना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला काशीहून गा.गा. भट्ट आले होते. निवडणूक आयोगाने आमचा धनुष्यबाण हिसकावला. मात्र तुमच्या रुपाने प्रभू श्रीराम माझ्यासोबत आले आहेत. मी आव्हान दिलं आहे. तुम्ही मर्द आहात, या मैदानात मी येतो, मशाल घेऊन. मग पाहू.
राज्यात महाविकास आघाडी झाली. मात्र भाजपनेच काँग्रेससोबत जाण्यास भाग पाडले. पण मी भाजपला सोडलं. हिंदुत्व सोडलं नाही. भाजपचं जे हिंदुत्व आहे, ते आमचं हिंदुत्व नाही. बाळासाहेबांनी सांगितलेलं हिंदुत्व आम्ही मानतो. आमचं हिंदुत्व राष्ट्रीयत्व, असंही उद्धव म्हणाले.