Video - नांदेडला संभाव्य पुराचा धोक्यामुळे सतर्कतेचा इशारा

नांदेड ः पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पूरपरिस्थितीसंदर्भात शुक्रवारी आढावा बैठक घेतली.
नांदेड ः पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पूरपरिस्थितीसंदर्भात शुक्रवारी आढावा बैठक घेतली.

नांदेड - मराठवाड्यातील जायकवाडी व माजलगाव प्रकल्प क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यामुळे गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. त्याचबरोबर सिद्धेश्वर, येलदरी या प्रकल्पाचेही पाणी नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे नांदेडला संभाव्य पुराचा धोका टाळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी (ता. १७) दुपारी पूरपरिस्थिती आणि उपाययोजना संदर्भात आढावा बैठक घेतली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनात पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन, नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार, आमदार अमर राजूरकर, मोहन हंबर्डे, श्यामसुंदर शिंदे, आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि संबंधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते. 

नांदेडला सतर्कतेचा इशारा
मुळा तसेच जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यामुळे गुरूवारी (ता. १७) रात्री दहा वाजल्यापासून टप्याटप्याने एक लाख क्युसेक्स विसर्ग गोदावरीत सोडण्यात आला आहे. तसेच माजलगाव प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यामुळे गुरूवारी (ता. १७) रात्रीपासून टप्याटप्याने ४२ हजार नऊशे क्युसेक्स विसर्ग सिंदफना नदीत सोडण्यात आला आहे. तसेच पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी आणि सिद्धेश्वर पाणलोट क्षेत्रातही सतत पाऊस पडत असल्याने पाच हजार ८२४ क्युसेक्स विसर्ग चालू आहे. या सर्व नद्यांचे पाणी गोदावरी नदीला मिळते. त्यामुळे नांदेड शहरात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून त्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. 

पोचमपाड धरणही भरले
सद्यस्थितीत नांदेड शहराच्या खालील बाजूस तेलंगणा राज्यातील पोचमपाड धरणसुद्धा शंभर टक्के भरले आहे. तेथून दीड लाख क्युसेक्स विसर्ग चालू आहे. पोचमपाड प्रकल्प शंभर टक्के भरला असल्यामुळे गोदावरी नदीत फुगवटा (बॅकवॉटर) निर्माण होतो. त्या दृष्टीने दोन्ही राज्याच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवावा आणि पुरपरिस्थिती निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी दिल्या. तसेच नांदेड शहरात आणि नदीकाठच्या गावांना पुराचा धोका होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. याबाबत तेंलगणातील निजामाबादचे जिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधून पत्र दिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिली. 

विष्णुपुरीचे सहा दरवाजे उघडले
गोदावरी नदीवरील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे शुक्रवारी (ता. १८) सहा दरवाजा उघडण्यात आले असून त्यातून ८५ हजार क्युसेक्स वेगाने विसर्ग चालू आहे. विष्णुपुरी प्रकल्पात जायकवाडीचे पाणी शुक्रवारी रात्री येणे अपेक्षित आहे. त्यामुळे नदीमधून येणारा येवा जास्त असला तरी विष्णुपुरी प्रकल्पाद्वारे तो नियंत्रित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील व विसर्ग नियंत्रित केला जाईल, अशी माहिती नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार यांनी दिली.

नांदेडला ३४४ मीटरवर पातळी
जायकवाडी, माजलगाव, पूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पूरपरिस्थिती कायम राहिल्यास गोदावरी नदीची पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. सध्या नांदेड शहरातील देगलूर नाका येथे असलेल्या जुन्या पुलावर पाणीपातळी ३४४.६४ मीटर इतकी आहे. पूराची इशारा पातळी ३५१ मीटर आहे तर धोक्याची पातळी ३५४ मीटर इतकी आहे. इशारा पातळीचा विसर्ग हा दोन लाख १३ हजार क्युसेक्स तर धोका पातळीचा विसर्ग हा तीन लाख नऊ हजार ७७४ क्युसेक्स आहे. त्यामुळे त्या दृष्टीने सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. 

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
त्याचबरोबर उर्ध्व पैनगंगा प्रकल्प, उर्ध्व मानार प्रकल्पही शंभर टक्के भरले आहेत. त्यामुळे त्यांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस किंवा अतिवृष्टी झाल्यास पाणी नदी सोडण्यात येणार आहे. तसेच गोदावरी, पैनगंगा, पूर्णा, मानार नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com