या प्रकल्प कार्यक्षेत्रात एक जून ते आतापर्यंत फक्त ९६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. प्रकल्पातील पाण्याची पातळी ५९७ मीटर आहे.
कुडित्रे : तहानलेल्या कोल्हापूर शहरवासीयांना कुंभी मध्यम प्रकल्प (Kumbhi Project) आधारवड ठरला आहे. सध्या सुरू असलेल्या टंचाईवर मात करण्यासाठी या प्रकल्पातून दररोज सुमारे ३०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे; मात्र आता या प्रकल्पात फक्त ०.८६ टीएमसी एवढाच पाणीसाठा उरला आहे.
त्यामुळे शहरवासीयांना पाणी जपूनच वापरावे लागणार आहे. पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. राधानगरी, काळम्मावाडी धरणात (Radhanagari Kalammawadi Dam) अल्प साठा असल्याने ग्रामीण भागासह, कोल्हापूर शहरामध्ये पाणीटंचाई आहे. शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सोमवारपासून सुरू झालेला आहे.
अशा बिकट प्रसंगी कुंभी मध्यम प्रकल्पाने कोल्हापूरला तारले आहे. कुंभी (लखमापूर ता. गगनबावडा) मध्यम प्रकल्प २००० मध्ये बांधला. प्रकल्पात ७६.८८ दशलक्ष घनमीटर म्हणजे २.७१ टीएमसी पाणी साठते. या प्रकल्पावर नऊ हजार हेक्टर भिज क्षेत्र आहे. तसेच गगनबावडा ३४, पन्हाळा २२, तर करवीर तालुक्यातील ८ गावे शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत.
कोल्हापुरात पाणीटंचाई निर्माण झाल्यास या प्रकल्पातून पाणी सोडले जाते. हे पाणी कुंभी, भोगावती, पंचगंगा नदीतून ५६ किलोमीटरचा प्रवास करीत कोल्हापूरला येत आहे. यासाठी दररोज पॉवर हाऊसमधून ३०० क्युसेक पाणीपुरवठा केला जात आहे; मात्र आता प्रकल्पात ०.८६ टीएमसी इतकाच पाणीसाठा उरला.
या प्रकल्प कार्यक्षेत्रात एक जून ते आतापर्यंत फक्त ९६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. प्रकल्पातील पाण्याची पातळी ५९७ मीटर आहे. परिसरात अणदूर, कोदे, वेसरफ प्रकल्प आहेत; मात्र हे प्रकल्प लहान असून यांचे पाणी कोल्हापूरला देता येऊ शकत नाही, अशी माहिती पाटबंधारे सूत्रांनी दिली.
ग्रामीण व शहरी लोकसंख्या पाहता गगनबावडा तालुक्यात आणखी प्रकल्प करावे लागतील; अन्यथा सर्वांना मोठ्या भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. धरणांमधील गाळ काढून पाणी साठा वाढवावा लागेल, याकडे गंभीरपणे लक्ष वेधले पाहिजे.
कुंभी प्रकल्प तसेच भोगावती नदीतील पाण्यामुळे महापालिकेच्या बालिंगा व शिंगणापूर उपसा केंद्रांजवळ पुरेशी पाणी पातळी आहे. पण दोन दिवस प्रतिदिन एक फुटाने त्यात घट होत आहे. यापूर्वी दररोज पाणीपुरवठा केला जात असताना जवळपास १७० एमएलडी पाणी उपसले जात होते; पण दिवसाआड नियोजनामुळे जवळपास १५० एमएलडी पाणी उपसा होत आहे. शिंगणापूर उपसा केंद्र २४ तास सुरू असून बालिंगा उपसा केंद्रातील दोन पंप कायम सुरू असून तिसरा पंप बंद-सुरू केला जात आहे, अशी माहिती महापालिका जल विभागातर्फे आज देण्यात आली.
कुंभी मध्यम प्रकल्पात ०.८६ टीएमसी पाणीसाठा असून, कोल्हापूरला रोज ३०० क्युसेक पाणीपुरवठा केला जातो. आणखी ३० दिवस पाणी पुरेल इतका पाणी साठा आहे.
- अजिंक्य पाटील, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.