साखर मूल्यांकनात 'इतक्या' रुपयांची घट; खुल्या बाजारातील साखर दर घसरल्याने राज्य बॅंकेचा निर्णय
राज्य बॅंकेच्या निर्णयाचा दूरगामी विपरित परिणाम या हंगामाबरोबरच पुढील हंगामाला बसण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर : खुल्या बाजारात साखरेचे दर घसरल्याने आता महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेनेही (Maharashtra State Cooperative Bank) साखरेच्या मूल्यांकनात १०० रुपयांनी घट केली आहे. दोनच महिन्यांपूर्वी साखरेचे मूल्यांकन ३४०० रुपये केले होते. आता दोन मार्चपासून हे मूल्यांकन ३३०० रुपये असेल. नव्या मूल्यांकनानुसार कारखान्यांना प्रति क्विंटल २९७० रुपये इतकी उचल मिळेल. राज्य बॅंकेच्या या निर्णयामुळे कारखान्यांच्या अडचणीत वाढच होणार असल्याची प्रतिक्रिया साखर उद्योगातील (Sugar Industry) तज्ज्ञांनी दिली.
केंद्र अजूनही साखरेच्या ‘एमएसपी’त वाढ करण्यास तयार नाही. सातत्याने वाढीव कोटे कारखान्यांना (Sugar Factory) देत आहे. साखर मुबलक प्रमाणात बाजारात असल्याने साखरेच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य बॅंकेने हा निर्णय घेतल्याने साखर कारखाना वर्तुळात अस्वस्थता पसरली आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात हा निर्णय घेतल्याने शेवटच्या टप्प्यातील उसाच्या बिलावर याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. ही बिले विलंबाने मिळण्याची शक्यता असल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात आले.
२०२० पर्यंत राज्य बॅंक दर तीन महिन्याला साखर दराचा आढावा घेऊन मूल्यांकन ठरवत होती. यामुळे साखरेचे दर घसरल्यास त्याचा फटका कारखान्यांना बसत होता. २०२० ला मात्र किमान विक्री इतकी किंमत गृहीत धरून साखरेचे मूल्यांकन ३१०० रुपये केले. यानंतर साखरेच्या दरात चढ-उतार होत राहिले. परंतु बॅंकेने कोणताच निर्णय घेतला नव्हता. काही कारखानदारांनीही मूल्यांकन वाढविण्याबाबत बॅंकेला विनंती केली होती. अखेर तीन वर्षांनी सकारात्मक हालचाली करताना बॅंकेने १ जानेवारीपासून २०२४ पासून मूल्यांकन वाढविले.
तत्पूर्वी बॅंक प्रशासनाने साखर संघाकडून साखर उत्पादनाला येणारा खर्च, मिळणारी किंमत याचा लेखाजोखा मागवला. व्यवस्थापन खर्चात वाढ झाल्याने अनेक कारखान्यांना एफआरपी देताना अडचणी येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बॅंकेने मूल्यांकनवाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर केवळ दोन महिन्यांतच मूल्यांकन शंभर रुपयांनी कमी केले. व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे यांनी मूल्यांकन घटीचे पत्र कारखान्यांना पाठविले आहे.
कारखान्यांना बसणार फटका
अनेक कारखान्यांनी यंदा साखरेचे उत्पादन कमी होणार असल्याने भविष्यात साखरेचे दर वाढतील, या अपेक्षेने उत्पादकांनी ‘एफआर''पीपेक्षाही जादा दर दिला आहे. अशा कारखान्यांची या निर्णयामुळे गोची होण्याची शक्यता आहे. सध्या अनपेक्षितपणे वाढणारे साखर उत्पादन, केंद्राच्या हस्तक्षेपामुळे कमी झालेल्या किमती यामुळे साखर दरात वाढ होण्याची शक्यता धूसर बनली आहे. केंद्राने इथेनॉलकडेही अतिरिक्त साखर वळविण्यास हिरवा कंदील दाखवला नाही. एफआरपीत ही वाढ केली. साखर विक्री न होता तशीच शिल्लक राहिल्यास पुढील हंगामावरही याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींमुळे कारखाने शॉर्टमार्जिनमध्ये येऊ शकतील, अशी भीती साखर उद्योगाला आहे.
‘बॅंकेच्या नव्या निर्णयामुळे ऊस बिलासाठी अतिरिक्त खर्च वजा जाता प्रतिक्विंटल केवळ २१२० रुपये शिल्लक राहणार आहेत. याशिवाय जर या कमी केलेल्या उचल दरामुळे अपुरा दुरावा निर्माण झाल्यास ती रक्कम प्रथम वसूल करून मग उरणारी रक्कम ऊस बिलासाठी आदा होणार आहे. त्यामुळे या शिल्लक रकमेतून एफआरपी कशी द्यायची, असा प्रश्न आहे. हा निर्णय म्हणजे आगीत तेल ओतण्याचाच प्रकार आहे.
-पी. जी. मेढे, साखरतज्ज्ञ
राज्य बॅंकेच्या निर्णयाचा दूरगामी विपरित परिणाम या हंगामाबरोबरच पुढील हंगामाला बसण्याची शक्यता आहे. साखरेला उठाव नसल्याने कारखाने अडचणीत असताना बॅंकेचा निर्णय कारखान्यांच्या चिंतेत भर टाकणारा आहे.
-विजय औताडे, साखरतज्ज्ञ
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.