Video : अथक परिश्रम आणि भरघोस खर्च करूनही पदरात फक्त अश्रुच

Video : अथक परिश्रम आणि भरघोस खर्च करूनही पदरात फक्त अश्रुच

भिलार (जि. सातारा) : जागतिक बाजारपेठेतील मंदी, सातत्याचे ढगाळ वातावरण, पाऊस आणि आता कोरोनाचा फटका अशा चौफेर संकटाने स्ट्रॉबेरी उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. कोरोनाने स्ट्रॉबेरी हंगाम आर्थिक गर्तेत सापडला असताना परदेशातून रोपे आली नाहीत, तर पुढील वर्षीचा हंगामही धोक्‍यात येणार आहे. त्यादृष्टीने शासनाने उपाययोजना केल्यासच स्ट्रॉबेरी उत्पादक तग धरू शकेल. 
महाबळेश्वर तालुक्‍यात 2,600 एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी उत्पादन घेतले जाते. तालुक्‍यातील लिंगमळा, मेटगुताड, अवकाळी, भिलार, गुरेघर, खिंगर, राजपुरीबरोबरच तळदेव आणि कुंभरोशी परिसर, तसेच अलीकडे वाई, जावळी, कोरेगाव तालुक्‍यांतही मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते. 


स्ट्रॉबेरी हंगाम सुरू होण्याअगोदरच जोरदार पाऊस झाल्याने स्ट्रॉबेरी रोपवाटिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातूनही शेतकऱ्यांकडून स्ट्रॉबेरीची लागवड केली होती. लागवड झाल्यानंतर पुन्हा पाऊस झाल्याने स्ट्रॉबेरी पाण्याखाली गेली. लागवड झालेल्या क्षेत्रापैकी दहा टक्के क्षेत्रावरील रोपे खराब झाली. ही रोपे खराब झाल्यामुळे लागवडीचे क्षेत्र घटले. त्यानंतर वातावरणात वारंवार बदल झाल्यामुळे स्ट्रॉबेरी पिकावर हानीकारक परिणाम झाले. त्यातच ऐन हंगामास गती आली असतानाच वन्यप्राण्यांनी स्ट्रॉबेरी शेतीचे मोठे नुकसान केले. 


कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या चर्चांमुळे महाबळेश्वर, पाचगणीला येणाऱ्या पर्यटकांवर परिणाम झाल्याने स्ट्रॉबेरीवर विक्रीवर त्याचा परिणाम झाला. मागणी कमी आणि पुरवठा जास्त झाल्याने स्ट्रॉबेरी शिल्लक राहू लागली. वाहतूक यंत्रणा बंद झाल्याने स्ट्रॉबेरी बाहेर पाठवता येत नाही. सध्या वाहतूक यंत्रणा पूर्णपणे बंद केल्यामुळे स्ट्रॉबेरी बाहेर जाणे बंद झाली आहे. स्ट्रॉबेरीचा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच फळे विक्री करता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी तोडणी बंद केली आहे. स्ट्रॉबेरीच्या फळांमुळे शेती लालीलाल दिसून येत आहे. अशीच अवस्था राहिल्यास स्ट्रॉबेरी काढून टाकावी लागणार आहेत. 

बाजारपेठ बंद झाल्याने फटका 

लॉकडाउनने बाजारपेठ बंद आहे. मुंबई, पुणे, सूरत इतरत्र जाणारा मालही थांबला आहे. स्थानिक पाचगणी, महाबळेश्वर ही हक्काची गिरिस्थानेही पर्यटनासाठी बंद झाल्याने आणखी मोठे संकट शेतकऱ्यांवर कोसळले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी मालही तोडला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला. डोळ्यासमोर माल सडत असताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी येत आहे. अथक प्रयत्न आणि भरघोस खर्च करूनही हाती काहीच येत नसल्याने शेतकरी पूर्ण हतबल झाला आहे. 

रोपे आणण्यात अडचणी 

कोरोनाने स्ट्रॉबेरी व्यवसाय पूर्णपणे गिळंकृत केला असताना कोरोनाचे घोंघावणारे वादळ केव्हा थांबेल, याचा नेम नाही. त्यामुळे पुढील हंगामही धोक्‍यात आला आहे. परदेशातून कॅलिफोर्निया, स्पेन, इटली या देशांतून लागवडीसाठी येणारी टिश्‍यू कल्चरची रोपे या वर्षी येतील की नाही, याची चिंता आहे. त्यामुळे रोपे आली नाही तर पुढच्या वर्षीचा हंगाम होणारच नाही. 

साहेब शेती शिवाय मजा नाय

कोरोनासाठी हवे 21 लाख कोटींचे पॅकेज : पृथ्वीराज चव्हाण

चक्क कोरोना संशयितासमवेतच डोहाळ जेवण

सलून व्यावसायिक आणि त्यांच्या ग्राहकांसाठी महत्वपुर्ण बातमी

ग्राहकांच्या साेयीसाठी आणि महावितरणला मदत हाेईल अशा प्रकारे एकमेकांना साह्य करण्याची आत्ताच वेळ आहे. सविस्तर जाणून घ्या 

उत्पादकांचे सुमारे 200 कोटींचे नुकसान 

स्थानिक बाजारपेठा ठप्प झाल्याने सुमारे 40 ते 45 कोटींचे स्ट्रॉबेरीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याला हा जास्तीतजास्त उत्पन्नाचा बंपर हंगाम असतो; पण तोही कोरोनाने पळवल्याने शेतकरी पूरता आर्थिक गर्तेत सापडला आहे, असे किसन भिलारे यांनी सांगितले. दर वर्षी एकरी 10 ते 12 टन उत्पन्न शेतकरी मिळवतो. सर्व उत्पादकांचा विचार करता स्ट्रॉबेरी उत्पादकांचे 200 कोटींचे नुकसान झाले आहे, असे गणपत पार्टे यांनी सांगितले. 


कोरोनाने स्ट्रॉबेरी हंगाम आर्थिक गर्तेत सापडला असताना पुढील हंगामही परदेशातून रोपे आली नाहीत तर धोक्‍यात येणार आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांचे न भूतो न भविष्यती असे नुकसान झाले आहे. 
- बाळासाहेब भिलारे, अध्यक्ष, स्ट्रॉबेरी ग्रोव्हर्स असोसिएशन 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com