बारामती : 'माझं तोंड उघडलं, तर फार वाईट होईल, त्यामुळे ते उघडायचं कधी ते मी ठरवणार आहे, पण बारामतीकरांना एवढंच सांगणं आहे की, कधी कलंक म्हणून जगू नका, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
'देशाची आणि राज्याची जी परिस्थिती झालेली आहे, ती पाहिल्यानंतर सत्तेत गेल्याशिवाय मार्ग नाही. लोकांचे प्रश्न सत्ता असल्याशिवाय सोडवू शकणार नाही, त्यामुळे सत्तेत जाण्याचा चंग आम्ही बांधलेला आहे,' असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. बारामतीमधील वंचितचे उमेदवार अविनाश गोफणे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
अॅड. आंबेडकर म्हणाले, 'बारामती जिल्हा व्हावा न व्हावा याची चर्चा मी गेले वीस वर्षे ऐकतोय, पाणी कुठून कसं पळवलं गेलं, याचीही मला जाणीव आहे. तरीही 42 गावे पाण्यापासून वंचित आहेत, ही वस्तुस्थिती आहे. या 42 गावांनी काय पाप केलंय? हे माहिती नाही. मी या गावामध्ये गेलोही नाही आणि गावकऱ्यांना भेटलेलोही नाही. आम्ही सत्तेचा चंग बांधलेला असल्याने बारामतीकरांनी आता सावध व्हावं, असा इशारा मी देऊ इच्छितो.
या 42 गावांना कधीही पाणी आणता आलं असतं अशी परिस्थिती आहे, आम्ही सत्तेत येवो अथवा न येवो, या भागाच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करु, अशी ग्वाही अॅड. आंबेडकरांनी दिली.
टाटांच्या धरणातील पाणी वीजनिर्मितीऐवजी शेती आणि पिण्यासाठी वापरले जाऊ शकते, त्यामुळे हा प्रश्न सोडविणे अवघड नाही, असे ते म्हणाले. पाच टक्के वीज अतिरिक्त असताना पाण्यापासून वीजनिर्मिती हा गुन्हा आहे, असं मी मानतो. सत्तेत आलो, तर हे पाणी नक्की टंचाईग्रस्त गावांना देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.
नदीजोड प्रकल्पाला विरोध असतानाही मुख्यमंत्री नदीजोड प्रकल्पाचे समर्थन करतात, हे योग्य नाही. धरणातील पाण्याचे पुर्ननियोजन गरजेचे आहे. युती किंवा आघाडीनेही हे केले नाही. हा धोरणात्मक निर्णय वंचित घेऊ शकते, असे ते म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.