सलील उरुणकर:
‘पेटीएम’च्या (वन ९७ कम्युनिकेशन्स प्रा. लि.) विरोधात रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जानेवारी महिन्याच्या अखेरीस घेतलेल्या एका निर्णयामुळे भारतातील स्टार्ट-अप विश्वात उठलेले वादळ अजूनही शमलेले नाही. पेटीएम पेमेंट्स बँकेवर (पीपीबीएल) घातलेल्या निर्बंधांमुळे ‘पेटीएम’च्या नव्या ठेवी, टॉप-अप, फास्टॅग, वॉलेट, यूपीआय, रक्कम हस्तांतर आणि अन्य प्री-पेड सेवांवर परिणाम झाला आहे.
आरबीआयने २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत झालेल्या सर्व व्यवहारांची सेटलमेंट १५ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेशही दिले आहेत. आरबीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे ‘पेटीएम’सह अन्य फिनटेक स्टार्ट-अप कंपन्यांवर परिणाम झाला आहे हे निश्चित; पण यातून मार्ग काढण्यासाठी नवउद्योजक कसा विचार करत आहेत, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.