अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ
पावसाळा सुरू झाला, की सर्वांना भटकंतीचे वेध लागतात. पाऊस व हिरवागार निसर्ग अनुभवण्याची सर्वांचीच इच्छा असते. सह्याद्रीमध्ये घाटमाथ्यावर जोरदार पाऊस कोसळत असतो. या उत्साही वातावरणात मंडळी पावसाळी पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात.
पाऊस जसा जोर धरतो तसे नद्या, नाले दुथडी भरून वाहत असतात, धबधब्यांच्या जोर वाढतो. गड किल्ल्यांवर, डोंगरांवर दाट धुके असते. त्यामुळे पावसाळ्यात पर्यटन करताना खूप काळजी घेणे आवश्यक असते. पावसाळी पर्यटन स्थळांवर काळजी घेतली नाही तर अपघात होण्याची शक्यता असते. हे अपघात काही वेळेस मानवी चुकांमुळे तर काही वेळेस नैसर्गिक आपत्तींमुळे होतात.
असे अपघात टाळण्यासाठी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने काही सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. पावसाळ्यात भटकंती करताना काय काळजी घ्यावी, भटकंतीत कोणते धोके असू शकतात यासंदर्भाने पावसाळी पर्यटन करणाऱ्या सर्वांनीच या सूचना वाचाव्यात व सर्व सूचनांचे पालन करून आपल्या पावसाळी भटकंतीचे योग्य प्रकारे आयोजन करावे.
पावसाळ्यातील ट्रेक करताना घ्यावयाची काळजी
ओळखीच्या व अनुभवी ग्रुपसोबत ट्रेकला जावे.
ट्रेकमधील भटक्यांची संख्या मर्यादित व नियोजन करता येईल एवढीच असावी.
ग्रुपकडे प्रथमोपचाराचे (First Aid) साहित्य असावे.
ट्रेक कुठे, किती दिवसांचा आहे व लीडर/ ग्रुप यांची माहिती घरी/ जवळच्या व्यक्तीस द्यावी.
आयत्यावेळी ट्रेकमध्ये बदल केला तर त्याबद्दल संबंधितांना कळवावे.
पावसाचा अंदाज पाहून ट्रेकचे नियोजन करावे.
सोबत जास्तीचे कोरडे पदार्थ ठेवावे. आपत्कालीन स्थितीत त्याचा उपयोग होतो.
सोबत असणारे सर्व साहित्य प्लॅस्टिक बॅगमध्ये टाकून चांगले पॅक करून सॅकमध्ये टाकावे. ते ओले होणार नाही याची दक्षता घ्यावी.
ट्रेकमध्ये ग्रुपचा पहिला सदस्य (First Man) व शेवटचा सदस्य (Last Man) यांच्या मधेच चालावे.
ट्रेक एक दिवसाचा असला तरी सोबत चांगला टॉर्च ठेवावा.
आवश्यक वाटल्यास स्थानिक वाटाड्या (गाइड) सोबत घ्यावा.
पावसाळ्यात धुक्यामुळे वाट चुकण्याची शक्यता असते. धुक्यात वावरताना सावधानता बाळगावी.
आधारासाठी काठी (Walking Stick) सोबत ठेवावी, त्यामुळे चढणे, उतरणे व चालणे सोपे होते.
किल्ल्यांवरील तट, दरवाजे, अन्य अवशेषांवर चढू नये. एखादा सुटलेला दगड निसटून अपघात होऊ शकतो.
शेवाळलेल्या जागा व पायऱ्यांवर जपून चालावे.
आपत्कालीन स्थितीत उपयोग व्हावा, म्हणून मोबाईल जपून वापरावा.
अवघड ठिकाणी फोटो किंवा सेल्फी घेणे टाळावे.
या ठिकाणांवर शहरी गोंगाट करू नये.
किल्ल्यांवर, जंगलात, धबधब्यांजवळ कचरा करू नये. आपला निसर्ग आपणच स्वच्छ ठेवावा.
पाणलोट क्षेत्रात जास्त पाऊस झाल्यास समजून येत नाही. अचानक पाण्याचा प्रवाह वाढण्याची भीती असते. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात, ओढ्यात, नदीत उतरू नये.
बधब्याच्या प्रपातासोबत वरून दगड पडण्याची शक्यता असते.
डोहात, धरणात पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने अपघात होऊ शकतो. त्यात उतरणे टाळावे.
ट्रेक संपल्यावर सगळे घरी पोहोचले आहेत याची खात्री करावी.
दुर्दैवाने काही दुर्घटना घडल्यास ७६२० २३० २३१ या २४x७ हेल्पलाइन नंबरवर आपत्कालीन मदतीसाठी संपर्क साधावा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.