पेपर पूर्ण सोडवून देखील शून्य गुण मिळालेच कसे

पेपर पूर्ण सोडवून देखील शून्य गुण मिळालेच कसे

पुणे - 'बी फार्मसीच्या सगळ्या विषयात मला व्यवस्थित गुण मिळाले आहेत, पण एकाच विषयात शून्य गुण मिळाले. याची विद्यापीठाकडे तक्रार केली, पण निकाल सुधारणा झालीच नाही. मला नापासच दाखवले जात आहे. माझे खासगी विद्यापीठात 'एमबीए' प्रवेश झाला आहे, साडेतीन लाख रुपये शुल्क भरले आहे, पण मला नापास केल्याने प्रवेश अडचणीत आला आहे, पेपर पूर्ण सोडवून देखील शून्य गुण मिळालेच कसे याचा उलगडा विद्यापीठाने केला पाहिजे, अशी मागणी चिंतेने ग्रासलेला यश चव्हाण करत होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाची ऑनलाइन व ऑफलाइन माध्यमातून बहुपर्यायी प्रश्न (मल्टिपल च्वाइस क्वेश्चन-एसीक्यू) पद्धतीने परीक्षा घेतली. त्याचा निकाल जाहीर करण्यात आल्यानंतरही तांत्रिक घोळ संपलेला नाही. विद्यापीठाने निकाल जाहीर केला तेव्हा त्यात परीक्षा देऊनही विद्यार्थी अनुपस्थितीत दाखवणे, एकाच विषयात शून्य गुण अशा अनेकांच्या तक्रारी आल्या. 

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने या निकालाचे विश्लेषण करण्यासाठी खास कक्ष स्थापन केला होता. त्यामध्ये तक्रारींचे विश्लेषण करण्यात आले. त्याचा सुधारीत निकाल ३ डिसेंबरपर्यंत जाहीर केला जाईल असे असे परिपत्रक काढून विद्यापीठाने स्पष्ट केले. त्यानुसार सुमारे ६ हजार तक्रारींचा निकाल अपडेट करून टाकला आहे. पण यातही १०० टक्के तक्रारी सुटलेल्या नाहीत. शून्य गुण आणि परीक्षा देऊनही अनुपस्थिती  दाखवणे यामुळे अनेक नापसच झाले आहेत. 

स्नेहा भागवत म्हणाली, बीकाॅमच्या इको पेपरमध्ये इंटरनलला १६ गुण आहेत, पण ऑनलाइन परीक्षेत शून्य गुण मिळाले.  विद्यापीठाने काल सुधारित निकाल दिला, त्यातील आता शून्य गायब करून मोकळी जागा सोडून मला नापास केले आहे. परीक्षा देऊन देखील हे कसे शक्य आहे. नापास झाल्याने माझे एक वर्ष वाया जाणार आहे, विद्यापीठाने यावर तोडगा काढला पाहिजे. 

प्रगती खडसे म्हणाली, माझा द्वितीय वर्षाचा एक पेपर बॅकलाॅग होता, त्यात मला शून्य गुण पडले आहेत. मी आता चंद्रपूरला असल्याने याची तक्रार करण्यासाठी विद्यापीठात देखील येऊ शकत नाही." अशाच प्रकारे अन्य विद्यार्थ्यांनीही त्यांची कैफियत मांडली. 

त्या विद्यार्थ्याला मिळाले ३८ गुण 
आदित्य तांगडे पाटील याला एका विषयात शून्य तर इतर पाच विषयात ४० पैकी ३४ पेक्षा जास्त गुण होते. शून्य गुण पडल्याने त्याने विद्यापीठात तक्रार केली. याचा पाठपुरावा सुरू असताना सुरक्षा रक्षकांतर्फे मारहाण झाल्याने वाद निर्माण झाला. या विद्यार्थ्याला सुधारित गुणपत्रिका मिळाली असून, त्या ज्या विषयात शून्य गुण होते, त्यात ३८ गुण मिळाले असल्याचे आदित्यने सांगितले. 

ऑफलाइन परीक्षा देऊनही अनुपस्थित 
बंटी भोळे याने नाशिक येथील एका परीक्षा केंद्रावर १२ ऑक्टोबरला बिझनेस कम्युनिकेशन या ऑफलाइन परीक्षा दिली होती. पण त्याच्या गुणपत्रिकेवर अनुपस्थित शेरा मारून नापास केले आहे, त्यात बदल झाला नाही असे त्यांने सांगितले. 

आकडेवारी

  • अंतिम वर्षाची परीक्षा देणारे विद्यार्थी - २.५  लाख
  • ऑनलाइन देणारे - २ लाख
  • ऑफलाइन - ५००००
  • निकालाबाबत तक्रारी - ६०००

"सहा हजार तक्रारी मार्गी लावल्या असल्या तरी विद्यार्थांना शून्य गुण कसे पडले ट्रेसआऊट करणे अवघड जात आहे. त्यामुळे ज्या तक्रारी वास्तववादी आहेत अशा विद्यार्थ्यांची तपासणी केली जाईल, त्यांना इतर विषयात किती गुण मिळाले आहेत याची सरासरी किंवा ग्रेस मार्क देऊन उत्तीर्ण केले जाईल."
- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मुल्यमापन विभाग

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com