जयेश महाराज भाग्यवंत हे नवीन पिढीतील कीर्तनकार आहेत. त्यांनी आळंदीत इंग्रजी भाषेमध्ये पहिले कीर्तन केले.
पिंपळे गुरव : पंढरपूरची कार्तिकी वारी, आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली संजीवन समाधी दिन सोहळा आणि ‘सकाळ’च्या पिंपरी-चिंचवड कार्यालयाचा ३१ वा वर्धापन दिन यानिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ या कीर्तन महोत्सवास सोमवारपासून (ता. २०) प्रारंभ होत आहे. त्याअंतर्गत सोमवारी सायंकाळी पाचला पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात मुंबईतील जयेश महाराज भाग्यवंत (Jayesh Maharaj Bhagyawant) यांची कीर्तन सेवा होणार आहे.
सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित आध्यात्मिक कार्यक्रम सध्याच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. जयेश महाराज भाग्यवंत हे नवीन पिढीतील कीर्तनकार आहेत. त्यांनी आळंदीत इंग्रजी भाषेमध्ये पहिले कीर्तन केले. अतिशय विद्वान कीर्तनकार आहेत. अध्यात्म व विज्ञान यांचा समन्वय साधणारी त्यांची कीर्तने आहेत. अध्यात्म, विवेकवाद व विज्ञान यांची सांगड घालणारी ही कीर्तने आजच्या पिढीला अतिशय उपयुक्त आहेत. मानसिक तणावातून सध्याची पिढी जात असून, यासाठी अध्यात्माची जी फुंकर आहे, थंडावा आहे, तो या कीर्तनातून मिळणार आहे.
-प्रभाकर महाराज कराळे, कीर्तनकार, सांगवी
‘करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण’ या अभंगातून संत तुकाराम महाराज कीर्तनाची महती सांगतात. या कलियुगात मनुष्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर भगवंताच्या नामस्मरणाशिवाय दुसरा सोपा मार्ग नाही. महोत्सवात सहभागी झालेले सर्वच कीर्तनकार पारमार्थिक तत्त्वज्ञान अभ्यासक आहेत. कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आदी संतांचे विचार आणि त्यांनी दाखवलेला मनुष्यजन्माच्या उद्धाराचा मार्ग ते जनसामान्यांपर्यंत पोहोचवतात. मला वाटतं, ‘सकाळ’ने या महोत्सवाचे आयोजन करून, वारकरी संप्रदायाच्या कार्यात आपला मोलाचा सहभाग नोंदवलेला आहे.
-स्वप्नील महाराज कदम, कीर्तनकार, पिंपळे गुरव
वाकड : ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवातील दुसरे पुष्प मंगळवारी (ता. २१) प्रसिद्ध कीर्तनकार समाधान महाराज शर्मा (बीड) हे वाकड येथे गुंफणार आहेत. श्री संत तुकाराम गार्डन मंगल कार्यालयात (द्रौपदा लॉन्स) मंगळवारी सकाळी १० ते १२ या वेळेत हा कीर्तन सोहळा होईल.
या निमित्ताने वाकड-हिंजवडी परिसरातील वैष्णवांचा मोठा मेळा भरणार आहे. परिसरातील नागरिक, वारकरी संप्रदायातील मंडळी, प्रवचनकार, कीर्तनकार तसेच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शिक्षण, उद्योग, सहकार आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. स्व. निवृत्ती तुकाराम विनोदे यांच्या स्मरणार्थ, तसेच श्री संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब विनोदे, उद्योजक शंकर वाकडकर यांच्या सहकार्यातून हा सोहळा होत आहे.
सध्या पंढरपूर कार्तिक यात्रा सुरू आहे. त्यानंतर सर्व वारकऱ्यांना वेध लागतात ते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली यांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्याचे. हा सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. बहुतांश वारकऱ्यांची पावले आळंदी, पंढरीकडे वळली आहेत. जे वारकरी किंवा भाविक काही कारणास्तव पंढरपूरला जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी ‘सकाळ’ने कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यामुळे शहरवासीयांना तसेच आयटीजनांना हा सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवायची संधी ‘सकाळ’ने प्राप्त करून दिली आहे.
मंगळवार, ता. २१, सकाळी १० वाजता
कीर्तनकार - समाधान महाराज शर्मा, बीड
स्थळ - श्री संत तुकाराम गार्डन मंगल कार्यालय (द्रौपदा लॉन्स), कस्तुरी चौक, वाकड
आजकालच्या डिजिटल आणि सोशल मीडियाच्या जगात दोन-चार आध्यात्मिक शब्द कानी पडणेदेखील अवघड झाले आहे. असे असताना ‘सकाळ माध्यम समूहा’ने कीर्तन महोत्सवाची अनोखी मेजवानी महानुभावांना उपलब्ध करून दिली. असे सोहळे वर्षातून दोन-तीन वेळा तरी व्हावेत. या स्तुत्य उपक्रमासाठी ‘सकाळ’चे अभिनंदन आणि आभार.
-बाळासाहेब विनोदे, संचालक, श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना
या कीर्तन महोत्सवामुळे महाराष्ट्रातील महान संतांचे नामसंकीर्तन व त्यांचे अमृतानुभव ऐकण्याची शहरवासीयांना संधी प्राप्त झाली आहे. अध्यात्मापासून दूर जात असलेल्या समाजाला अध्यात्माची गोडी लावण्यासाठीचा ‘सकाळ’चा स्तुत्य उपक्रम असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा.
-शंकरराव वाकडकर, संचालक, श्री संत तुकाराम गार्डन मंगल कार्यालय, वाकड
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.