महाराष्ट्राला यावर्षीही महापुराचा धोका; श्रावणसरी बसरणारच नाहीत

Floods_in_Maharashtra
Floods_in_Maharashtra

पुणे : श्रावण महिना म्हटला की रिमझिम पाऊस! 20 जुलै 2020 पासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात रिमझिम पावसाचे हे चित्र मुसळधार पावसात बदलल्याचे अनेक ठिकाणी महाराष्ट्रात दिसू शकेल. परिणामी योग्य जलव्यवस्थापन झाले नाही, तर लवकरच महाराष्ट्राला देखील महापूराचा धोका होऊ शकतो, अशी माहिती हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी दिली आहे. 

प्रा. किरणकुमार जोहरे यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्राॅपीकल मेटीयोराॅजी (आयआयटीएम) पुणे येथे एक तपापेक्षाही प्रदीर्घ काळ संशोधक म्हणून काम पाहिले आहे. एकही आत्महत्या न होता प्रत्येक शेतकरी जगला व वाढला पाहिजे. तसेच भवताल समजून सकारात्मक विचाराने शेतकऱ्यांची उन्नती झाली पाहिजे, या ध्येयाने, आपल्या अनुभवातून गेल्या दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून थेट शेतकऱ्यांना हवामान विषयक माहिती देण्याचे काम प्रा. किरणकुमार जोहरे करत असून 'अंदाज नव्हे माहिती' असे त्यांचे ब्रिद आहे. 

अद्यापही मान्सूनचा पाऊस सुरू झालेला नाही. सध्याच्या पूर्वमान्सून पावसानंतर 23 जुलै नंतरच महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस सुरू होऊ शकेल. असे असले तरी आपल्या भागातील पाऊस, उपलब्ध पाणीसाठा, जमीन यानुसार देशी बियाणे, नैसर्गिक खते, बहुपिक पेरणीने नुकसान कमी करण्याचा निर्णय शेतकरी घेऊ शकतात. कापूस, सोयाबीन आणि मका लागवड करताना गांभीर्याने विचार करावा. इतर पर्याय उपलब्ध असल्यास त्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन देखील हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

हवामान खात्याने वर्तविलेले भाकित आणि त्याला अनुसरून शेतकऱ्यांनी याआधी केलेल्या पेरण्या याच्या नोंदी शेतकरी विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळण्यास वापरू शकतात. त्यामुळे यापूर्वी अशा नोंदी ठेवल्या नसल्यास आतातरी शेतकऱ्यांनी दररोजच्या नोंदी ठेवण्यासाठी सुरवात करणे आवश्यक आहे, असे ही त्यांनी सांगितले. शेतकरी आपली तक्रार जिल्हाधिकारी, कृषी मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्या कडे ई-मेल किंवा ऑनलाइन नोंदवू शकतात, असे ही त्यांनी सांगितले. असे असले तरी घाबरून न जाता आपल्याला परिस्थितीचा खंबीरपणे मुकाबला करायचा आहे आणि उभे राहायचे आहे. हे आपण प्रत्येकानेच लक्षात ठेवायचे आहे असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

आधीच दिलेला अलर्ट 

यंदा देशातील अनेक ठिकाणांबरोबरच महाराष्ट्रातही महापूरामुळे विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, कोकण आदी ठिकाणी लवकरच नुकसान झाल्याचे पाहायला मिळू शकेल. त्यामुळे डिजास्टर मॅनेजमेंटसाठी आतापासूनच आपण तयार राहण्याची आवश्यकता आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत पाऊस लांबल्याने नुकसान, जीवितहानी आणि पावसाचे रेकॉर्ड यंदा मोडले जाऊ शकते. शेतकऱ्यांनी शेतात अतिरिक्त पाणी साठणार नाही, यासाठी निचरा करण्याची व्यवस्था आतापासूनच करण्यास सुरूवात करावी.

सध्याचा पाऊस पूर्व मान्सूनचा का?

मान्सून पॅटर्न बदलल्याने सध्या जूनमध्ये होणारा पाऊस हा मान्सून पूर्व/वळवाचा पाऊस होय. याचे शास्त्रीय कारण म्हणजे क्युमोलोनिंबस ढगांची होत असलेली निर्मिती. जे केवळ मान्सूनपूर्व आणि मान्सूनपश्चात काळातच तयार होतात. वातावरणातील तापमान हवेचा दाब, आर्द्रता आदी घटकांच्या लक्षणीय बदलांमुळे अस्थिरता वाढल्याने हा पाऊस होतो. अजस्र क्युमुलोनिंबस प्रकारच्या ढगांमुळे हा पाऊस होतो. वादळी वारे, गडगडाट आणि कडकडाट असे विजांचे तांडव, गारा किंवा गारपीट, आकाशात ढगांचे पुंजके वेगवेगळ्या रंगछटा वा शेडमध्ये दिसणे, ढगफुटी म्हणजे फ्लॅशफ्लड (ताशी १०० मिलीमिटर या दराचा पाऊस) ही मान्सून पूर्व पाऊस ओळखण्याची लक्षणे आहेत. पूर्व पाऊस दोन प्रकारे कोसळतो.

अ) दिवसभर उष्णता वाढल्यामुळे दुपारी १२ वाजेनंतर आणि जास्त करून २ वाजेनंतर हवा तापल्याने ऊर्ध्व झोत निर्माण होत खालून वरच्या दिशेने हवेचा प्रवास होऊन अस्थिरतेमुळे दिवसा पाऊस पडतो.

ब) सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर हवा थंड होऊन वरून खालच्या दिशेने येऊ लागल्याने ढगात घुसळण होत अस्थिरतेने रात्री ते पहाटे सूर्य नसताना पाऊस पडतो.

मान्सूनचा पाऊस कसा ओळखावा?
क्युमोलोनिंबस ढगांची निर्मिती मान्सून काळात होत नाही. परिणामी ढगांचे पुंजके यात दिसत नाहीत. तसेच विजा चमकत नाही की ढगांचा गडगडाट देखील ऐकू येत नाही. पडणाऱ्या पावसात जवळजवळच्या ठिकाणी खूप मोठा फरक नसतो म्हणजे एका ठिकाणी खूप जास्त तर एक-दोन किलोमीटर अंतरावर ऊन किंवा पावसाअभावी पूर्ण कोरडे असा प्रकार घडत नाही. तर आकाश समान एका रंगांच्या शेडमध्ये काळपट दिसते. पाऊस रिपरिप पडत राहतो. तसेच मान्सून ढगांचा तळ (base) आणि ढगांचे शीर्ष किंवा माथा (top) कमी उंच असतो.

महापूराचा अलर्ट?

आताच महापूर सांगून अलर्ट केले नाही, दर येत्या हंगामात लोक पुराने मरतील आणि केंद्र व राज्य सरकार देखील जलव्यवस्थापन तसेच डिजास्टर मॅनेजमेंट करता फारसे काही करू शकणार नाही. वादळापूर्वीची नव्हे, तर महापुरापूर्वीची ही शांतता समजावी. 

अलर्ट करणे म्हणजे घाबरवणे नव्हे. आधीच नागरिक घाबरले आहेत, हे खरे असले तरी कमी उंचीवर पूरक्षेत्रात राहणारे लोक पण महापूराने हकनाक मरतील. 

पाऊस कुठे व कसा बरसेल?

भारतात बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, ओरिसा, मध्य प्रदेश, ईशान्येकडील राज्ये या बरोबरच महाराष्ट्रात देखील होईल.

महाराष्ट्रात कसा बरसेल पाऊस?

महाराष्ट्रात पुढील ठिकाणी कमी वेळात जास्त म्हणजे ढगफुटीसारखा पाऊस बरसेल-

विदर्भातील सर्व जिल्हे, दक्षिण महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर (हाय अलर्ट), कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि गोव्याला धोका, मुंबईची तुंबई होऊन मोठी जीवितहानी होऊ शकेल. मराठवाडा, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस वाढणार म्हणून तेथेही खबरदारी हवी.

ढोबळ टाईम लाईन

- जुलै अखेर सुरवात ऑगस्टमध्ये पावसात वाढ होईल. 

- पॅटर्न बदलाने आणि उशिरा पाऊस सुरू झाल्याने यंदा नोव्हेंबर अखेरपर्यंत पाऊस आणि शेतीची अपरिमित हानी होईल.

- धरणातील पाण्याच्या योग्य जलव्यवस्थापन आणि डिजास्टर मॅनेजमेंटने नुकसान तसेच जीवितहानी कमी करणे शक्य.

का घडते असे?

गेल्या वीस वर्षात भारतीय मान्सूनचा पॅटर्न लक्षणीयरित्या बदलला आहे. हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांच्या अनेक वर्षांपासूनच्या पाठपुरावा आणि प्रयत्नानंतर केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने देखील ही गोष्ट अधिकृतपणे गेल्या वर्षी मान्य केली आहे. 

भारतासह जगभरात लाॅकडाउनमुळे वातावरणात मोठे बदल घडून आले आहेत. प्रदूषण कमी झाल्याने सूर्याची उष्णता मोठ्या प्रमाणात जमिनीपासून ते 15 किलोमीटर उंचीपर्यंत वातावरणात मोठी अस्थिरता अद्यापही निर्माण करीत आहे. परिणामी, क्युमोलोनिंबस ढगांची निर्मिती होत असून पूर्व मान्सूनचाच पाऊस कोसळत आहे. 

वातावरण स्थिर होऊन मान्सून सेट होण्यास आणि परतण्यासाठी यामुळे मोठा उशीर होत आहे. याचमुळे ढगफुटीच्या म्हणजे फ्लॅशफ्लडच्या घटनांमध्ये यावर्षी वाढ होईल. परिणामी यावर्षी केवळ पूर्वमान्सून आणि मान्सूनच्याच नव्हे, तर मान्सूनपश्चात म्हणजे परतीच्या पावसातदेखील प्रचंड वाढ होईल, असे संशोधन निष्कर्षदेखील प्रा. जोहरे यांनी मांडले आहेत. 

- किरणकुमार जोहरे (9970368009)
ई-मेल - kkjohare@hotmail.com

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com