भारताने ऑस्ट्रेलियाशी केलेल्या आर्थिक सहकार्य आणि व्यापारविषयक कराराने (ईसीटीए) उभय देशातील आदान-प्रदान, व्यापार, सहकार्य वाढीला चालना मिळाली. त्याचा उभयतांना व्यापक लाभ झाला. त्याच धर्तीवर अन्य देशांशी सहकार्यवृद्धीवर भर दिला जात आहे.
भारत ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार (इंड-औस ईसीटीए) गेल्या वर्षी अस्तित्वात आला. हा करार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील महत्त्वाच्या उपक्रमांसाठी कशी प्रचंड मेहनत घेऊन तसेच सर्व हितसंबंधितांशी सल्लामसलत करून नियोजन केले जाते, याचे उत्तम उदाहरण आहे. अशा उपक्रमांची अंमलबजावणीही प्रभावीपणे केली जाते, जेणेकरून सर्वसामान्य लोक आणि लघु तसेच मध्यम उद्योग अशा दोघांनाही त्याचा लाभ मिळेल.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा करार दोन्ही क्रिकेटप्रेमी देशांना परस्पर लाभदायक ठरला आहे. त्यात अमृतकाळातील आत्मविश्वासपूर्ण आणि महत्वाकांक्षी अशा नव्या भारताविषयीचा जगाचा दृष्टिकोन प्रतिबिंबित होतो. तसेच, कायद्याचे राज्य आणि साधारण सारखीच कायदेशीर व्यवस्था असलेल्या दोन संसदीय लोकशाहीच्या देशांमधील राजनैतिक भागीदारी या करारामुळे अधिकच दृढ होणार आहे. ही दोन्ही राष्ट्रे, जपान आणि अमेरिकेसोबत ‘क्वाड’ या संघटनेचे सदस्य आहेत. दोन्ही देश, जपानसोबत, त्रिपक्षीय पुरवठा साखळी लवचिक करण्याविषयीच्या उपक्रमाचा (एससीआरआय) आणि १४ सदस्यीय हिंद-प्रशांत प्रदेश आर्थिक आराखड्याच्याही (आयपीईईफ) भाग आहेत.
मुक्त व्यापार करार (एफटीए) या भारताच्या विकसित देशांसोबतच्या पहिल्या करारात प्रचंड क्षमता आहे. भारत ऑस्ट्रेलियाकडून मुख्यत्वे कच्चा माल आणि काही वस्तू आयात करतो; तर तयार मालाची निर्यात करतो. म्हणूनच, ‘एफटीए’मुळे भारतीय उद्योजकांचा उत्पादन खर्च कमी होऊन, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही बाजारपेठांत त्यांची उत्पादने अधिक स्पर्धात्मक होऊ शकतील. यामुळे भारतीय स्टार्टअप कंपन्यांनाही स्वतःच्या प्रगतीची संधी मिळेल.
निर्यातीत भक्कम वाढ
आकडेवारी असे सांगते की, ‘भारत-ऑस्ट्रेलिया ईसीटीए’ने अत्यंत सकारात्मक सुरुवात केली आहे. या करारामुळे कामगार प्रणित क्षेत्रांमध्ये लाखो रोजगार निर्माण होतील, हा मोदी सरकारचा विश्वास दृढ झाला आहे. कारण भारतीय उत्पादनांना ऑस्ट्रेलियाच्या बाजारपेठेत शंभर टक्के करमुक्त प्रवेश मिळेल. एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत भारतातून ऑस्ट्रेलियाला झालेल्या व्यापारी निर्यातीत चौदा टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्याच्या आव्हानात्मक वातावरणात, इतर देशांशी भारताच्या सुरू असलेल्या व्यापाराच्या तुलनेत ही कामगिरी अत्यंत उत्तम आणि सरस होती. ऑस्ट्रेलियाची एकूण निर्यात चार टक्क्यांनी घटली असली तरी भारतातून केल्या जाणाऱ्या खरेदीत मोठी वाढ झाली आहे. ऑस्ट्रेलियातून भारतात होणारी निर्यात १९ टक्क्यांनी घटल्यामुळे दोन्ही देशातील व्यापारी तूट ३९ टक्क्यांनी घटली आहे.
प्राधान्यक्रमाच्या लाईन्स अंतर्गत ऑस्ट्रेलियाला होणाऱ्या निर्यातीत रोजगारनिर्मिती क्षेत्रात जोरदार वाढ झाली. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाला अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात २४% वाढली, तर निर्यातीत केवळ एक टक्का वाढ झाली. ‘ईसीटीए’मुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि प्लास्टिकच्या ऑस्ट्रेलियाला निर्यातीत एकूण निर्यातीपेक्षा जास्त सरस कामगिरी झाली आहे. भारत ऑस्ट्रेलियाला सातशेहून अधिक वस्तूंची निर्यात करते. २०२३-२४च्या पहिल्या दहा महिन्यांत ही निर्यात ३३ कोटी पन्नास लाख अमेरिकी डॉलर्स आहे; ज्यात साडेसहा कोटी अमेरिकी डॉलरच्या स्मार्टफोन निर्यातीचा समावेश आहे. इतर नवीन उत्पादनांमध्ये रत्ने आणि दागिने क्षेत्रातील अनेक वस्तू, हलकी तेले, बिगर-औद्योगिक हिरे तसेच रेशमापासून बनवलेल्या वस्त्रांव्यतिरिक्त स्कर्ट आणि कपडे यांचा समावेश आहे.
थेट परदेशी उत्पादनात मोठी झेप
पंतप्रधान मोदी भारतीय अर्थव्यवस्थेचे नेतृत्व अत्यंत कार्यक्षमतेने करत आहेत. आजच्या अस्थिर जगात भारताची अर्थव्यवस्था जोमदार असल्याचे स्पष्ट होते. त्याची दखल भागीदार घटकांनी घेतली आहे. भारताने २०४७ पर्यंत विकसित देश बनण्यासाठी कंबर कसली आहे. आपले व्यावसायिक भागीदार ही ताकद लक्षात घेत असून, कृषी आणि दुग्धविकासासारख्या संवेदनशील क्षेत्रांचे संरक्षण करण्याविषयीच्या आमच्या चिंताही त्यांनी लक्षात घेतल्या आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया ईसीटीए करार, भारताच्या विकासाच्या मार्गावरील विश्वास, गुंतवणूकदार स्नेही धोरणे व पंतप्रधानांनी घडवलेल्या सुधारणांमुळे भारत ऑस्ट्रेलियाच्या व्यवसायिकांसाठी आणखी आकर्षक ठरला आहे.
ऑस्ट्रेलियाहून येणाऱ्या थेट परकी गुंतवणुकीत या वर्षीच्या जानेवारी-सप्टेंबर काळात मोठी वाढ झाली आहे. २०२२ या संपूर्ण वर्षातल्या गुंतवणुकीच्या तुलनेत सातपट वाढ झाली आहे. सल्लागार सेवांमधील थेट परकी गुंतवणुकीत २४ कोटी ८० लाख अमेरिकी डॉलरपर्यंत वाढ झाली आहे, २०२२मध्ये ही गुंतवणूक दीड कोटी डॉलर होती. सेवा क्षेत्राची भरभराट होत आहे. भारताच्या माहिती तंत्रज्ञान आणि व्यावसायिक सेवांच्या निर्यातीच्या प्रगतीचा मार्गही भक्कम आहे. शिक्षण, ऑडिओ व्हिज्युअल सेवा आणि मोबिलिटी या क्षेत्रातील ऑस्ट्रेलियाबरोबरच्या इतर द्विपक्षीय करारांसह ‘ईसीटीए’च्या गतीमुळे, व्यावसायिक गतिशीलतेत पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक, तर भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षणानंतरच्या वर्क व्हिसामध्ये जवळपास शंभर टक्क्यांची वाढ झाली आहे.
‘ईसीटीए’नंतर दुहेरी कर आकारणीतून मुक्त झालेल्या भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगाला आता समान पातळीवर स्पर्धा करता येत आहे. काही उद्योगांच्या अंदाजानुसार, यामुळे गेल्या वर्षात कोट्यवधी डॉलरची बचत झाली आहे. ‘ईसीटीए’च्या यशामुळे उत्साहित होऊन ‘नॅसकॉम’, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील लघु आणि मध्यम उद्योगांना ऑस्ट्रेलियामध्ये त्यांचा विस्तार करण्यासाठी सुविधा देण्यासाठी एक यंत्रणा स्थापन केली आहे.
व्यावसायिक कराराविषयीचे दृष्टिकोन
राष्ट्रीय आणि प्रादेशिक वाणिज्य मंडळे, निर्यातदार, उद्योग-विशिष्ट गट, अर्थशास्त्रज्ञ, व्यापार तज्ज्ञ, विविध मंत्रालये आणि विभागांसह उद्योगाच्या प्रत्येक विभागाशी व्यापक सल्लामसलत केल्यानंतर ‘भारत-ऑस्ट्रेलिया ईसीटीए’ आणि संयुक्त अरब अमिरातीबरोबर गेल्या वर्षी अशाच प्रकारचा करार केला होता. दोन्ही ‘एफटीए’ची उद्योगातील दिग्गजांनी मोठ्या प्रमाणात प्रशंसा केली आहे. पूर्वीच्या व्यापार करारांपेक्षा हे मोठे पाऊल आहे. आधीच्या करारात इतक्या व्यापक सल्लामसलती नव्हत्या.
प्रत्येक धोरण किंवा करार राष्ट्रहिताचा पाहिजे, असे पंतप्रधान मोदी यांचे स्पष्ट मत आहे. याच भावनेने आम्ही मॉरिशस, ऑस्ट्रेलिया आणि संयुक्त अरब अमिरातीसोबत व्यापार करार केले. तीच मार्गदर्शक तत्त्वे इतर देशांसोबतच्या वाटाघाटीला आकार देत आहेत. आमच्या व्यवसायांना स्पर्धात्मक बनवणारे, त्यांच्यासाठी नवीन बाजारपेठा खुली करणारे आणि महत्त्वाचे म्हणजे हे मुक्त व्यापार करार व्यवसाय वाढवतात, आर्थिक विकासाला गती देतात. अशा प्रकारे रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण करतात, असे न्याय, पारदर्शक आणि परस्पर फायदेशीर करार आम्हाला हवे आहेत. ऑस्ट्रेलियाबरोबरच्या ‘एफटीए’ने त्याच्या पहिल्या वर्षात हे दाखवून दिले आहे.
(लेखक केंद्रीय वाणिज्य व उद्योग, अन्न व सार्वजनिक वितरण, ग्राहक व्यवहार आणि वस्त्रोद्योग मंत्री आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.