एकरकमी एफआरपीचे आंदोलन चिघळणार?; शेट्टींचा पाटलांसह साखर आयुक्तांना इशारा

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

कऱ्हाड (जि. सातारा) : राज्यातील काही कारखाने वगळता बहुतांश साखर कारखाऱ्यांनी एफआरपी दिला नसल्याचे आरोप करत सहकारमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखालील साखर कारखान्यावर आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. एफआरपी न देणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी करून त्याविरोधात आंदोलनाचाही अल्टिमेटम साखर आयुक्तांना दिला आहे. त्यामुळे एकरकमी एफआरपीचे आंदोलन चिघळण्याची चिन्हे आहेत.
 
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साखर कारखान्याला ऊस घातल्यानंतर त्यांना 14 दिवसांत एफआरपी देणे साखर कारखान्यांना कायद्याने बंधनकारक आहे, हे शस्त्र हातात घेऊन माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून एकरकमी एफआरपीसाठी आंदोलने केली. आमदार पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कऱ्हाडला केलेले आंदोलन तर देशभर गाजले. मात्र, त्यामध्ये गुन्हे दाखल केल्याने आणि संघटनेतही फाटाफूट झाल्याने आंदोलनाची धार थोडी बोथट झाली. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एकरकमी एफआरपीचा लढा कायमच आहे, असे सांगून शेट्टी यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा एल्गार केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. 

सांगली जिल्ह्यातील तीन- चार कारखाने वगळता अन्य कारखान्यांनी शब्द फिरवला आणि 2,500 रुपये दिले. राज्यातील इतर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिलीच नाही, असा आरोप करत शेट्टी यांनी साखर आयुक्तांना एकरकमी एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई न केल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर आयुक्तांनी 60 टक्‍क्‍यांपेक्षा ज्या कारखान्यांनी एफआरपी थकीत केली आहे, त्या 13 कारखान्यांवर आरआरसीची कारवाई सुरू केली. ज्या कारखान्यांनी 40 टक्के एफआरपी थकीत केली आहे, त्या कारखान्यांवरही कारवाई करावी, अशी त्यांनी मागणी करत आता सहकारमंत्र्यांच्याच साखर कारखान्यावर 22 मार्चपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा एकरकमी एफआरपीचे आंदोलन चिघळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

शेट्टींच्या भूमिकेबद्दल चर्चाच चर्चा 

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोट्यातून माजी खासदार राजू शेट्टी यांचे नाव राज्यपालांकडे पाठवण्यात आले आहे. मात्र, तरीही त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर एकरकमी एफआरपी देण्याची जबाबदारी असल्याचे सांगून त्यांच्याच कारखान्यावर आंदोलनाचा इशारा दिला आहे. शेट्टी हे असे आक्रमक का झाले, असा प्रश्‍न उपस्थित होतानाच त्यांनी एकरकमी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे सध्या उलटसुलट चर्चाही सुरू झाल्या आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com