Nandurbar News : पावसाळा लांबल्यामुळे आधीच उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच त्यातच वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याला तळोदा शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक वैतागले असून, विजेच्या सततच्या लपंडावामुळे कोवळ्या पिकांना पाणी देणे दुरापास्त झाले आहे. (Farmers and common citizens are upset due to continuous electricity cut nandurbar news)
वीज वितरण कंपनीच्या सुमार कारभारामुळे शेतकऱ्यांचे नियोजन बिघडत असून, त्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वीजपुरवठा सुरळीत चालू राहील यासाठी संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या तळोदा तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय असून, बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. तालुक्यातील शेतकरी पारंपरिक पिकांसोबतच केळी, पपई, ऊस, कापूस यांसारख्या नगदी पिकांवर अधिक भर देतात. विशेषतः उसाचे व कापसाचे क्षेत्र जास्त असल्याने साहजिकच अधिक पाण्याची गरज भासते.
तसेच तालुक्यात कृषिपंपांची संख्यादेखील अधिक असून, अनेक विद्युत रोहित्रांवर क्षमतेपेक्षा अधिक भार आहे. परिणामी अधिक लोडमुळे रोहित्रावर तांत्रिक बिघाडाची समस्या कायम उद्भवत असल्याने ठिकठिकाणी वारंवार वीज खंडित होण्याच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे. तसेच कमी दाबानेदेखील वीजपुरवठा होत आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र तरीसुद्धा अनेकदा वेळेवर पाणी न मिळाल्याने पिके करपून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यातच आठ दिवसांपूर्वी आलेल्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
तळोदा शहरासह तालुक्यातील अनेक गाव-पाड्यांमध्ये आठ दिवसांपूर्वी आलेल्या वादळी वाऱ्याने असंख्य नागरिकांचे विशेषतः शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे.
या वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी वीजखांब मोठ्या प्रमाणावर उन्मळून पडल्याने वीजपुरवठा मोठ्या प्रमाणावर खंडित झाला. वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागल्याने शेतकऱ्यांना पीक वाचविण्यासाठी मोठी धडपड करावी लागली.
दरम्यान, काही शेतकऱ्यांनी बागायती कपाशीची लागवड केली आहे, त्यामुळे ते कोवळे पीक वाचविण्यासाठी त्यांना विशेष प्रयत्न करावे लागले. तसेच जून महिना अर्धा संपला असला तरी तालुक्यात पावसाने हजेरी लावलेली नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन बिघडत असून, त्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे वीजपुरवठा अखंडपणे सुरळीत सुरू राहील यासाठी संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
महागडी रोपे जळण्याची भीती
सध्या शेतकरी फळबागायतीकडे मोठ्या प्रमाणावर वळला असून, केळी व पपईची महागडी रोपे खरेदी करून लागवड करीत आहे. पावसाळा लांबल्याने उकाड्यात मोठ्या प्रमाणावर भर झाली आहे.
शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाच्या सहाय्याने पिकांना पाणी देणे पसंत केले असले, तरी वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पिकांना वेळेवर व मुबलक प्रमाणात पाणी मिळत नसल्याने ती जळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतात चकरा माराव्या लागतात, या वेळी त्यांना जंगली श्वापदांच्याही धोका संभवतो.
‘अर्थ’पूर्ण व्यवहार...
दरम्यान, अनेकदा विद्युत रोहित्र नादुरुस्त झाल्यावर ते दुरुस्त करण्यासाठी तसेच एखाद्या परिसरात नवीन रोहित्र बसविण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांकडून ‘अर्थ’पूर्ण व्यवहार पूर्ण झाल्याशिवाय रोहित्र बसविले जात नसल्याचे शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकरी नाइलाजास्तव अर्थपूर्ण व्यवहार करून रोहित्र बसवितात असे बोलले जाते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.