Dhule leopard News : अत्यल्प पावसामुळे यंदा म्हसदी भागातील वनक्षेत्रातील पाणवठे कोरडेठाक आहेत. एरवी भक्ष्यासाठी भटकंती करणारे वन्यपशू पाण्यासाठी सैरभैर झाले आहेत. गुरुवारी (ता. ८) साक्री आगाराच्या म्हसदी-काळगावमार्गे जाणाऱ्या नाशिक बसमधील प्रवाशांना बिबट्याने दर्शन दिले. एका उत्साही, हौशी प्रवासाने बिबट्याची छबी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैदही केली.
अगदी दिवसा चक्क गावालगत बिबट्याने दर्शन दिल्याने भक्ष्य आणि पाण्यासाठी बिबटे गावकुसाकडे धाव घेत असल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली. (leopard show passengers of Nashik bus going via Mhasdi Kalgaon of sakri Agra dhule news)
पावसाअभावी ऐन पावसाळ्यातही वनक्षेत्रातील पाणवठे कोरडेठाक होते. एरवी शिकारी (सावज)च्या शोधार्थ फिरणारे बिबटे, तरसांसारखे वन्यपशू पाण्यासाठी सैरभैर झाले आहेत. वनक्षेत्रातील पाणवठ्यात पाणीच नसल्याने पाण्याच्या शोधार्थ वन्यपशू शेतशिवारच काय गावकुसाकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे.
पाळीव प्राण्यांवर हल्ला..!
शेतशिवारात शेतकरी पाळीव प्राण्यांसाठी पाण्याचे हौद बांधून ठेवतात. पाण्यासाठी शेतशिवारात येणारे वन्यपशू पाळीव प्राण्यांवर हल्ला चढवत फस्त करतात. सोळा गाव काटवन परिसरात दररोज कुठेना कुठेतरी बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडते. हल्ल्यात विशेषतः पाळीव प्राण्यांचा बळी जातो.
वन विभागाला माहिती दिल्यावर वन कर्मचाऱ्यांकडून पंचनामाही केला जातो. नुकसानग्रस्त पशुपालकास घटना घडल्याचे पत्र देण्यापासून तर मृत जनावरांचे शवविच्छेदन अहवालापर्यंतची सर्व कागदपत्रे सादर करण्याचा प्रवास मात्र नकोनकोसा वाटतो. म्हसदीसह परिसरात बिबट्याचा वावर काही नवीन गोष्ट नाही.
दुसरीकडे नाशिक बसमध्ये प्रवास करणाऱ्यांना बिबट्या दिसणे कुतूहल होते. अनेक बिबटे, मादी, बछड्यांचा मुक्त संचार असल्याचे वन विभागानेही मान्य केले आहे. वर्षभरात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांसमोर बिबट्याने दहशत निर्माण केली आहे.
प्राणी, पक्ष्यांचे स्थलांतर..!
साक्री तालुक्यात हजारो हेक्टर सुरक्षित वनक्षेत्र आहे. वनक्षेत्रात ससा, हरणे, कोल्हे, लांडगे, तरस, वानरे, बिबटे यांसारखे वन्यपशू, तर मोर, तितर, कबुतरे यांसारखे पक्षी आहेत. यंदा ऐन पावसाळ्यातही पाणवठ्यात पाणीसाठा नव्हता. आज तर कुठेच पाण्याचा टिपूस नाही. पाण्याच्या शोधार्थ वन्यपशू महसूल क्षेत्रात येतात किंवा स्थलांतर करतात.
स्थलांतर करून ते पशु-पक्षी जातील तर कुठे, हाही प्रश्न आहेच. दर वर्षी वन्यपशूंची संख्या वाढत असल्याचे वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी सांगतात. जंगलसंपत्तीच्या संवर्धनाबरोबरच पशु-पक्ष्यांचेही संवर्धन होणे आवश्यक असल्याचे निसर्ग, पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
"वनक्षेत्रात पाणी नसल्याने वन्यपशू भटकंती करत असल्याचे चित्र आहे. वन्यपशूंपासून सावधगिरी बाळगावी. विशेषत: रात्री एकटे-दुकटे फिरू नये." -डी. आर. अडकिने, वनपरिक्षेत्र अधिकारी, पिंपळनेर वन विभाग
"वनक्षेत्राला लागून असलेल्या शेतशिवारात बिबट्याचे दर्शन नित्याचे झाले आहे. पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या वन्यपशूंसाठी वन विभागाने वनक्षेत्रात पाण्याची व्यवस्था करावी. यामुळे बिबट्याचा धोका कमी होऊ शकतो." -स्नेहलता भामरे, माजी सरपंच, काळगाव
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.