हिवाळी अधिवेशनात महिला सुरक्षेचा मुद्दा प्रखरपणे मांडणार... 

Vidhan-Bhavan-nagpur.jpg
Vidhan-Bhavan-nagpur.jpg

नाशिक : राज्याच्या विधिमंडळाचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सोमवार (ता. 16)पासून सुरू होत आहे. या अधिवेशनात शहरातील तीन महिला आमदार हैदराबाद येथील घटनेवर शासनाकडे लक्ष केंद्रित करणार असून, महिला सुरक्षेसाठी विविध उपाययोजनेच्या सूचना करणार आहे. त्याचबरोबर भाजपच्या तिन्ही आमदारांकडून शासनाने अडविलेला निधी मोकळा करण्याची मागणी केली जाणार आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांकडून औष्णिक विद्युत केंद्र व नाशिक सहकारी साखर कारखाना सुस्थितीत आणण्याची मागणी केली जाणार आहे. 

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर आमदारांचा निर्धार 

गेल्या महिन्यात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुंबईत बहुमत प्रस्तावासाठी एक अधिवेशन झाले. त्यानंतर दुसरे अधिवेशन सोमवार (ता. 16)पासून नागपूर येथे सुरू होणार असून, खऱ्या अर्थाने नागरिकांचे प्रश्‍न या अधिवेशनात मांडले जाणार आहे. नाशिक शहरातील मध्य, पूर्व, पश्‍चिम व देवळाली या चार विधानसभा मतदारसंघांपैकी पूर्व वगळता तिन्ही मतदारसंघांत महिला आमदार आहे. त्यामुळे हैदराबाद येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर महिला सुरक्षेचा मुद्दा या अधिवेशनात प्रखरपणे मांडला जाणार असल्याचे या आमदारांनी "सकाळ'कडे सांगितले. पूर्व व देवळाली मतदारसंघातील अनुक्रमे ऍड. ढिकले व आहिरे पहिल्यांदाच निवडून आल्याने त्यांच्यासाठी अधिवेशन महत्त्वाचे आहे. अधिवेशनात प्रश्‍न मांडण्याची संधी आल्यास विकासकामांबरोबरच महिला सुरक्षेच्या मुद्द्याला प्राधान्य देणार असल्याची माहिती दिली. 

महिलांना सुरक्षित घरी पोचण्यासाठी ड्रॉप सिस्टिम सुरू करण्याची मागणी

महाविकास आघाडी सरकारने पूर्वी मंजूर केलेला निधी थांबविला आहे. मध्य नाशिक मतदारसंघात अकरा कोटींचा निधी थांबल्याने विकासकामांवर त्याचा परिणाम झाल्याने या विषयावर विधानसभेत प्रश्‍न मांडणार आहे. रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांना सुरक्षित घरी पोचण्यासाठी ड्रॉप सिस्टिम सुरू करण्याची मागणी विधानसभेत केली जाईल. - प्रा. देवयानी फरांदे, आमदार, मध्य नाशिक 

महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष योजना राबविण्याची मागणी

पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात दहा कोटींचा निधी शासनाने अडविल्याने यावर भूमिका मांडावी लागेल. त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष योजना राबविण्याची मागणी केली जाईल. शहरी भागात सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत ही प्रमुख मागणी आहे. - सीमा हिरे, आमदार, नाशिक पश्‍चिम 

लष्करी हद्दीपासून बांधकामांवर घातलेली मर्यादा

महिला सुरक्षेच्या मुद्द्याबरोबरच नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी शासनाने मदत करावी, एकलहरे औष्णिक वीज केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी ऊर्जामंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल. त्याचबरोबर लष्करी हद्दीपासून बांधकामांवर घातलेली मर्यादा हादेखील महत्त्वाचा विषय आहे. - सरोज अहिरे, आमदार, देवळाली 

अधिवेशनाच्या माध्यमातून शासनाकडे प्रलंबित निधी मागणार

शासनाच्या नगरविकास विभागाने विकासकामांचा निधी अडविल्याने परिणामी काही कामे थांबली आहेत. अधिवेशनाच्या माध्यमातून शासनाकडे प्रलंबित निधी मागणार आहे. शहरात गुन्हेगारी वाढली आहे. एटीएम लूट, घरफोड्या, महिलांची छेडछाड या घटना वाढल्याने हे विषय प्रकर्षाने मांडणार. - ऍड. राहुल ढिकले, आमदार, नाशिक पूर्व 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com