Nashik News : आदिवासी विकास विभागाने बिरसा मुंडा रस्ते जोड योजनेतून आदिवासी उपयोजना क्षेत्रातील आठमाही रस्ते बारमाही करण्याचा निर्णय घेतला असून त्यातंर्गत प्रस्ताव मागविले जात आहे. (48 eight month roads in tribal talukas will be perennial nashik news)
आदिवासी विकास विभागाने मागविलेल्या प्रस्तावानुसार या योजनेतून नाशिक जिल्ह्यातील नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी या तालुक्यांमध्ये १०३ किलोमीटर लांबीचे रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी ६६.४५ कोटी रुपये खर्च येणार असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने पाठवला आहे. त्याचप्रमाणे या रस्त्यांसाठी वनविभागाची व खासगी जमीन अधिग्रहीत करण्यासाठी साधारणपणे ३२.३९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
नाशिक जिल्ह्यात इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण, बागलाण हे आदिवासी बहुल तालुके आहेत. या तालुक्यांमधील प्रमुख ग्रामीण रस्ते व इतर जिल्हा मार्ग यांची कामे झाली असली तरी दोन गावांना जोडणारे अथवा वाडी वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे झालेली नाही. यामुळे हे कच्चे रस्ते केवळ आठमाही आहेत.
त्यामुळे पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांना घेऊन जाण्यासाठी तेथे वाहने जाऊ शकत नसल्याने नागरिकांना अनेक किलोमीटरपर्यत रुग्ण डोलीमध्ये टाकून मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागत असतात. यामुळे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी या आठमाही रस्त्यांचे रूपांतर बारमाही करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर मांडला होता.
या प्रस्तावाला सरकारने मान्यता दिली असून अर्थसंकल्पात यासाठी बिरसा मुंडा रस्ते जोड योजनेची घोषणा केली आहे. आदिवासी विकास विभागाच्या बिरसा मुंडा या योजनेच्या निधीतून ही कामे केली जाणार असून त्यासाठी अर्थसंकल्पात चार हजार कोटींची तरतूद केली आहे. यासंदर्भात डॉ. गावित यांनी गत महिन्यात राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठक घेतली होती.
बैठकीत सर्व जिल्हा परिषदांच्या बांधकाम विभागाने आदिवासी भागातील आठमाही रस्त्यांची पाहणी करून त्याचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने सर्व आठमाही रस्त्यांचा अहवाल तयार केला आहे.
३५ हजारांहून अधिक नागरिकांना लाभ
तयार केलेल्या अहवालानुसार नाशिक जिल्ह्यातील नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी या तालुक्यांमध्ये १०३ किलोमीटर लांबीचे आठमाही रस्ते बारमाही करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या पाच तालुक्यांमध्ये या योजनेतून एकूण ४८ रस्ते तयार केले जाणार असून त्या रस्त्यांचा ३५ हजारांवर नागरिकांना लाभ होणार आहे. या रस्त्यांसाठी ६६.४५ कोटी रुपये खर्च येणार असल्याचेही प्रस्तावात नमूद केले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.