पळसन (जि. नाशिक) : मोरडा येथील पाणी टंचाईचे पडसाद मंत्रालयात उमटले असून याची दखल पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी घेतली आहे. परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुंबईहून स्वीय सहाय्यक संजय मासिलकर व सचिव सुरज चव्हाण यांनी रणरणत्या उन्हात मोरडा गावाला भेट दिली. या दरम्यान आदिवासी बांधवांचे पाण्याची दुरावस्था पाहून जबाबदार अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढत कान उघाडणी केली. मोरडा गावातील विहीरीने जानेवारी पासूनच तळ गाठला असल्याने विहीर कोरडी ठाक झाली आहे. तरी देखील प्रशासन गावातील पाणी टंचाईकडे कानाडोळा करीत आहेत.
''पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पैसे घेऊनच आलो आहे''
स्वीय सहाय्यक मासिलकर म्हणाले, पाणी टंचाई ही बाब पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मिडिया, प्रिंट मिडिया, सोशल मीडिया यांना अगोदरच माहीत होते. हिच बाब त्या गावातील ग्रामसेवक, तलाठी, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांना का माहिती होत नाही. मंत्री आदित्य ठाकरे यांना मुंबईत मोरडा गावातील पाणी टंचाईचे भिषण वास्तव बघायला मिळते. अधिकारी वर्ग झोपा काढतात का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याची दखल घेत त्यांनी मला मुंबईहून पाठवले आहे. येत्या आठ दिवसात मोरडा, गळवड, रोंघाणे, दांडीचीबारी, धुरापाडा, पांगारबारी, म्हैसमाळ, देवळा, शिरीषपाडा, मोहपाडा खुं, गोंदुणे ग्रामपंचायतीमधील पिंपळसोंड पैकी उंबरपाडा (पि) येथे अद्यापही पिण्याच्या पाण्याकरता विहीर नाही. त्यामुळे वीज नसेल तर ग्रामस्थांना खड्यातील दूषित पाणी प्यावे लागते. विहीर मंजूर करावी अशी मागणी केली जाते आहे.
टंचाई ग्रस्त गाव, पाडा, वाडी, वस्तीचे प्रस्ताव सादर करावेत असे आदेश त्यांनी दिले. यावेळी त्यांनी कोरड्या विहिरीची तसेच जंगलातील नैसर्गिक झऱ्याची, पाणवठ्यावर खोल दरीत जाऊन पाहणी केली. महिलांच्या समस्या जाणून घेत ते म्हणाले की, शाळेत विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे दीड किलोपेक्षा जास्त असू नये हा शासनाचा नियम आहे. मात्र आदिवासी भागात हेच विद्यार्थी खोल दरीतून दोन दोन हंडे डोक्यावर पाण्याने भरलेले आणावे लागतात हे चित्र वाईट आहे ते कोठेतरी बदलायला हवे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महादरवाजाची मेट व खरवळ या पाड्यावरील पाणी टंचाईची दखल आदित्य ठाकरे यांनी घेतली आहे. मी पैसे घेऊनच पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आलो आहे. माझ्याकडे तात्काळ प्रस्ताव सादर करा. सुर्य आग ओकतोय अशा भर उन्हात आदिवासी महिलांना डोक्यावर हंडे घेऊन रानोमाळ हिंडावे लागते. हे थांबले पाहिजे.
यावेळी जिल्हा प्रमुख सुनिल पाटिल, विलास गोसावी, राजु पाटील दंवगे, तालुका प्रमुख मोहन गांगुर्डे, कृष्णा चौधरी, एकनाथ गवळी, देविदास वार्डे, एकनाथ भोये, संजय पडेर, पुंडलिक गांगुर्डे यांसह ग्रामस्थ पारी चौधरी, मनिषा चौधरी, कली चौधरी, विमल चौधरी, शब्द चौधरी, रेखा चौधरी, मैना चौधरी, कुसुम चौधरी, चंदर चौधरी, भारती चौधरी, मोहना चौधरी, भागीबाई चौधरी, सुकर वाघमारे, भारती वाघमारे, विमल वाघमारे, सावित्रीबाई दळवी आदी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.