राज्यात साडेतीन लाख टन तांदळाचे वितरण : भुजबळ

chhagan-bhujbal-and-rice.jpg
chhagan-bhujbal-and-rice.jpg

नाशिक : पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रत्येक लाभार्थ्याला महिन्याला पाच किलो तांदूळ देण्यात येणार आहे. शिधापत्रिकाधारकाने नियमित धान्य खरेदी केल्यावर कुटुंबातील संख्येनुसार हा तांदूळ मोफत दिला जातोय. भारतीय खाद्य निगमकडून तीन लाख 50 हजार 82 टन नियतन प्राप्त करून घेतले जात आहे. या तांदळाचे 3 एप्रिलपासून लाभार्थ्यांना वितरण सुरू करण्यात आले आहे. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती सोमवारी (ता.6) येथे दिली. 

पाच दिवसांत 16 लाख 37 हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप - भुजबळ  
एप्रिल, मे आणि जूनमध्ये हा तांदूळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे सांगून श्री. भुजबळ म्हणाले, की "लॉकडाउन'मध्ये राज्यातील स्वस्त धान्य दुकानांतून 1 ते 5 एप्रिलदरम्यान 16 लाख 37 हजार 830 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. 65 लाख 59 हजार 956 शिधापत्रिकाधारकांचा त्यात समावेश आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही शिधापत्रिकांच्या पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे सात कोटी आहे. बीपीएल कार्डधारकांना अंत्योदय योजनेंतर्गत दोन रुपये किलो दराने कार्डला 15 किलो गहू आणि तीन रुपये किलो दराने कार्डला 20 किलो तांदूळ दिला जातो. त्याचप्रमाणे 20 रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते. केशरी शिधापत्रिकांच्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना दोन रुपये किलो दराने व्यक्तीला तीन किलो गहू आणि तीन रुपये किलो दराने व्यक्तीला दोन किलो तांदूळ दिला जातो. 

जिल्ह्यात 79 हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप 
नाशिक जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे एकूण सात लाख 63 हजार 305 शिधापत्रिकाधारक आहेत. या लाभार्थ्यांना दोन हजार 608 स्वस्त धान्य दुकानांतून 79 हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप केले. त्यात तीन लाख 12 हजार 214 शिधापत्रिकाधारकांचा समावेश आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नसरीकर यांनी ही माहिती दिली. 

मोफत वाटप 10 एप्रिलपासून 
जिल्ह्यात 50 हजार 925 क्विंटल गहू, 27 हजार 918 क्विंटल तांदूळ, 64 हजार 100 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर "लॉकडाउन'मुळे जिल्ह्यात अडकलेल्या 16 हजार 597 शिधापत्रिकाधारकांनी अन्नधान्य घेतले. तसेच पंतप्रधान योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून मोफत तांदूळ प्राप्त होत आहे. त्याचे मोफत वाटप 10 एप्रिलपासून सुरू होईल. 


राज्यात वाटप केलेले धान्य (आकडे क्विंटलमध्ये) 
गहू - नऊ लाख 12 हजार 232 
तांदूळ - सात लाख 13 हजार 547 
साखर - आठ हजार 438 
(स्थलांतरित पण "लॉकडाउन'मुळे राज्यात अडकलेल्या तीन लाख 34 हजार 747 शिधापत्रिकाधारकांना ते राहत असलेल्या ठिकाणी सरकारच्या पोर्टब्लिटी यंत्रणेंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अन्नधान्य दिले) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com