Dhule News : कोणतीही बाब अनधिकृत असेल तर त्यावर प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उचलला जायला हवा. मात्र, अनधिकृत नळधारकांबाबत धुळे महापालिकेकडून वर्षानुवर्षे उफराटा कारभार होत असल्याचे पाहायला मिळते.
या अनधिकृत नळधारकांना पाणीपट्टी भरण्यासाठी अक्षरशः विनंती केली जाते. पाणीपट्टी भरा अन्यथा कारवाई करू, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून होते. आता पुन्हा तसे आवाहन विभागाने केले आहे. ( Unauthorized tap holders are requested to pay water bill municipal corporation dhule news )
धुळे शहर हद्दीत ज्या नागरिकांनी अनधिकृत नळ कनेक्शन घेतले आहे अशा नागरिकांनी महापालिका ठरावाप्रमाणे तीन वर्षांची पाणीपट्टी दहा दिवसांच्या आत महापालिकेत भरावी अन्यथा महापालिका अधिनियमानुसार अशा अनधिकृत नळ कनेक्शनधारकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी व धुळे महापालिकेस सहकार्य करावे ही विनंती, अशा आशयाचे आवाहन महापालिकेतर्फे पुन्हा एकदा करण्यात आले आहे.
एकीकडे अधिकृत मालमत्ताधारक, पाणीपट्टीधारकांकडे थकबाकी राहिली तर त्यांच्यावर कारवाई होते. मात्र, ज्यांच्या मालमत्ता अनधिकृत आहेत, ज्यांचे नळ कनेक्शन अनधिकृत आहेत अशांना अभय मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळते. कारण ते कागदावर सापडतच नाहीत. त्यामुळे अशा कारवायांपासून ते बचावत असल्याचे दिसते.
पाणीपट्टीसाठी आवाहन
अशा शहर हद्दीतील अनधिकृत नळधारकांना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पुन्हा एकदा विनंतीवजा आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेने केलेल्या ठरावानुसार अनधिकृत नळधारकांकडून तीन वर्षांची पाणीपट्टी वसूल केली जाते. अर्थात दंडापोटी मागील दोन वर्षांची पाणीपट्टी व चालू पाणीपट्टी असे याचे स्वरूप आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
एका वर्षाची १६९० याप्रमाणे तीन वर्षांची पाच हजार ७० रुपये पाणीपट्टी अशा अनधिकृत नळधारकांना भरावी लागते. शहरात असे किती अनधिकृत नळधारक आहेत याची आकडेवारी समोर येत नाही. मागील काळात अशा नळधारकांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना अनेकदा पदाधिकाऱ्यांनी दिल्या मात्र, त्याचे पुढे काय झाले याचा थांगपत्ता लागत नाही.
थेट कारवाई का नाही
अधिकृत नळधारकांकडे थकबाकी राहिली तर महापालिकेकडून कारवाई केली जाते. मग जे अनधिकृत नळधारक आहेत, त्यांच्यावर का नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. मनपा पाणीपुरवठा विभागाकडून अशा अनधिकृत नळधारकांना वारंवार पाणीपट्टी भरण्यासाठी विनंती का करावी लागते? महापालिकेने केलेल्या ठरावाप्रमाणे ही कार्यवाही होत असल्याचे सांगितले जाते.
मात्र अधूनमधून असे अनधिकृत नळधारक आढळून आले तर अशा लोकांसाठी ही कार्यवाही एकवेळ समजण्यासारखी आहे. मात्र, सरसकट वर्षानुवर्षे अनधिकृत असलेल्या नळधारकांकडे पाणीपट्टीसाठी विनंती करण्याचा प्रकार अनाकलनीय वाटतो. एका अर्थाने मनपाकडून त्यांना अभय दिले जात आहे.
सत्ताधाऱ्यांचे हे वागणेही चुकीचे
मागील काळात नकाणे रोड भागातील मुख्य जलवाहिनीवर अनधिकृतपणे नळ कनेक्शन्स बंद करण्यात आली. हाच धागा पकडून सत्ताधारी काही नगरसेवकांनी विरोधी पक्षाच्या त्यातही विशेषतः अल्पसंख्याक भागातील काही नगरसेवकांना उद्देशून आम्ही अशी कारवाई केली. तुम्ही तुमच्या भागात कारवाई करून दाखवा, असे आव्हान दिले होते.
हा प्रकारही चुकीचा होता. वास्तविक अनधिकृत नळकनेक्शन असो की अन्य काहीही त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. सत्ताधारी निर्देश देतात. मात्र, तुमच्या भागात तुम्ही कारवाई करा, असे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. तसे असेल तर सत्ता, प्रशासन काय कामाचे, असा प्रश्न उभा राहतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.