नागपूर : अधिकारी येतात आणि जातात यात काहीच नवीन नाही. बदली ही प्रशासनाच्या कामाचा एक भाग आहे. आज नियुक्त झालेल्या अधिकाऱ्याची काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी बदली होत असते. याचा सामान्य माणसांच्या जीवनावर कोणतीही फरक पडत नाही. फार फार तर त्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याचा फरक पडत असेल. मात्र, तुकाराम मुंढे याला अपवादच. वाचा सविस्तर...
तुकाराम मुंढे यांची नागपुरातून बदली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिवपदी झाली होती. परंतु, कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे ते नागपुरातच होते. दोन दिवसांपूर्वी त्या बदलीचा आदेशही रद्द करण्यात आला. यामुळे ते नागपुरातच राहतील अशी चर्चा रंगू लागली. याचा सर्वाधिक आनंद सामान्य माणसाला झाला. मात्र, हा आनंद काही काळापुरताच होता. शुक्रवारी तुकाराम मुंढे हे खासगी वाहनाने कुटुंबासह मुंबईला रवाना झाले.
मात्र, शुक्रवारी एक गोष्ट पाहण्यासारखी होती, ती म्हणजे उसळलेला जनसमुदाय. मुंढे राहत असलेल्या सिव्हिल लाईन्स येथील आयुक्त निवासस्थानासमोर नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. ‘तुकाराम मुंढे आगे बढो हम तुम्हारे साथ है’, ‘शासकीय अधिकारी कैसा हो, तुकाराम मुंढे जैसा हो’, ‘वुई वॉण्ट मुंढे’, ‘आयुक्त नही फकीर है, ये नागपुरकी तकदीर है’ आदी घोषणा मुंढे समर्थक देत होते. गर्दी प्रचंड झाल्यामुळे बंदोबस्तावरील पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली होती.
राजकीय नेत्यांच्या स्वागताला किंवा निरोपाला गर्दी होणे स्वाभाविक आहे. परंतु, शासकीय अधिकाऱ्याच्या निरोपाला नागरिकांनी स्वयस्फूर्तीने एकत्र येत मोठी गर्दी करून त्यांना निरोप देणे, अशी घटना क्वचितच घडते.
नागपुरात तसेच घडले. धडाकेबाज, कठोर, शिस्तप्रिय, कायद्यांचे काटेकोर पालन करणारे अधिकारी तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी नागपूरचा निरोप घेतला. निरोप देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानासमोर नागपूरकरांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. वुई वॉण्ट मुंढे यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
अनेक घडामोडीनंतर तुकाराम मुंढे सहकुटुंब मुंबईला रवाना झाले. त्यांना निरोप देण्यासाठी नागपूरकरांनी त्यांच्या घरासमोर चांगलीच गर्दी केली होती. अनेक घोषनाही देण्यात येत होत्या. ते ज्या गाडीत बसले होते त्यावर नागरिकांकडून फुलांचा वर्षाव करण्यात येत होता. असा सन्मान राजकीय नेत्यांना मिळत असतो, हे विशेष...
तुकाराम मुंढे हे नाव अगदीच अल्प कालावधीत अख्ख्या महाराष्ट्राच्या परिचयाचे झाले. नागपुरात आल्यावर देशपातळीवर त्यांची कीर्ती पोहोचली, ती स्मार्ट सिटीच्या सीईओ पदामुळे. महापालिकेत अगदी पहिल्या दिवसापासूनच सत्ताधाऱ्यांसोबत त्यांचे खटके उडणे सुरू झाले आणि आयुक्त आणि सत्ताधाऱ्यांत सुरू झाला शह-काटशहाचा खेळ. या खेळात सत्ताधाऱ्यांची सरशी झाली, असेच मुंढे यांच्या तडकाफडकी झालेल्या बदलीनंतर म्हणावे लागेल.
तुकाराम मुंढे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक कंगोरे आहेत. नागपुरात येण्यापूर्वीच नागपूरकरांना त्यांची ओळख होती. येथे आल्यावर नागरिकांनी तुकाराम मुंढे प्रत्यक्ष अनुभवले. कर्तव्यदक्ष, कठोर आणि नियमांचे तंतोतंत पालन करणारे अधिकारी म्हणून असलेली त्यांची ओळख येथेही कायम ठेवली. जनतेला ते हवेहवेसे वाटू लागले. परंतु, इतर शहरांप्रमाणे येथेही पदाधिकाऱ्यांशी त्यांचे पटले नाही आणि तडकाफडकी त्यांची बदली झाली.
स्मार्ट सिटीच्या विषयात पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी मुंढेंच्या बदलीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना साकडे घातले होते. गडकरींनी मुंढेंची तक्रार केंद्रीय नगर विकास विभागाकडे केली होती. तेव्हापासून त्यांची उचलबांगडी होणार, असे सांगितले जात होते. याशिवाय महापौर संदीप जोशी यांनी याच विषयात त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. सत्ताधाऱ्यांनी त्यांना चारही बाजूंनी घेरले होते. महापालिकेत भाजपची सत्ता, केंद्रातही भाजपचीच सत्ता. त्यामुळे त्यांची बदली होईल, असे अंदाज वर्तविले जात असतानाच राज्य सरकारचा त्यांना भक्कम पाठिंबा मिळत गेला. मुख्यमंत्र्यांसह इतरही मंत्र्यांनी मुंढेंची बाजू उचलून धरली होती.
महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना शत्रू वाटावे, येवढे कठोर असलेले मुंढे जनतेमध्ये मात्र चांगलेच लोकप्रिय होते. सोशल मीडियावर त्यांना मोठा पाठिंबा मिळाला होता. कुठलाही विषय समजून घेण्याची पद्धत त्यांची चांगली आहे. शहरांतील समस्यांवर उपाय शोधण्यालाही ते उशीर लावत नव्हते. पालिकेची आर्थिक स्थिती सुधारावी, यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात एक स्पष्टता होती. कधी कठोर, तर कधी मृदू अशा अधिकाऱ्यांने पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत थोडी जरी लवचिकता ठेवली असती, तर त्यांना नागपुरातून येवढ्या लवकर जावे लागले नसते.
तुकाराम मुंढे यांची मुंबई येथे बदली झाली होती. नंतर ती रद्द झाली. शुक्रवारी ते मुंबईला गेले असले तरी पुन्हा नागपुरातच येणार असल्याची चर्चा कालपासून जोरात सुरू आहे. बऱ्याच जणांनी तर तुकाराम मुंढे नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून येणार असल्याचे सांगितले. ते आयुक्त असो किंवा जिल्हाधिकारी म्हणून येवो, पण नागपूरला त्यांची गरज असल्याची भावना अनेकांनी बोलून दाखविली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.