मेळघाट नव्हे 'मृत्यूघाट'; १९९३ पासून बाल-मातामृत्यू थांबेना, स्थलांतरही वाढले

child mortality rate not stop in melghat of amravati
child mortality rate not stop in melghat of amravati

अचलपूर ( जि. अमरावती ) : बालमृत्यू, मातामृत्यूची आकडेवारी पाहता मेळघाटला मेळघाट नव्हे,  'मृत्यूघाट' म्हणण्याची वेळ आली आहे. मेळघाट हे दोन गोष्टींमुळे प्रसिद्ध आहे. एक व्याघ्र प्रकल्प आणि दुसरा म्हणजे कुपोषणामुळे होणारे मृत्यू. मेळघाटच्या माथ्यावर लागलेला हा कलंक पुसण्याचे धाडस अद्यापही कोणीच दाखविलेले नसल्याचे वास्तव आहे. 

मेळघाट राज्यातील सर्वाधिक आदिवासी संख्या मिरविणारा, सर्वाधिक वनप्रदेश अंगाखांद्यावर खेळविणारा भाग आहे. मात्र, कुपोषण, बाल व मातामृत्यूंनी मेळघाट बदनाम झाले आहे. १९९३ पासून महाराष्ट्र शासनाने या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी अनेक योजना आणल्या. काही अधिकाऱ्यांनी आणि संस्थांनी धडक योजना राबविल्या. आदिवासी विकास विभागाकडून करोडो रुपयांचे पॅकेज मेळघाटसाठी खर्ची पडले. कुपोषण निर्मुलनासाठी विशेष सोयी-सवलती जाहीर झाल्या आणि संपल्यासुद्धा. मात्र, कुपोषण आणि बालमृत्यूचा प्रश्न आहे तिथेच आहे. मेळघाटातील बालमृत्यू थांबणार कधी हा प्रश्न सतत उपस्थित केला जात आहे.

यावर्षी सुद्धा एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात ४० बाल, ६ माता, तर २१ उपजत मृत्यू झाले. याला जबाबदार अनेक घटक आहेत. अंधश्रद्धा, बेरोजगारी, अशिक्षितपणा, शासनाचे दुर्लक्ष, पालकांचे दुर्लक्ष आदी कारणे सर्वांना माहीत आहेत. यावर अनेक शासकीय आणि अशासकीय संस्थांनी अभ्यासही केले. पण पुन्हा प्रश्न तसाच आहे. आता प्रश्न सोडवायचा म्हटले तर मुंबईपासून मेळघाटपर्यंत पुन्हा चर्चा सुरू होतील, एकमेकांवर आरोप होतील, सामाजिक संस्था शासनावर आगपाखड करतील, मात्र परिणाम शून्य. या सर्वांची मेळघाटमधील आदिवासींनाही आता सवयच झाली आहे. यामध्ये काहीजण खरंच प्रामाणिक प्रयत्न करत आहेत, यात जसे काही शासकीय अधिकारी, कर्मचारी, आहेत तसेच काही स्वयंसेवी संस्थाही आहेत. 

मेळघाटात काही वर्षांत स्थलांतराचे प्रमाण खूप वाढले आहे. दरवर्षी, मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव दिवाळीनंतर कामासाठी मेळघाटच्या बाहेर असतात. स्थानिक आदिवासींच्या हाताला पुरेसे कामच नसेल तर ते तरी काय करणार? शासकीय यंत्रणेने ठरविले तर हा प्रश्न चुटकीसरशी सुटू शकतो. 

अंगणवाडीतून मिळणारा आहार हा पोषक नसल्याने महिलांच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण खूपच कमी असते. परिणामी गर्भवती महिलांना प्रसूती काळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. सध्या गर्भवती महिलांसाठी राबविण्यात येणारी अमृत आहार योजना स्पेशल अपयशी ठरत आहे.  
- राम फड, व्यवस्थापक, मैत्री संस्था, मेळघाट.

कुपोषणात वाढ ही औषधांअभावी होत नसून पोषक आहार मिळत नसल्याने होते. तरी कुपोषणासाठी आरोग्य विभागाला नेहमीच दोषी धरण्यात येते. शरीराला पोषक आहार महत्त्वाचा आहे. कमी वजनाचे बालक जन्माला येत असल्यामुळे प्रश्न उद्‌भवत आहे.
- डॉ. शशिकांत पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी, धारणी.

संपादन - भाग्यश्री राऊत
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com