गोष्ट एका नालीची! गावाचे १९९५ला पुनर्वसन अन् २५ वर्षांचा त्रास, वाचा सविस्तर

twenty five years of trouble for a simple drain
twenty five years of trouble for a simple drain

अंबाडा (जि. नागपूर) : अंबाडा (सां.) गावाचे १९९५ला पुनर्वसन झाले. परंतु, २५ वर्षांपासून गावकऱ्यांना पायाभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे, ही आश्‍चर्याची बाब आहे. रस्ता, वीज, पाणी यासारख्या समस्यांचे सोडा एका साध्या नालीसाठी गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचा प्रकार येथे घडत आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार ग्रामस्थ करीत आहेत.

नाली नसल्यामुळे गावातील सर्व सांडपाणी नागरिकांच्या घरात मुरत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत या नालीचे बांधकाम होणे गरजेचे आहे. परंतु, अजूनपर्यंत या नालीच्या बांधकामाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

१९९५ मध्ये या गावाचे पूनर्वसवन झाले, तेव्हापासून याकडे कोणीच लक्ष दिले नाही. नालीसाठी ग्रामपंचायतने वारंवार निवेदन सुद्धा दिले. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने सातत्याने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामपंचायत व जनतेने केला आहे.

संपूर्ण गावातील सांडपाणी या नालीमधून वाहते. मात्र, १९९५ पासून नालीच नसल्यामुळे हे पाणी या बाजूला वास्तव्यास असणाऱ्या जनतेच्या घरात शिरत आहे. कोरोनासारख्या भीषण परिस्थितीमध्ये कितपत हे योग्य आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जनतेला होत असलेला त्रास कोणीच बघत नसून सगळे विभाग मूग गिळून बसले आहेत.

ही नाली न झाल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. नालीचे काम लवकरात लवकर नाही झाले तर प्रदीप वानखडे, महादेव बगडते, गणपत भोंडे, गुलाबभोंडे, मधुकर भोंडे, जयभारत नेहारे, सुभाष तट्टे, गुलाब घटवाडे, नितेश घटवाडे, धनराज घाटवाडे, मनोहर घाटवाडे, जगनाथ ढोले, एकनाथ वानखडे, घनश्याम कलत्री, पंढरी पटोळे, हरिभाऊ पटोळे, मधुसूदन आंडे, किसना टेकोडे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो
नालीमुळे आम्हाला खूप त्रास सहन करावा लागत आहे. आमच्या आरोग्याला धोका आहे. या बाबतची अनेकदा ग्रामपंचायतला तोंडी तक्रार केली आहे. तरीपण याकडे कोणीही लक्ष देत नसून ग्रामपंचायतला विचारणा केली असता आमच्या विभागात येत नसल्याचे उत्तरे मिळते.
- प्रदीप वानखडे,
रहिवासी अंबाडा

परिवाराला आरोग्याचा धोका
तीस वर्षांपासून ही नाली झालीच नाही. संपूर्ण पाणी माझ्या अंगणात येत आहे. मला व माझ्या परिवाराला आरोग्याचा धोका आहे.
- महादेव बगडते,
रहिवासी अंबाडा

हेतुपुरस्सर दुर्लक्ष
हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये येतो. तो वर्धा जिल्ह्याला जोडला गेला आहे. ज्या गावातून सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता जातो, तेथील गावातील नाली बांधण्याची जबाबदारी ही संबंधित विभागाची असते. ५ वर्षांपासून या नालीसाठी संबंधित विभागाला ग्रामपंचायतत पाठपुरावा करीत असून सार्वजनिक बांधकाम विभाग हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे.
- कविता बांगर,
सरपंच, ग्रा.पं. अंबाडा

मंजुरी मिळाली नाही
नालीच्या अनेक वेळा तक्रारी आल्या असून मागील वर्षी ‘बजेट’मध्ये नालीचे काम टाकले होते आणि डीपीडीसीला पण दिली होती. परंतु, अद्यापही मंजुरी मिळाली नाही.
- देवासे,
कनिष्ठ अभियंता
सार्वजनिक बांधकाम विभाग, नरखेड

संपादन - नीलेश डाखोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com