police action on farmers agitation in yavatmal
police action on farmers agitation in yavatmal

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रशासनाची तारांबळ, पोलिसांनी अनेकांना केले स्थानबद्ध

यवतमाळ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017अंतर्गत कर्जमाफी व महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेमध्ये पात्र असूनही मागील तीन वर्षांपासून घाटंजी, यवतमाळ, आर्णी या तालुक्‍यांतील कर्जमाफीपासून 269 शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आले आहे. वारंवार निवेदने देऊन व मोर्चे काढूनही शासनाने कुठलीच दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यामुळे शनिवारी (ता.21) चोख बंदोबस्त लावून यवतमाळ शहर पोलिसांनी 73 व घाटंजी पोलिसांनी 35 शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले. दरम्यान, या आंदोलनामुळे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली.

खरीप हंगामात शेतकरी अधिकच संकटात सापडले आहेत. सुरुवातीला बोगस बियाणांचा फटका, दुबार पेरणी, त्यातच कोरोनाचे संकट ओढवले आहे. हे कमी होते म्हणून की काय, अवकाळी पावसाने कापूस व सोयाबीन हे पूर्णतः हातचे निघून गेले. अशा विविध संकटांत सापडलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी व दुष्काळी मदत मिळालीच नाही. त्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांनाही मदतीपासून वंचित ठेवण्यात आल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. ऑक्‍टोबर 2019मध्ये शेतकरी सन्मान योजनेची 23वी ग्रीनयादी आली. त्यानंतर या योजनेला ब्रेक लागला आहे.

अनेक शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या शासन दरबारी मांडल्यात. या मागण्यांकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. शनिवारी (ता.21) शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात धडकणार होते. मात्र, त्यांना यवतमाळमधील आर्णी रोड, कोलंबी फाटा व घाटंजीसह इतर ठिकाणी अडविण्यात आले व एकूण 108 शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी दक्षता भवन येथे स्थानबद्ध केले. यावेळी शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मागण्यांकडे लक्ष वेधणार होते. यासाठी शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशाराही दिला होता. मात्र, आंदोलनासाठी येत असतानाच शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी स्थानबद्ध करण्यात आले. 

शिरोली येथील चंद्रकांत इंगळे, हरिभाऊ तिवने, रवींद्र अहिरकर, तुकाराम कोरवते, लक्ष्मण कोरवते, अब्दुल चव्हाण, गणेश लिखार, रमेश गावंडे, गोविंद काळे, पांडुरंग मेश्राम, राहुल ढवळे, सलमान पठाण, संतोष कोटेकार यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. 

जिल्हाधिकारी कार्यालय, महामार्गावर मोठा बंदोबस्त -
प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी येणार असल्याने पोलिसांनी आर्णी व घाटंजी या मार्गांवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. शेतकऱ्यांना बाहेर रोखण्यासाठी शहराच्या चारही मार्गांवर बंदोबस्त लावण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयालाही छावणीचे स्वरूप आले होते. चौकशी केल्याशिवाय कुणालाही आत प्रवेश देण्यात आला नव्हता. आंदोलनासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध करण्यात आले. शेतकरी घाटंजी, आर्णी व यवतमाळ तालुक्‍यांतील आहेत. शासनाने आवाज दडपण्याचा प्रयत्न केल्याने शेतकऱ्यांनी या घटनेचा निषेध नोंदविला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com