Vidarbha News : सहाशे वर्षांपूर्वी पूर्व विदर्भात जलसंवर्धन आणि जलसिंचनासाठी अत्यंत महत्वाचे मॉडेल असलेल्या तसेच पर्यावरणाचे सर्व संतुलन राखत पाणी वाचविण्यासोबत खरीप भातशेतीसाठी वरदान ठरलेल्या बोळी (लहान तलाव) प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे संकटात सापडल्या आहेत.
येत्या काळात त्या वाचविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला नाही तर त्या इतिहासजमा होण्याची भीती स्थानिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.बोळी अथवा बोडी ही वाचविण्यासाठी, तिचे संवर्धन करण्यासाठी सरकारने तात्काळ मोहीम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. पूर्व विदर्भातील या प्राचीन वारसा सांगणाऱ्या बोळी या केवळ जलसंग्रहाचे मोठे स्त्रोत तर आहेत, शिवाय त्यांच्यामुळेच भूजल पातळी वाढविण्यासाठी त्यांच्या माध्यमातून मोठी मदत मिळत असते.
पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी त्यांनी आजपर्यंत मोठी भूमिका बजावलेली आहे. खरीप पिकांना लागणारे पाणी पुरविण्यापासून ते जंगलातील पशू, पक्षी, प्राणी यांचेही ते पिण्याच्या पाण्याचे मोठे केंद्र आहेत, मात्र, अलीकडे या बोळी बुजवल्या जात असल्याने जंगातील पशू, पक्षी, प्राणी यांच्या पाण्याचे हे केंद्र संपुष्टात आल्याने त्यांचे पर्यावरणाचेही संतुलन बिघडले असून त्यातून पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत असल्याची प्रतिक्रिया पुरातत्व संशोधक डॉ. रघुनाथ बोरकर यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात वाढोणा या गावी नागभीड तालुक्यातील वाढोणा गावातील कुंभार बोडी, चांभार बोडी, महार बोडी, गोंडाची बोडी, जानबा तेल्याची बोडी, याशिवाय आसाई बोडी, येरन बोडी, जांभार बोडी, माराईची बोडी, रामाजीची बोडी, निंबाची बोळी, देवार बोळी, उमदाई बोळी आदी नावाने त्या होत्या.
अशीच नावे पूर्व विदर्भातील अनेक गावांमध्ये असलेल्या बोळीची आहेत. प्रत्येक बोळीचे वेगळे वैशिष्ठ्ये आहेत त्यापैकी केवळ काहींचेच अस्तित्व उरले असून अशीच स्थिती ही पूर्व विदर्भातील अनेक गांवांमध्ये असलेल्या प्राचीन बोळींची झाली आहे. त्यांचे संवर्धन करण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज डॉ. बोरकर यांनी व्यक्त केली.
दरम्यान, चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने २०२१ मध्ये जिल्ह्यातील सर्व प्राचीन बोळ्या जतन करून त्या संरक्षित व्हाव्यात यासाठी आदेश जारी केले होते, परंतु त्याची नीट अंमलबजावणी होऊ शकली नाही. सरकारी जागेत असलेल्या बोळ्या कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी बुजवण्याचे प्रकार केले तर काही ठिकाणी खाजगी बोळ्यावर भराव घालून त्या बुजवल्या गेल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
बोळ्याचे प्राचीन महत्व...
- गोंड राजा किसनसिंह (इ.स. १६८४- १६९६) यांच्या कार्यकाळात शेती विकास आणि जलसिंचनासाठी प्रमुख साधन म्हणून बोळ्याची निर्मिती करण्यात आली.
- जलसिंचन आणि जलसंग्रहाचे अत्यंत महत्वाचे साधन होते.
- पूर्वजांनी उपलब्ध करून दिलेला, नैसर्गिक जल स्त्रोत्राचा अमूल्य असा ठेवा आहे.
- गावगाड्यातील प्रत्येक घटकांच्या नावे असलेल्या बोळ्यामुळे समान न्यायाचे तत्व राखले जात होते
- भूजल पातळी वाढविण्यासाठी बोळ्या महत्वाच्या ठरतात. उन्हाळ्यातही पाणीसाठा उपलब्ध असतो.
- पाणी टंचाईवर बोळ्या सक्षम पर्याय म्हणून उपयोगी ठरतात
- विविध जातींच्या व्यवसायांसाठी बोळ्यांची निर्मिती झाली होती.
- सिंचनासाठी सर्वात मोठी भूमिका बोळ्यांची होती
- जंगलातील पशू, पक्षी, प्राणी यांच्या पाण्याचे मोठे साधन आहेत.
अशा केल्या जात आहेत बोळ्या नष्ट
- बोळ्या या काही शासकीय तर काही खाजगी मालगुजरांच्या मालकीच्या जागांवर असल्याने त्या बुजवून त्या ठिकाणी इमारती, बांधकाम केले जात आहेत. त्यामुळे प्राचीन ठेवा कायमचा नष्ट होत असून यामुळे पर्यावरणही धोक्यात आले आहे.
- नागभीड तालुक्यात ३५६ बोळ्या होत्या, त्यातील अनेक नष्ट करण्यात आल्या असून आता केवळ बोटावर मोजता येतील इतकी संख्या उरली आहे.
भूजल पातळी संकटात
बोळी बुजवल्याने मोफत मिळणारे नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत आपोआप नष्ट होताहेत. परिणामी शेतीच्या पाण्यासाठी बोअरवेल आदी टाकून खर्च केला जातोय. बोळीमुळे भूजल पातळीचे संतुलन होत हेाते, ती नष्ट केल्याने संतुलन बिघडले आहे. परिणामी भूजल पातळीही संकटात आली आहे. अनेक ठिकाणी खरीप पिके घेणे अवघड झाले आहे.
बोळ्या वाचविण्यासाठी पर्याय
- बोळ्यांना राष्ट्रीय संपती म्हणून घोषीत करून संरक्षण करणे.
- बोळ्या वाचविण्यासाठी पूर्व विदर्भात असलेल्या प्रत्येक बोळींचे सीमांकन करणे.
- बोळीच्या आजूबाजूला त्यांची ओळख सांगणारे वन, पर्यावरण विभागाचे बोर्ड लावले जावेत.
- प्रत्येक बोळीचा प्राचीन इतिहास त्याची माहिती कृषी, वन, महसूल विभागाच्या नोंदीत केली जावी.
- पूर्वजांनी निर्माण केलेल्या बोळ्यांचा नव्याने विकास करावा
- सरकारने बोळी वाचवल्या तर पर्यावरण वाचेल, हा संदेश द्यावा
बोळी वाचविण्यासाठी स्थानिकांच्या मागण्या
- कृषी, सरकारी अधिकारी, खाजगी मालगुजारांकडून बोळी बुजवल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत,
- बोळीचे महत्व पटवून देण्यासाठी पर्यावरण विभागाने मोहीम राबवावी
- पर्यावरण, पाणी वाचविण्यासाठी नवीन तलाव आदी पर्यांयापेक्षा प्राचीन बोळ्या संरक्षीत होतील यावर भर द्यावा
पुर्व विदर्भातील बोळी (बोडी) हा आमचा प्राचीन ठेवा आहे. जिल्ह्यात त्याचे जतन झाले पाहिजे. यापुढे कोणत्याही प्रकारे या बोळी बुजवू दिल्या जाणार नाहीत. खाजगी व सरकारी जमिनीवर असलेल्या बोळ्या बुजवल्या जाऊ नयेत यासाठी कृषी विभागालाही सूचना दिल्या जातील. आपल्या पूर्वजांनी निसर्गाचा संतुलन राखण्यासाठी त्या तयार केल्या आहेत. ती नैसर्गिक जल सिंचनाचे स्तोत्र आहेत. त्यामुळे त्या जिल्ह्यात कुठेही बुजावल्या जाणार नाहीत. त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी जिल्ह्यातील प्रत्येकांची आहे.
- सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रपूर तथा सांस्कृतिक कार्य मंत्री
चंद्रपूर जिल्ह्यात ४ हजाराहून अधिक बोळ्या होत्या, आता त्यापैकी १ हजार २०० दरम्यान शिल्लक आहेत. त्या धान उत्पादक शेतकऱ्यांनी वरदान होत्या. जिथे बोळ्या बुजवण्यात आल्या त्या ठिकाणी आता केवळ पावसाच्या भरवशावर पिके घेतली जात आहेत. आता हे शेतकरी संकटात सापडले असल्याने बोळ्याचे जतन करून त्या संरक्षित झाल्या तर भूजल पातळी वाढेल आणि पर्यावरण वाचेल.
- संजय वैद्य, जल तज्ञ, चंद्रपूर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.