'भाऊ रंगारी की टिळक?' वादावर सुबोध भावेची टिप्पणी !

'भाऊ रंगारी की टिळक?' वादावर सुबोध भावेची टिप्पणी !
'भाऊ रंगारी की टिळक?' वादावर सुबोध भावेची टिप्पणी !

पुणे : 'गणेशोत्सव नक्की कोणी सुरू केला ?... तो 'ह्यांनी' सुरू केला की 'त्यांनी' सुरू केला, यापेक्षा तो सुरू झाला आणि तो आपल्यापर्यंत पोचला आणि त्याने आपल्याला मनःपूर्वक आनंद दिला, हे खूप महत्त्वाचं आहे. तारखा आणि सनावळ्यांमध्ये जसे आपण अडकतो, तसेच 'उत्सवाची सुरवात कुणी केली,' या प्रश्‍नात आपण आज अडकलो आहोत...'' असे वक्तव्य अभिनेता सुबोध भावे याने गणेशोत्सवासंदर्भातील 'भाऊ रंगारी की टिळक?' या सध्या निर्माण झालेल्या वादासंदर्भात केले आहे.

बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) 'अस्तित्व 2017' स्पर्धेचे उद्घाटन सुबोधच्या हस्ते मंगळवारी झाले. भारतीय संस्कृतीत असणाऱ्या विविध कलांच्या प्रदर्शनार्थ महाविद्यालयाच्या 'हेरिटेज कलेक्‍टिव्ह' विभागाने ही स्पर्धा आयोजिली होती. या वेळी सुबोधने गणेशोत्सवाच्या संदर्भात आपले स्पष्ट मत व्यक्त केले. तो म्हणाला, '' स्पर्धेच्या युगात आता आपण माणसासोबत देवालाही आता स्पर्धेत ओढलंय. आमचा गणपती मोठा, आमचा गणपती भारी अशी स्पर्धा देवाच्या बाबतीत योग्य ठरणारे नाही...'' या वेळी सुबोधने लोकमान्य टिळकांची 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !' ही ऐतिहासिक घोषणाही मंचावरून करून दाखवली...

यंदा आपले आठवे वर्ष साजरे करणाऱ्या या स्पर्धेची औपचारिक सुरवात गणेशवंदनेने झाली. त्यात नृत्य, गायन, छायाचित्रण, प्रश्नमंजुषा अशा अनेक उपक्रमांनी रंग भरले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एन. रावळ तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना संबोधताना सुबोध म्हणाला, ''अस्तित्वाची लढाई आपल्या प्रत्येकालाच करावी लागते. जिंकावीही लागते. स्पर्धेच्या या युगात प्रत्येकानेच याला तोंड देण्याची गरज आहे. मात्र, या वेळीही आपला सांस्कृतिक ठेवा जतन करणे, ही आपण आपली नैतिक जबाबदारीच समजायला हवी. केवळ जिवंतपणीच नव्हे, तर माणूस गेल्यानंतर सुद्धा जे उरतं, ते असतं अस्तित्व. त्यामुळे आपलं अस्तित्व कधीही संकुचित असू नये.''

तोडणं सोपंय, जोडणं मात्र कठीण !
सुबोध म्हणाला, '' गोष्टी तोडण्यासाठी फार काही अक्कल किंवा सर्जनशीलता लागत नाही. तोडणं तर खरं म्हणजे खूप सोपं आहे. पण हो, जोडायला मात्र सर्जनशीलता असायला लागते ! गोष्टी जोडायला परिश्रम लागतात. त्यामुळे एखादी गोष्ट जोडणं, ती टिकवणं, सांभाळून ठेवणं हे खरं आव्हान असतं. ते पेलणं महत्त्वाचं...''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com