Ahmednagar Teachers Under Pressure as Non-Academic Responsibilities Continue to Rise
sakal
अहिल्यानगर: निवडणूक कामात हलगर्जीपणा केल्याने गुरुजींवर गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. त्यांच्यावर निलंबनाची कारवाईही सुरू आहे, तर दुसरीकडे त्यांना तालुक्यात घडणाऱ्या गुन्ह्यात पंच म्हणूनही जबाबदारी पार पाडावी लागेल. गुरुजी निवडणूक कामात गुंतले असतानाच आता प्रशिक्षणालाही बोलावले जात आहे. वर्गात अध्यापन करायलाही कोणी उरले नाही. परिणामी जिल्ह्यातील बहुतांशी शाळा एक शिक्षकी झाल्या आहेत.
प्रशासनाच्या अशा रोजच्या शालाबाह्य कामांमुळे गुरुजी वैतागले आहेत. त्यांच्या संघटनांमध्येही नाराजी व्यक्त केली जात आहे. नवीन अभ्यासक्रमासाठी डाएटकडून गुरुजींना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यासाठीही शिक्षकांना उपस्थित राहावे लागत आहे. निवडणूक कामही ३० जुलैपर्यंत चालणार आहे. राहुरीत तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पंच म्हणून पोलिसांना मदत करावी लागेल, असे पत्र काढल्याने अध्यापनाच्या अडथळ्यात आणखीच भर पडली आहे. पंच झाले तर कोर्टाच्या तारखांनाही चकरा माराव्या लागणार आहेत, यामुळे गुरुजी धास्तावले आहेत.
दरम्यान, निवडणूक कामात हलगर्जीपणा केल्याने गणेशवाडी (ता. कर्जत) येथील प्राथमिक शिक्षक रामकृष्ण मारुती शेटे यांच्यावर गुरुवारी (ता.२) मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी निलंबनाची कारवाई केली. कर्जत तालुक्यात मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कामासाठी बीएलओ म्हणून त्यांची नियुक्ती होती. त्यांनी कामात टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवला होता. महसूल विभागाच्या निवडणूक शाखेने त्यांच्याविरुद्ध कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तो अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवला होता. त्यानुसार भंडारी यांनी शेटे यांना सेवेतून निलंबित केले. सिद्धटेक येथील ग्रामपंचायत कर्मचारी ऋषिकेश गणेश भोसले यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.
दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण सुरू आहे. राहुरीतील प्रशिक्षण राहुरीत सावित्रीबाई फुले विद्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू आहे. या प्रशिक्षणात महिला शिक्षकांचीही उपस्थिती आहे. दिवसभर चालणाऱ्या प्रशिक्षणात चहापान, भोजन, स्टेशनरी किंवा अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी केला आहे. डाएट प्राचार्यांच्या आदेशानुसार प्रत्येक प्रशिक्षणार्थीसाठी प्रतिदिन १५० रुपयांची भोजनाची तरतूद केली आहे. असे असतानाही राहुरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून या आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.
जुलै महिन्यात राहुरी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सात वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षेच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख यांची पंच म्हणून नियुक्ती केली आहे. संबंधित शिक्षकांना पोलिस ठाण्याकडून दूरध्वनीद्वारे सूचना मिळाल्यानंतर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अनुपस्थित राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधित शिक्षकांवर राहील, असेही आदेशात नमूद आहे. यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष आहे. शिक्षक जनगणना, मतदार यादी विशेष पूर्ण पडताळणी (एसआयआर), बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) म्हणून मतदार यादीसंबंधीची कामे, शासकीय सर्वेक्षणे, प्रशिक्षण कार्यक्रम तसेच नवीन अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शाळेबाहेरील कामांमध्ये गुंतले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.