अकोला : वारंवार पूरबाधित होणाऱ्या गावांमध्ये पूरनियंत्रणाच्या कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचा आराखडा तयार करा व प्रस्ताव पाठवा. नजिकच्या काळातील पावसाचे अनुमान लक्षात घेता सर्व यंत्रणांनी मुख्यालयी सज्ज रहावे, असे निर्देश अकोला जिल्ह्याचे पालक सचिव सौरभ विजय यांनी गुरुवारी (ता.७) येथे दिले.
पालकसचिवांनी जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, उपायुक्त महसूल संजय पवार, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत, कार्यकारी अभियंता अनंत गणोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.
पालक सचिवांनी पीक कर्ज, पीक विमा, खते बियाणे उपलब्धता, बियाणे खतांसंदर्भातील साठेबाजी व भेसळीसंदर्भात केलेली कारवाई, पूरनियंत्रणाचे नियोजन, कोविड सद्यस्थिती, साथरोग नियंत्रण, औषधांची उपलब्धता, कोविड लसीकरण इ. मुद्यांचा आढावा घेतला. पालक सचिवांसमोर निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त कविता द्विवेदी यांनी माहिती सादरीकरण केले.
अतिवृष्टीची घेतली माहिती
जिल्ह्यात ५३ महसूल मंडळांमध्ये रेनगेज व ॲटोमॅटिक वेदर स्टेशन यंत्रणा कार्यान्वित आहे. जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात ता.२८ जून रोजी बाळापूर तालुक्यात ६६.३ मि.मी., पारस मंडळात ८३ मि.मी., व्याळा मंडाळात ९९ मि.मी., बाळापूर मंडळात ८३ मि.मी अशी अतिवृष्टीची नोंद झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. मांजरी ते अकोला हा रस्ता खचला असून, गावाला जोडणारा पूल वाहुन गेला. या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली.
नैसर्गिक आपत्तीने आतापर्यंत तिघांचा मृत्यू
जून महिन्यापासून निंबी ता. बार्शीटाकळी, मजलापूर ता. अकोला, आलेगाव ता. पातूर येथे अशा तीन व्यक्ती नैसर्गिक आपत्तीमुळे (वादळ व वीज पडून) मृत झाल्या आहेत. सहा जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण २० घरांची अंशतः पडझड झाल्याची नोंद आहे. जून महिन्यातच अतिवृष्टी व पुरामुळे एक हजार ३३५ हे.आर क्षेत्रावर शेती पीक व फळ पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख ६१ हजार ३०८ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या असून, प्रमाण ७८.२५ टक्के इतके आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.