रिसोड (जि.वाशीम) ः एप्रिलपासून हळदीचे भाव स्थिर असल्यामुळे हळदीच्या पिकाने सुद्धा यावर्षी शेतकऱ्यांची निराशा केली आहे. त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
या वर्षी तरी जुलै-ऑगस्टमध्ये हळदीच्या भावात तेजी येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु एप्रिलपासून ५००० ते ५५०० हेच भाव स्थिर आहेत. जुलै-ऑगस्टमध्ये हळदीच्या भावात तेजी येत असते म्हणून, शेतकरी या महिन्यात हळद विक्री करतात. परंतु, यावर्षी मात्र हळदीच्या भावात मुळीच भाव वाढ झाली नाही.
उलट मागील वर्षीपेक्षाही यंदा भाव कमी आहेत. संपूर्ण जगावर कोरोना या विषाणूजन्य आजाराचे सावट असल्यामुळे निर्यात बंद असल्याचे सांगितले जात आहे. हळद हे मसाला वर्गीय पीक असून, कोरोनावरील म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी/टिकवून ठेवण्यासाठी हळदीचा उपयोग केला जातो.
त्यामुळे भाववाढीची फार मोठी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. भाववाढ होत नसल्यामुळे आता मात्र शेतकरी हळद विक्रीस आणत आहेत. मागील पंधरा दिवसांपासून तर येथील बाजार समितीमध्ये हळदीची विक्रमी आवक होत आहे.
मागील काही वर्षापासून कापूस पिकाला पर्याय पीक म्हणून तालुक्यातील शेतकरी हळदीच्या पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळले. यावर्षी हळदीला आठ ते दहा हजार रुपये पर्यंत भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु, चार महिन्यांपासून हळदीचे भाव ४७०० ते ५५०० याच दरम्यान असून, सरासरी ५००० रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे.
दरवर्षी या भागातील शेतकरी हिंगोली, सांगली या ठिकाणी हळद विक्री करत असतं. परंतु यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे हळद विक्रीकरिता अडचणी येत असून, मिळेल त्या भावात शेतकऱ्यांना हळदीची विक्री करावी लागत आहे.
(संपादन - विवेक मेतकर)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.