बलिप्रतिपदेचा दिवस हा साडेतीन मुहूर्तातील एक दिवस मानला जातो.
- दा. कृ. सोमण
अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो.
शुक्रवार, (ता. ०५ ) नोव्हेंबर, कार्तिक शुक्ल प्रतिपदा, बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा, अभ्यंगस्नान, विक्रम संवत् २०७८ प्रमादीनाम संवत्सर, महावीर जैन संवत् २५४८ , गोवर्धन पूजा, अन्नकूट, वहीपूजन आहे. या दिवशी व्यापारी लोक लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुजलेल्या वह्यांवर लेखनास प्रारंभ करतात. आणि या दिवशी पत्नी पतीला ओवाळते आणि पती पत्नीला मौल्यवान वस्तूची भेट देतो. बलिप्रतिपदेचा दिवस हा साडेतीन मुहूर्तातील एक दिवस मानला जातो. या दिवशी मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते. तसेच या दिवशी बलिप्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर शुभ कार्याचा प्रारंभ करतात.
व्यापारीवर्गासाठी बलिप्रतिपदेच्या दिवशी वहीपूजन व वहीलेखनासाठी मुहूर्त...
शुक्रवार (ता. ०५) नोव्हेंबर २०२१ रोजी बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी ६:४२ ते ८:०७ चल, सकाळी ८:०८ ते ९:३२ लाभ, सकाळी ९:३३ ते १०:५७ अमृत, दुपारी १२:२२ ते १:४७ शुभ आणि सायं. ४:३७ ते ६:०२ चल चौघडीमध्ये दिवाळी पाडव्याचे वहीपूजन व लेखन करावे.
बळीची पूजा...
बलिप्रतिपदेच्या दिवशी बळीची पूजा करावयाची असते. त्यासाठी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बळी आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा केली जाते. पुढीलप्रमाणे बळीची प्रार्थना केली जाते.
बलिराज नमस्तुभ्यं विरोचनसुत प्रभु ।
भविष्येन्द्रा सुराराते पूजेनंतर प्रतिगृह्यताम् ।।
" हे विरोचनपुत्र आणि सामर्थ्यवान बलिराजा, तुला माझा नमस्कार असो. तू भविष्यकालीन इंद्र व असुरशत्रू आहेस. (तरी) ही (मी केलेली) पूजा तू ग्रहण कर. "
अशी प्रार्थना करून बळीप्रीत्यर्थ दीप आणि वस्त्रे यांचे दान करतात.
पूर्वी गोकुळवासीयांचा असा समज होता की इंद्र पाऊस पाडतो. म्हणून ते इंद्राची पूजा करीत असत. भगवान कृष्णाने सांगितले की "इंद्र पाऊस पाडीत नसून गोवर्धन पर्वतामुळे पाऊस पडतो म्हणून पावसासाठी गोवर्धन पर्वताची पूजा करायला हवी." पर्वत आणि वृक्ष यामुळे पाऊस पडतो ही गोष्ट मुले आज प्राथमिक शाळेत शिकतात तीच गोष्ट त्याकाळी भगवान कृष्णाने गोकुळवासीयांना सांगितली. म्हणून दरवर्षी कार्तिक शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी गोवर्धन पूजा करण्याची पद्धत पडली आहे. तसेच या दिवशी अन्नकूट करण्याची प्रथा आहे. गावातील प्रत्येक जण एकेक खाद्यपदार्थ मंदिरात आणतो. आणलेले सर्व अन्नपदार्थ एकत्र ठेवून तो नैवेद्य ईश्वराला अर्पण केला जातो. नंतर सर्व गावकरी एकत्र बसून त्या प्रसादाचे सहभोजन करतात. प्राचीन काळापासून सर्वांनी एकत्र येऊन प्रसाद भक्षण करण्याची प्रथा चालू राहिली आहे.
कार्तिक शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी कालभैरवाची पूजा करण्याची प्रथा आहे. या दिवशी सकाळी लहान मुले मीठ घेऊन गावात विक्री करण्यासाठी फिरतात. नूतन वर्षारंभी शुभशकून म्हणून लोक त्यांच्याकडून मीठ खरेदी करतात. ही प्रथा विशेषत: गुजरातमध्ये जास्त करून आढळते.
अक्षर दीपावली
दीपावलीच्या दिवसात सकस साहित्याचे आणि विविध विषयांवरचे दीपावली अंक प्रसिद्ध होत असतात. शंभर वर्षांची परंपरा या 'अक्षर दीपावलीला' लाभली आहे. दीपावली अंकांची तयारी जवळ जवळ वर्षभर सुरू असते. लोकही दीपावली अंकांचे मोठ्या उत्साहात स्वागत करीत असतात. दीपावली अंकातील लेखनास प्रारंभ करून बरेच लेखक हे मोठे साहित्यिक झाले आहे. आधुनिक काळात इ-दीपावली अंकही प्रसिद्ध होत असतात. सध्या वाचन संस्कृती वाढविण्यासाठी दीपावली अंकांचे मोठे मोलाचे योगदान लाभले आहे.
दिवाळी पहाट
मला वाटते की श्री. विद्याधर निमकर यांच्या चतुरंग संस्थेने ' दिवाळी पहाट ' हा शब्द प्रथम प्रचारात आणला आणि प्रथम कार्यक्रम आयोजित केला होता. सध्या अनेक संस्था दिवाळी पहाटचे कार्यक्रम आयोजित करीत असतात. त्यामुळे अनेक कलावंताना आपली कला सादर करण्याची संधी मिळत असते. दिवाळीच्या दिवशी आणि पहाटे किती श्रोते गाणी ऐकायला येणार ? असा प्रश्न प्रथम संयोजकांना पडला होता. परंतु महाराष्ट्रातील रसिक श्रोते या संगीत दीपावली फराळाचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी करीत असतात. सध्या केवळ शहरातच नव्हे तर अनेक गावातूनही ' दिवाळी पहाट ' आयोजित केली जात असते. महाराष्ट्रात दीपावली उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ' दिवाळी पहाट ' कार्यक्रम मदत करीत असतात.
प्रकाशाचा उत्सव
दीपावली हा 'प्रकाशाचा उत्सव' आहे, दीपज्योत हे बुद्धीचे व ज्ञानांचे प्रतीक आहे. " तमसो मा ज्योतिर्गमय" म्हणजे अंधारापासून मला प्रकाशज्योतीकडे ने. अशी ऋषींनी उपनिषदात प्रार्थना केलेली आहे. पण या कलियुगात आपल्याला दुसरा कोणी प्रकाशाकडे नेणार नाही. आपणच आपल्याला प्रकाशाकडे नेण्यासाठी योग्य दिशेने, कल्पकतेने अथक परिश्रम करावयास हवेत. तरच आपली प्रगती होईल. या जगात यशस्वी होणारे लोक अडचणीतही संधी शोधणारे असतात. आणि अयशस्वी होणारे लोक संधी आली असता अडचणी सांगत बसणारे असतात. ही गोष्ट लक्षात ठेवावयास हवी. भारतीय संस्कृतींत दिव्याला खूप महत्त्व आहे. दररोज सायंकाळी म्हणावयाची प्रार्थना पहा.
शुभं करोति कल्याणम् , आरोग्यं धनसंपद: ।
शत्रुबुद्धिर्विनाशाय , दीपज्योति:नमोऽस्तु ते ।।
" हे दीपज्योती आमचे कल्याण कर. आम्हाला आरोग्य आणि धनसंपत्ती दे. आमच्या मनातील शत्रुत्व भावनेचा नाश कर. तुला माझा नमस्कार असो. "
दीपावली उत्सव हा अंधारातून प्रकाशाकडे नेणारा असतो. अज्ञानाकडून ज्ञानाकडे, दु:खाकडून सुखाकडे, अविचाराकडून विचारांकडे, भ्रष्टाचाराकडून नीतीमत्तेकडे, आळसाकडून उद्योगीपणाकडे नेणारा असतो. आजच्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणाऱ्या बलिप्रतिपदेच्या दिवशी स्वत:मध्ये चांगला बदल करण्याचा प्रयत्न आपण प्रत्येकाने करूया.
(लेखक- पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.