उद्या गुढीपाडवा आहे. हिंदू नववर्षातला पहिला सण. आपण जे सण, उत्सव साजरे करतो त्यामागे एक प्रयोजन आहे. आपली वाटचाल तमसोमा ज्योतिर्गमय अशी व्हायला पाहिजे. म्हणजे काय तर तमापासून ज्योतीपर्यंत. म्हणजेच अंधारापासून उजेडापर्यंत म्हणूनच दिव्याचे महत्व सांगितले आहे. जिथे अंधार असतो तिथे दिवा लावला की उजेड येतो. तसाच विचाराचा, विवेकाचा, संस्कृतीचा दिवा आपल्याला लावायचा आहे. त्यासाठी गुढीपाडवा हा सण महत्वाचा आहे.
भारतीय संस्कृतीत जी गोष्ट केली जाते त्याला एक विशिष्ट रूपक आहे. जसं एखाद्या बिजामध्ये संपूर्ण वृक्षाचा विस्तार असतो, तसा रूपकांमध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे. उद्या तुम्ही जी गुढी उभारणार आहात त्यालाही एक रूपक आहे. कलश, आंब्याच्या डहाळ्या, वस्त्र, काठी, कडुलिंबाचा पाला या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. याचा एकमेकांशी तसा काही संबध नाही. पण तरी ते एकत्र आहेत. ही रूपक म्हणजे काय ते तुम्ही या व्हिडिओमधूनही पाहू शकता.
कलश - आता हेच बघा ना, एका काठीवरती गुढी उभी आहे. भारतीय संस्कृतीप्रमाणे पाहिल्यास ही गुढी आपल्या जीवनाचं प्रतिक आहे. सर्वात पहिला दिसतो तो कलश. कलश हा मांगल्याचं प्रतिक आहे. जेव्हा रोज आपण देवाची पूजा करतो तेव्हा त्यासाठी आपण कलशातून पाणी आणतो. म्हणजेच मंगलमय, मांगल्य जे असतं ते कलशामधून येतं. जीवनात मंगल गोष्टी होण्यासाठी किंवा मांगल्य प्रस्थापित होण्यासाठी कलशाचं महत्व आहे.
वस्त्र- वस्त्राकडे पाहिल्यास ते अखंड आहे. हे वस्त्र अखंड होण्यामागे खूप मोठे परिश्रम आहेत. एक धागा सरळ, एक धागा आडवा. असे अनेक धागे एकमेकांत गुंफले जातात तेव्हा ते वस्त्र बनतं. म्हणजेच अशाप्रकारे आयुष्य जगताना सुख आणि दु:ख ही एकमागोमाग एक येत जात असतात. या वस्त्राप्रमाणे आपलं आयुष्याचा सरळ धागा म्हणजे सुखं. आणि आडवा धागा म्हणजे दु:ख असतं. हे धागे विणल्यावर आयुष्याचं वस्त्र तयार होतं.
कडुनिंबाचा पाला- ही जर आयुष्याची गुढी असेल तर तुमचं जीवन हे सुदृढ असले पाहिजे. कोरोनाकाळात सर्वात जास्त महत्व आपल्याला आयुष्याचं होतं. म्हणुनच आयुष्य जर आनंदी व्यतित करायचं असेल तर ते सुदृढ असणं महत्वाचं आहे. त्याचं प्रतिक म्हणून कडुनिंबाचा पाला आहे. तो औषधीही आहे. आयुर्वेदातही त्याचे खूप उपयोग सांगितले आहेत.
आंब्याच्या डहाळ्या - आंबा फळांचा राजा आहे. आंबा हे सधनतेचं प्रतिक आहे. जीवनामध्ये सधनता हवी असेल तर आंब्याच्या डहाळ्या बांधाव्यात.
साखरेची गाठी - कडुलिंब कडू असतो. त्यावर मात्रा म्हणून साखरेची गाठ असते. जेव्हा आपल्या जीवनात गोडी असेल तर जीवनाची गुढी समृद्ध, सशक्तस सुदृढ करू शकतो. सुखदुखाने एकत्र आणू शकतो. जीवन आनंदाने जगू शकतो. एकमेकांविषयी गोडवा निर्माण करावा लागतो. तरच आपण आनंदी जीवन जगू शकतो. त्याचं प्रतिक म्हणून ही गोड गाठी आहेत.
काठी - वि. स. खांडेकर म्हणतात की गुढी एका काठीला बांधलेली असते. ती उंचउंच जाते. आभाळाला टेकते. ती जेव्हा उंच जाते तेव्हा ती ज्या काठीवर उभी आहे तीला विसरून चालणार नाही. काठी गुढी उभारण्यासाठी खूप महत्वाची असते. तसंच आयुष्य जगताना, मार्गक्रमण करताना उंच भराऱ्या घेतो तेव्हा हे करताना ज्यांच्या काठीचा आधार घेऊन आपण त्या भऱ्याऱ्या घेतो. ते आईवडील, गुरूजन, आप्तेष्ट, मित्रमंडळी असतील त्यांना आपण उंच उडाल्यावर विसरायचं नाही. हा बोध आपल्याला ही काठी देते. म्हणूनच गुढीला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.