समाजाने दूर लोटलेल्या कुष्ठरोग्यांवर प्रेमाची पाखर घालणारे, त्यांच्यातला आत्मसन्मान जागवणारे, त्यांच्यामध्ये जगण्याची उमेद जागवणारे मुरलीधर देविदास आमटे म्हणजे बाबा आमटे. आज त्यांची १०७ वा स्मृतीदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल जाणून घेऊयात.
२६ डिसेंबर १९१४ रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे त्यांचा जन्म झाला. मुरलीधर देवीदास हे बाबांचे मूळ नाव. त्यांचे कुटुंब जमीनदार होते. वरोड्यापासून पाच-एक मैलांवरील गोरजे गावाची जमीनदारी आमटे घराण्याकडे होती. त्यामुळे त्यांचे बालपण सुखात गेले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये पार पडले. नागपूर विद्यापीठातून १९३४ मध्ये ते बी.ए. आणि १९३६ मध्ये एल.एल.बी. ह्या पदव्या मिळवल्या. डॉक्टर बनण्याचे स्वप्न असलेल्या बाबा आमटे यांनी वडिलांच्या आग्रहाखातर वकील झाले. त्यानंतर त्यांनी काही काळ वकिलीसुद्धा केली.
बाबांचे घराणे सधन जहागीरदाराचे होते. त्यांचे वडील देविदास ब्रिटिश सरकारमध्ये अधिकारी होते. मुरलीधर आमटे यांना त्यांच्या लहानपणीच बाबा हे टोपणनाव मिळालं होतं. बाबांनी कायद्याचं शिक्षण घेतलेलं होतं आणि वर्धा येथे त्यांनी वकिलीही केली. ते यशस्वी वकील म्हणून नावाजले होते. पण तिथे त्यांचं मन रमलं नाही. त्यांनी वकिली सोडून स्वातंत्र्य चळवळीत स्वत:ला झोकून दिलं. बेचाळीसच्या चलेजाव चळवळीत त्यांना कारावासाची शिक्षाही झाली. महात्मा गांधींच्या वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात काही काळ वास्तव्य केल्यानंतर गांधींच्या विचारांचा त्यांच्यावर खूप परिणाम झाला. म. गांधींबरोबरच रवींद्रनाथ टागोर, विनोबा भावे आणि साने गुरुजी ही बाबांची श्रद्धास्थानं होती.
१९४६ साली बाबांचा साधनाताईंशी विवाह झाला. साधनाताई बाबांच्या सर्व सामाजिक कार्यांमध्ये खांद्याला खांदा लावून सहभागी झाल्या.त्यांनी आयुष्यभर बाबांना साथ दिली. संपूर्ण आयुष्य कुष्ठरोग्यांसाठी वाहिलेल्या बाबांनी जेव्हा पहिला कुष्ठरोगी पाहिला तेव्हा इतरांंप्रमाणे त्यांनीही नाक मुरडले होते. त्यांनाही त्या रोग्याकडे पाहणे अशक्य झाले. काय होता तो किस्सा पाहुयात.
स्वत: ला सामाजिक कार्यात झोकून दिलेल्या बाबांना अशाच एका पावसाळी संध्याकाळी रस्त्याच्या कडेला भिजत, विव्हळत असहाय्यपणे पडलेल्या एका कुष्ठरोग्याला त्यांनी पाहिले. आणि त्यांच्या आयुष्याचा मार्ग बदलला. त्यांनी त्या रोग्याची साधी विचारपूसही केली नाही. ते तिथून निघून आले. पण नंतर त्यांना स्वतःचीच लाज वाटू लागली. डोक्यात सतत गांधीवादाचा विचार सुरू असताना त्यांनी केलेले कृत्य त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यामूळे पुन्हा त्यांनी त्या कुष्ठरोग्याला शोधून काढले आणि ते त्याला घरी घेऊन आले.
बाबांनी त्या रोग्यावर उपचार सुरू केले. त्याची स्वच्छता करून त्याला योग्य ते औषधे सुरू केली. त्याचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले. पण, तो रोगी वाचू शकला नाही. उपचार सुरू असतानाच त्यांने प्राण सोडला. रोग झाल्यापासून लोकांचे शिव्या शाप खाणारा तो रोगी जग सोडून जाताना मात्र बाबांच्या आपुलकीमूळे नक्कीच सुखावला असेल.
या घटनेने त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी पुढे समाजाने वाळीत टाकलेल्या या कुष्ठरोग्याच्या साठी स्वतःचं आयुष्य वाहून घेतल. त्या काळात महारोग हा महाभयंकर समजला जात होता.त्याच काळात बाबांनी महारोग्यांच्या पुनर्वसनाचं कार्य हाती घेतलं. महारोग्यांना कुणी जवळ करीत नसे. त्यामुळे त्यांच्या नशिबी अस्पृश्यांसारखे जीणे येत असे. असहाय्य रोगाने गांजलेले हे रोगी त्यामुळे मानसिकरित्याही खचून जात असत.
१५ ऑगस्ट १९४९ रोजी आनंदवन येथे पहिलं हॉस्पिटल बनवले. आज आनंदवनात एक सुसज्ज हॉस्पिटल आहे. शाळा आहे आणि अनाथाश्रमही आहे. आनंदवनात पाच हजारांपेक्षाही जास्त लोक वास्तव्याला आहेत. आनंदवन प्रकल्प जगातील एक मान्यताप्राप्त प्रकल्प आहे.
बाबांनी स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून दिलं. महारोग्यांच्या पुनर्वसनासाठी आनंदवन हा आश्रम आणि अपंगांसाठी आणि समाजातल्या रंजल्या-गांजल्यांसाठी आणखी दोन आश्रम सुरू केले. पर्यावरण, वन्यप्राणी संरक्षण आणि नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतरही अनेक सामाजिक-पर्यावरणसंबंधित चळवळींमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं.
समाजकार्याबरोबरच मोजकंच, पण अतिशय सशक्त लेखनही त्यांनी केलं. ‘ज्वाला आणि फुले’ हा त्यांचा कवितासंग्रह अनेक तरुणांना प्रेरणा देऊन गेला. ‘उज्ज्वल उद्यासाठी’ हा काव्यसंग्रह आणि ‘माती जागवील त्याला मत’ ही त्यांची पुस्तकंही गाजली. बाबांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. कुष्ठरोग्यांसाठी कार्य करण्यासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे अमेरिकेचा डेमियन डट्टन पुरस्कार. हा पुरस्कार त्यांना १९८३ मध्ये प्रदान करण्यात आला.
१९८५ साली आशियाचं नोबेल पारितोषिक समजले जाणारे रेमन मॅगसेसे पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. संयुक्त राष्ट्रसंघाने १९९१ आणि १९९८ साली त्यांचा सन्मान केला. या व्यतिरिक्त त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. भारत सरकारने १९७१ साली पद्मश्री आणि १९८६ साली पद्मविभूषण देऊन त्यांना गौरवले.
१९९८ साली त्यांना महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार आणि २००४ साली त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. काही वर्षं त्यांना शारीरिक व्याधीमुळे बसता येत नव्हतं, त्यांना सतत झोपून राहावं लागायचं, तरीही त्यांच्या कार्यांमध्ये कोठेही खंड पडला नाही. अशा या थोर समाजसेवकाने ९ फेब्रुवारी २००८ रोजी शेवटचा श्वास घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.